Sunday, July 17, 2022

हम दो हमारे दो

 हम दो हमारे दो

"कितने आदमी थे" "सरदार दो" 

शोले सिनेमातला डायलॉग.

 २०१४ च्या निवडणूक निकालानंतर प्रत्ययास आला आणि खूप प्रसिद्धही झाला.  गुजरातच्या दो आदमी (जय आणि विरु) नी भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले. पक्षाच्या स्वप्नातलं आणि ध्येयातलं एक उद्दिष्ट त्यांनी साध्य केलं होतं. निर्विवाद बहुमत मिळवून देऊन देशात प्रथमच पक्षाची एक हाती सत्ता आणली. 

 १९४७ साली ब्रिटिश भारत सोडून गेले परंतु घराणेशाहीचा (शाप) वारसा मागे ठेवून गेले. जसं ब्रिटनमध्ये अजुनही राणीचंच राज्य आहे तसं भारतात मागील ७५ वर्षात मोजकी १०-१२ वर्ष सोडली तर एकाच घराणेशाहीच्या (आडनावाच्या) अंमलाखाली चालणारं सरकार होतं. ह्या गुलामगिरीला सलग दोन टर्म बहुमतात निवडून येत छेद दिला तो ह्या "दो आदमींनी". 


२०१४ नंतर देशभरात राज्यस्तरीय निवडणुकांमध्ये देखील "सरदार दो" डायलॉगचं प्रत्यंतर येत आहे. दोघांनी पाऊण भारत कमळमय केला. मागील आठ वर्षांत  घराणेशाहीची सत्ता देशातूनच नव्हे तर राज्याराज्यातून उलथवायला सुरुवात केलीय.  अर्थात प्रत्येक ठिकाणी गब्बर वेगळा आणि दोन्ही हात वर करुन भेदरलेला डोळे मोठे केलेला कालिया वेगळा. जय-वीरु मात्र तेच. काही ठिकाणी रोज सकाळी फुशारक्या मारणारे सुरमा भोपाली देखील आहेत. 


एकेकाळी पक्षाचे फक्त दो खासदार संसदेत निवडून आले होते. तेव्हा मदमस्त सत्ताधाऱ्यांनी  "दो सांसद क्या बिघाडेंगे हमारा?" म्हणत हसले होते. त्या दो मधल्या एकाने त्यांना करारा जवाब दिला होता " आमच्या पक्षाचे दोघंच पुरेसे आहेत तुमची अहंकारी धनानंदाची सत्ता उलथवायला". कदाचित त्वेषाने उपरोधाने बोललेल्या ह्या त्यांच्या शब्दांत इतकी ताकद होती की तेव्हाच कुठंतरी चाणक्य आणि चंद्रगुप्त उदयाला येत होते. 


चला.. प्रस्तावना खुप झाली आता मुख्य विषय  "हम दो हमारे दो" सुरू करुया.


भारतीय जनता पक्ष हा Multi Level Marketing म्हणजे MLM तत्वावर चालणारा पक्ष आहे. "राष्ट्र प्रथम" हा विचार हे ह्या MLM चं Product आहे. ह्यातूनच पक्ष १ चे ३ पुढे ३ चे ९ अशी साखळी जोडत भारतभर पसरला. २०१४ नंतर विशिष्ट दों समाजांपुरता मर्यादित न राहता, बेरजेचे समाजकारण करत विविध जाती-समाज धर्मामध्ये वाढत गेला. २०१४ ची मुख्य निवडणूक जिंकल्यावर पुढच्या वर्षभरात  भाजपनी दोन महत्त्वाची राज्य काबीज केली. 

एक आर्थिक दृष्ट्या बलाढ्य महाराष्ट्र तर दुसरं भौगोलिकदृष्ट्या मोठं असलेलं उत्तर प्रदेश. 


महाराष्ट्रातील तोपर्यंतच्या पुरोगामी राजकीय इतिहासाला छेद देत मुख्यमंत्री केला. देवेंद्र फडणवीस.

उत्तर प्रदेशात जिथं जाती धर्माच्या सामाजिक व्यवस्थेवर यश अपयश अवलंबून असते, तिथं धक्का तंत्राचा वापर करत ठाकूर समाजातील एक संन्यासी दिला. योगी आदित्यनाथ


फडणवीस बुद्धी चातुर्य, संयम आणि सर्ववर्ग समावेशक ह्या गुणांनी महाराष्ट्रतील चाणक्य म्हणून नावारूपाला आले आहेतच.

योगी आदित्यनाथांकडे प्रसंगी कठोर निर्णय घेणारे, न बोलून काम करणारे, धर्म अभिमानी आणि समाज कंटकांना जश्यास तसे उत्तर देणारे धर्मवीर म्हणून बघितले जाऊ लागले आहे.


२०१४ ते २०१९ या पाच वर्षात फडणवीस मुख्यमंत्री पदावर असताना वन मॅन आर्मी सारखे लढत होते. स्वपक्षीय राजकारण तर विरोधकांच्या मोर्च्याच्या कारवाया. हा मुख्यमंत्री पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करू नये म्हणून स्वकीय आणि विरोधकांनी कित्येक वेळा देव देवी पाण्यात ठेवले. इतिहासातील आपली नोंद पुसली जाऊ नये या भीतीने जातीपातीचे द्वंद लावणारे शकुनी बागेतल्या झाडामागून फासे टाकत होते. परंतु या सर्वांना "एक अकेला" फडणवीस पुरून उरला. त्यांचं एकमेव बलस्थान होतं ते म्हणजे स्वच्छ चारित्र्य. त्यांच्या विविध कल्पक योजनांमुळे विरोधक तर गार पडतच होते परंतु ज्यांना सख्ख्या भावाप्रमाणे वागणूक देऊन सत्तेत भागीदार केले ते पण हळूहळू इर्षेने विरोधक व्हायला सुरू झाले. त्याचाच परिणाम २०१९ चे निवडणुकीत आपण सर्वांनी पाहिला. पुढील अडीच वर्षात लोण्याचा गोळा ही पंचतंत्रातील कथा प्रत्यक्षात अनुभवली.

अर्थातच सत्ता गेली म्हणून स्वस्थ बसणारे किंवा हार मानणारे फडणवीस नव्हते. कारण त्यांना जन्माला घालणारे जे दो आदमी होते त्यांनी २००२ ते २०१४ मध्ये दाखवून दिले होते की चाणक्य नीतीची, कष्टाची आणि संयमाची ताकद काय असते. २०१९ नंतरच्या अडीच वर्षात फडणवीसांनी आपल्या कर्तुत्वाने बिहार सारखे महत्त्वाचे राज्य तर गोव्यासारखे काँग्रेसी परंपरेचे राज्य भाजपला एक हाती मिळवून दिले. २०२२ मध्ये हॅट्रिकचे क्लीन बोल्ड करत संपूर्ण संघ गार करून घरी पाठवला. 


ज्यांना पन्नास वर्षे राजकारण करून सुद्धा जमलं नाही ते फडणवीस नावाच्या पन्नास वर्षाच्या तरुणांनी 'करून दाखवलं'. एक जाणकार राजा पासून ते दुसरा स्वयंघोषित राजा आणि त्यांच्या सल्लागाराला लागोपाठ राज्यसभा, विधान परिषद, आणि बंड अशी तिहेरी धोबी पछाड दिली. हे कमी की काय म्हणून मुख्यमंत्रीपण घोषित करुन चीतपट केलं. 

वेळेप्रसंगी अडीच पावले मागे जाऊन मोठा चेकमेट करण्याची ताकद असलेला लंबी रेस का घोडा म्हणजेच देवेंद्र फडणवीस.


मठाधिपती ब्रम्हचारी. धर्मासाठी आयुष्य ओवाळून टाकणारा. ठाकूर समाजात जन्माला येऊनही लहान वयातच आपलं जीवन मठाला समर्पित केलेला संन्यासी योगी आदित्यनाथ. 

दिल्लीतल्या दोघांनी तयार केलेला हा दुसरा. 

भगवी वस्त्रे, कायमस्वरूपी मुंडे, कानात गळ्यात रुद्राक्ष माळा घालणारा मुख्यमंत्री. सेक्युलर भारताच्या चित्राला तडा जाणारं व्यक्तीमत्व. उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्याच्या सर्वोच्पदी. जिथं विविध धर्मातील जनतेचा पगडा आणि प्रभाव आहे तीथं हा कट्टर धर्मवीर.

सुरवातींच्या महिन्यात तथाकथित सेक्युलर वाद्यांकडून टिका आणि हेटाळणी करण्यात आली. विशिष्ट समुदायाला भयभीत करण्यासाठी आदित्यनाथांच्या धर्मनिष्ठतेचे दाखले देण्यात आले. हा भगवा योगी सरकार आणि प्रशासन काय चालवणार म्हणत त्यांच्या निर्णय क्षमतेवर प्रश्न चिन्ह उभं करण्यात आले. परंतु मागील ५-६ वर्षात योगींनी उत्तर प्रदेशला ज्या उंचीवर नेऊन ठेवलयं ते कदाचित प्रदेशात कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी केलं नसेल. जी बोटं त्यांच्यावर आरोप करत होती तीच बोटं तोंडात घालण्याची पाळी आली आहे. आपल्या कर्त्याच्या  पावलांवर पाऊल ठेवत न बोलून धडाकेबाज निर्णय घेत प्रदेशातील लोकांची मने जिंकली आहेत. कट्टर धर्मवीराला शोभतील असे निर्णय घेत माफिया राज संपुष्टात आणले आहे. पर्यटन आणि औद्योगिकीकरणाला चालना देत रोजगाराच्या संधी निर्माण करत आहेत. अर्थातच विकास कसा भकास होईल ह्याचा  विरोधक धार्मिक सलोखा बिघडवून प्रयत्न करत आहेत. तरीही दुसऱ्या टर्मला देखील बहुमताने निवडून येत आदित्यनाथांनी आपली बुलडोझर बाबाची प्रतिमा कायम राखली आहे. 


२०१४ ला निर्माण झालेल्या त्या "दो आदमीं" मध्ये २०२२ला त्यांनीच घडविलेल्या अजून "दो आदमींचा" उदय झालाय. हे नव्याने उदयास आलेले 'दो आदमी' भारतीय राजकारण आणि समाजकारणातील आधीच्या दोंचे मानसपुत्र तर आहेतच, परंतु पुढील वीस वर्ष त्यांचा वारसा चालवण्याचं सामर्थ्य त्यांच्यात आहे का हे काळच ठरवेल. 


मागील 'दोन' दशकांत, संसदेतील 'दोन' खासदारांतून उभारी घेणारा हा पक्ष, पुढील 'दोन' दशकांत "हम दो हमारे दो" च्या जोडी साखळीने भारतावर राज्य करेल ह्यावर पक्षातील कोणाचेही 'दो' मत असणार नाही हे नक्की.

 

- मिलिंद सहस्रबुद्धे

पुणे ३०

१७/०७/२०२२


ता.क. 

योगायोग असा की आज हा लेख पूर्ण केला तेव्हा महाराष्ट्रात देखील अजूनही दोघांचंच मंत्रीमंडळ आहे.

Wednesday, July 6, 2022

लग्न वाढदिवस

 दिनांक: ०६ /०७/२०२२

वेळ: दुपारी ४:०० (चहाची)

स्थळ: अर्थातच सदाशिव पेठ पुणे ३०


मी: "किती झाली गं?" माहिती असूनही मी मुद्दामूनच विचारलं. 

ती: "लग्नाला १९ आणि भेटून २१ वर्ष. म्हणजे बेडीत अडकून १९ आणि चोरी करून २१"


मी: "शिकलीस की बोलायला"

ती: "हो का. तू ऐकायला शिकलायस असं म्हण"

मी: "अर्थातच. आपला वाद एकतर्फीच असतो. संवाद म्हणशील तर तो बहुमुखी आहे"

ती: " तो कसा काय बुवा?"


मी: "आपल्या संवादात आधी आई-बाबा असायचे (अर्थात माझे) आणि आता दोन्ही मुलंही सामील असतात. म्हणून बहुमुखी "

ती: "हो. हे मात्र खरं आहे. सुरुवातीला आई-बाबांचा तुला आधार असायचा आणि आता मुलंही तुझीच बाजू घेतात. तुझं कायमच बरं आहे."


मी हसतो. 

मी: "मग! मी आहेच तसा सर्वांना हवाहवासा"

ती: "हो ना आई मात्र कायम नको. तुझी नाही हा तुझ्या मुलांची आई असं म्हणतेय मी. तुझ्या आईच्या बाबतीत मात्र असं होत नाही कधी"


मी: "अगं, आजच्या दिवशी एवढं काय वाटून घेतेस. मी आपली सहज चेष्टा करतोय तुझी"

ती: "बरोबर आहे! अंगाशी आलं की चेष्टा करतोय किंवा चेष्टा चालू आहे असं म्हटलं की झालं"


मी: "तुला खरंच वाटतं का? असं असेल म्हणून. तू नसशील तर काय होईल हे तुला पण माहितीय आणि आम्हाला सगळ्यांना तर नक्कीच.  अर्थात ही वरवरची चेष्टा मस्करी म्हणजे चॉकलेटच्या वरचे रॅपर आहे. तु आमचं  आपलं गोड चॉकलेट आहेस.  हे तुझ्यावरचं गोड प्रेम आहे."

ती: "वा छान. झाला का जागा तुझ्यातला साहित्यिक. अलंकारीक शब्द आणि उपमा देऊन वाक्य रचना करायची. मग समोरच्याचा राग विरघळतो. पण बच्चू मी म्हणजे तुझी आई नव्हे तुझ्या मुलांची आई आहे बरं!"


मी: "मला वाटलंच तुला असं काहीतरी वाटणार. खरंच ते गोड चॉकलेट म्हणजे ना तू आहेस. अजून योग्य सांगायचं तर Eclair किंवा Melody चॉकलेट. चघळत राहिलो की त्याचा गोडवा अजूनच वाढत जातो. बघ ना सुरुवातीला चॉकलेट तोंडात टाकल्यावर नीट चवच लागत नाही कळतच नाही गोड आहे का अगोड. चॉकलेटचा फ्लेवर समजत नाही. जस जसं चघळत जातो नि तसं त्या चॉकलेट रॅपरच्या आतल्या पांढऱ्या कागदाची चिकटलेली चव निघून जाते आणि मग चॉकलेटचा गोडवा लागायला लागतो मग असं वाटतं की चॉकलेट संपूच नाही. तसंच काहीसं आहे आपलं प्रेम संसार मुलं सगळंच."


ती: "चल काहीतरीच हो तुझं! तू काय बोलशील ना खरंच."


मी: "अगं तसं नाही.  शप्पथ गेली २१ वर्ष तू अशीच मुरत गेलीस माझ्या जीवनात. सुरुवातीला सगळंच नवीन. त्या रॅपरच्या आतल्या पांढऱ्या कागदासारखं. आपलं प्रेम नवीन प्रेयसी म्हणून तुझा गोडवा निराळा. लग्नानंतर आई-बाबा आणि आपण दोघं असा चौकोनी संसार. तो पण नवीन. मग त्या चॉकलेटचा एक वेगळाच फ्लेवर. तो गोडवा हळूहळू वाढत गेला. काही वेळा चिवट, चिकटपणा दाढेत अडकला पण अर्थातच सामंजस्याने तो काढत परत आपण  चॉकलेट चघळत गेलो." 

आम्ही दोघंही शांत एकमेकांकडे बघत होतो पण शुन्यात...


मी: "पुढे मुलं झाली आणि मग परत माझ्या मुलांची आई म्हणून नव्या चॉकलेटच्या रूपात आलीस. हा एक नवीनच फ्लेवर होता तुझा. आज जशी मुलं वाढत गेली आहेत तसतसं परत या फ्लेवरच्या चॉकलेटचा पण गोडवा वाढत चाललाय. अर्थातच पुढे अजून किती विविध चॉकलेटच्या रूपात, फ्लेवर्स मध्ये तुला अनुभवायला मिळणारे ह्याची उत्सुकता कायम मनात आहे"

पटकन भानावर येत..

ती: "तुझ्या अशाच बोलण्यावर आणि समजावून सांगण्यावर भाळले होते मी. लहान होते तशी पण आज मात्र तेव्हा केलेल्या धाडसाचं माझं मीच मनात रोज कौतुक करते"


मी: "मग, सांगतो काय आहेच माझा प्रभाव हवाहवासा."


मी: "एक सांगू का? प्रत्येक वेळेस तुझ्या नवीन रूपातलं नवीन फ्लेवरचे चॉकलेट खाण्यासाठी दुकानातल्या बरणीकडे निरागसपणे बघणारा तो लहान मुलगाच आहे मी अजूनही." 

तुझाच एकमेव निस्सीम चाहता

- मिलिंद 


तन्मया, आपल्या दोघांना

लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा 

खुप प्रेम....

Friday, June 3, 2022

माझी भटकंती - सीतामाई दरा

 सीतामाई दरा

पुणेकरांची वीकएंड टूर्स अँड ट्रॅव्हल्स मधली गोल्डन ट्रँगल ही ठरलेली ट्रीप. आता तुम्ही म्हणाल गोल्डन ट्रँगल म्हणजे तर अहो सिंहगड-पानशेत-खडकवासला. हा पुण्याचा हक्काचा गोल्डन ट्रँगल. एक गड-एक धरण-एक बॅकवॉटर्स तलाव असा त्रिकोणी मिलाफ असलेला गोल्डन ट्रँगल.
सध्या सगळीकडे "जरा हटके" स्टाईलला महत्त्व आलं आहे. प्रत्येक क्षेत्रात किंवा एखाद्या गोष्टीत, प्रवासात जरा वेगळी वाट चालून पाहू असं प्रत्येकालाच वाटतं. अर्थात हया वेगळ्या वाटेने गेलं की कधी काही हरवतं तर कधी नवीन काहीतरी सापडतं. नेहमीचे गुलमोहोर आणि बोगनवेलांनी भरलेले रस्ते सोडून वेगळ्या अवघड वाटेवर मग एखादा लाल रंगाचा चाफा दिसतो तर कधी रानटी पिवळी फुले दिसतात. एखादं डेरेदार झाड हिरवं भरलेलं असतं. आपल्याला त्यांची नावे माहिती नसतात पण छान वाटतं असा निसर्ग अनुभवायला.
ह्या गोल्डन ट्रँगल च्या प्रवासात सिंहगडच्या पायथ्याशी जरा डाव्या बाजूला वाकडी वाट केली की आपण डोणजे गावात पोहोचतो. तसं पाहायला गेलं तर हे छोटं खेडं आहे. सिंहगडच्या डोंगर रांगांच्या कुशीत वसलेलं. गेल्या काही वर्षात मात्र पुण्यातल्या लोकांचं फार्महाऊसचं आवडतं लोकेशन आणि वीकेंड डेस्टिनेशन झालं आहे. सध्या डोणजे गावच्या नागमोडी रस्त्यावर दुतर्फा एन ए प्लॉट आणि फार्म हाऊसची लागवड झालेली आपल्याला दिसते. तीस चाळीस वर्षांपूर्वी मात्र हा रस्ता नव्हता तर मुरमाची खडबडीत वाट होती आणि त्या वाटेच्या दुतर्फा साग वृक्षांची आणि आंब्याची लागवड दिसायची.
हयाच रस्त्याने पुढे चालत राहिलं की एका वळणावर "आपलं घर" नावाचा अनाथ आश्रम आणि त्याचा परिसर दिसतो. विजय फळणीकर आणि दाम्पत्याच्या जीवनातील कटू प्रसंगाने त्यांना एका सामाजिक वळणावर आणून सोडलं आणि त्यांनी अनाथ आश्रम स्थापन केला तो हा "आपलं घर". आपलं घराला वळसा घालून डावीकडे वळून डोंगरातून येणारा खळखळणारा ओढा पार करून आपण पुढे चालत आलो की दिसतो तो "योगीराज सिध्दनाथ वनाश्रम". प्रसिद्धीने जागतिक कीर्तीचा नसला तरी विविध देशातून योग आणि ध्यान धारणा साधनेचे 'भोक्ते' हया आश्रमात वर्णी लावतात. आश्रम कायमच हाउसफुल असतो.
इथूनच सुरुवात होते ती सीतामाई दराकडे जायची. दोन्ही बाजूला असलेली गर्द हिरवी सागाची उंच झाडं. छोटी छोटी वाटेच्या कडेला उगवलेली झुडपं आणि अधून मधून दिसणारं एखादं छोटं घर. उजव्या बाजूनी ऐकू येणारी ओढ्याची खळखळ आणि डाव्या बाजूला पसरलेला आडवा डोंगर. मान थोडी वर करून पाहिली की समोर अर्धगोलाकार दिसणारी टेकड्यांची रचना. उजव्या बाजूला सिंहगडच्या दिशेने जाणारा डोंगर. डोंगरात जरा बारकाईने लक्ष दिलं तर एखादं दुसरे वाहन जाताना दिसतं तोच हा सिंहगडचा घाट रस्ता. असं चालत असतानाच एकदम समोर लांब बघाल तर अगदी चित्रात काढतो तसे उजव्या आणि डाव्या बाजूला उतरत जाणारे डोंगरांचे कडे. त्यामध्ये निर्माण झालेली दरी सारखी दिसणारी V आकाराची घळ. घळीच्या मधून दूरवर दिसणारा सरळ आकाशात भिडणारा उंच डोंगर.
सप्टेंबरच्या सुमारास पाऊस दमल्यानंतर हा परिसर हिरव्या करड्या रंगाची पैठणी नेसून जणू तुम्हाला तिच्या लावणीला खुणावत असतो. या हिरव्या करड्या पैठणीच्या रानावनात एखादा सुंदर नक्षीदार मोर नाचताना तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतो.
माझ्या मित्राचं हयाच बाजूला फार्महाऊस असल्याकारणाने ही वेगळी वाट आम्हाला तुडवायचा योग आला. आमच्याबरोबर अर्थातच गावातल्या एका मामांनी सोबत केली आणि आम्हाला माहिती दिली. त्या समोरच्या घळीला सीतामाईचा दरा असे म्हणतात असे त्यांनीच सांगितले. वाटेत गुरं चरायला आलेल्या गुराखी कडून " मागच्या उन्हाळ्यात त्या तितं झुडपा मागं होतं. बराच वेळ बसलं होतं. आमच्या गाई चरत्यात न्हा वं इतं. शेवटी उठून वर डोंगरावर निघून गेलं." अशी बिबट्याची कहाणी ही ऐकायला मिळाली. गावाकडची माणसं "ते होतं", "जनावर होतं" अशा भाषेत का बोलतात हे मला अजूनही कळलं नाही. "बिबट्या होता" "साप होता" असं ते कधी म्हणतांना आपल्या ऐकिवात येणार नाही. असो अर्थात सिंहगड वनक्षेत्रात बिबट्यांची हातावर मोजण्याइतकी संख्या नक्कीच आहे त्यामुळे उन्हाळ्यात पाण्यासाठी बिबटे ओढ्यापर्यंत नक्कीच येत असणार.
चालत चालत एका छोट्या डोंगराला वळसा घालून आम्ही शेवटी पोहोचलो आमच्या ठरलेल्या ठिकाणी ते म्हणजे सीतामाईचा दरा.


एक झाड, झाडाखाली वेताच्या काठ्यांचं कुंपण आणि त्या कुंपणात असलेलं पाण्याचं कुंड. अर्थात पावसाळा असल्यामुळे ते काठोकाठ भरलेलं होतं. उन्हाळ्यात देखील एवढं पाणी असतं या कुंडात अशी जणू जगावेगळी माहिती आम्हाला मिळाली. साधारणतः महाराष्ट्रातील गड किल्ले आणि त्याच्या आजूबाजूची आणि किल्ल्यांवर असलेल्या कुंडांमधे बाराही महिने गोड पाणी मिळते ही खरंच महाराष्ट्राला मिळालेली नैसर्गिक देणगीच आहे.
तर कुंडाच्या शेजारी असलेली दगडी शंकराची पिंड. त्याच्या समोर असलेला कान तुटलेला दगडी नंदी. मागं शेंदूर फासलेला मारुती. सर्वात वेगळेपण म्हणजे शंकराच्या पिंडीच्या उजव्या बाजूला ठेवलेली दोन हात उंच असलेली दगडी शिळा. त्या शिळेवर कोरलेली प्राचीन अर्धवट लेणी. लेणीत एका स्त्रीचा अर्धवट तुटलेला हात दिसतो आणि त्या हातात कमंडलू. त्यावर लावलेलं हळद कुंकू गुलाल. समोरच मांडलेली खणा नारळाची ओटी. मामांनी आम्हाला सांगितलं की गावकरींच्या सांगण्यानुसार तो हात सीतामाईचा आहे. सीतामाई लंकेहून परत आयोध्येत आली. त्यानंतर प्रभू श्रीरामांच्या अग्नी परीक्षेत प्रायश्चित्त म्हणून तिला वनवासात जावे लागले. तेव्हा या ठिकाणी ती वास्तव्यास होती. लव आणि कुश हया समवेत इथल्याच अरण्यात राहत होती. तिच्या दोन्ही हातात पाण्याचे दोन घडे अर्थात कमंडलू होते. वाल्मिकी ऋषींच्या सांगण्यावरून तिच्या हातून हे पाण्याचे घडे खाली पडले. एक उजव्या बाजूला पडला ज्यातून हे पाण्याचे कुंड तयार झालं. तर डाव्या बाजूला पडलेल्या घड्यातून सांडलेला पाण्यातून बारमाही वाहणारा ओढा तयार झाला. कथा ऐकताना आणि आजूबाजूच्या रानातल्या शांततेत गुढ वातावरण तयार झालं होतं. ते झाड, त्याखाली असलेल्या शंकर, कान तुटलेला नंदी, समोर ठेवलेला नारळ, बाजूचं कुंड, उजव्या बाजूला सीतामाईचा तुटलेला हात, तीच्यासमोर मांडलेली ओटी...सगळं बघत असतानाच अचानक झाडावर माकडाचा चित्कारण्याचा आवाज आला आणि आम्ही भानावर आलो. अचानक तिथे आलेल्या माकडाच्या आगमनाने माझ्या मनातील श्रध्दाळू भाव जागे झाले. सीतामाईचा दरा पाशी जणू हनुमानाचे दर्शन झाले. इतरांच्या नकळत हात जोडून माकडाला मी नमस्कार केला. गंमत आहे, माणसाचे मन हे ही जणू माकडच. कधी कुठल्या फांदीवर उडी मारेल सांगता येत नाही.
तिथूनच पुढे ओढ्याच्या पाण्यात हात पाय ओले केले. जणू शरयू नदीच्या पात्रात पापं धुतली गेली. थोडा वेळ विश्रांती घेऊन परत एकदा सीतामाई आणि शंकराचं दर्शन घेऊन आम्ही रानातल्या वाटेने घराकडे मार्गस्थ झालो.
आता तुम्ही म्हणाल कि हा सगळ्यात बघण्यासारखे काय आहे तर सीतामाईचा दराला जातानाची रानातली वाट आणि कुंडातील गार पाणी. तिथं गेल्यावर तिथल्या वातावरणातली शांतता. जंगलात दिसणारे विविध पक्षी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्या सर्व प्रवासात जोडीला नसणारे Mobile Network. हे अनुभवायला सिंहगडला जाताना एक तासभर वाकडी वाट करून सीतामाईचा दरा बघायला हरकत नाही. तसंही काय हो, आपल्याला गोल्डन ट्रँगल हा नेहमीचा आहेच की.
- मिलिंद सहस्रबुद्धे
सदाशिव पेठ पुणे ३०
ता. क. - ४ व्हीलर अथवा २ व्हीलर वनआश्रमापर्यंत व्यवस्थित जाते. पुढे मात्र चालत जाण्यातच मजा आहे.

Saturday, May 21, 2022

लुप्त - भाग २ "धार"

 लुप्त - "धार"

"काय गं आई? सगळ्या सुरी चाकू तसलेच. एकालाही धार नाही. साधा आंबा पण नीट चिरला जात नाहीये. बघ ना!"
"हो माहितीये मला! आजचा दिवस वापर तशीच. उद्या मी D-Mart ला जाणार आहे, तेव्हा चांगल्या दोन-तीन सुरी आणि तुम्हाला सारख्या लागतात त्या छोट्या-मोठ्या कात्र्यापण घेऊन येणार आहे. जरा धीर धरा आता! आणि माझ्या मागे मागे करू नकोस"
घराघरातून बऱ्याच वेळा नेहमी ऐकू येणारा हा संवाद. घरातील सुरी.. Sorry हं हल्ली त्याला Knife असे म्हणतात, जरा धार गेली की बदलून अथवा नवीन आणली जाते.
पूर्वी (म्हणजे साधारण १०-१५ वर्षा आधी) घरात एखादीच सुरी असायची. तीच सर्व गोष्टी कापायला, खरवडायला, उचकटायला आणि कधी कधी तर लिंबू कापल्यावर सरबत ढवळायला पण वापरली जायची. सध्या मात्र घरात वेगवेगळ्या Knife असतात. भाजी कापण्याची मोठी Knife, लोणी लावायची गुळगुळीत Knife, तर फळांसाठी मध्यम knife. अशा एक न दोन तर सोडाच पण चार-पाच असतात. त्या काळी जेव्हा घरात एकच सुरी असायची तेव्हा ती बाद झाली व त्याची धार कमी झाली तर D-Mart आणि Dunzo नव्हते. तेव्हा कमी झालेली धार पुन्हा धारदार करून देणारे "धारवाला" म्हणायचे ते यायचे. घरोघरी गल्लीबोळात फिरत असायचे. तेव्हा अश्या सुरी किंवा कात्रीला धार करून मिळायची. पाच रुपयांच्या पेन सारखं वापरून झालं की वस्तू फेकून देणे ही प्रवृत्तीच नव्हती.
असा एखादा धारवाला दुपारच्या वेळेत ओरडायचा " ऐ$$ धारवाला. धार लावणार. सुरी, चाकू, कैची,कोयता, विळी अन् कानसला धार लावणार..ऐ$$ धारवाला..!" अगदी बरोबर दुपारच्या चहाच्या वेळेला किंवा सकाळी १०-११ च्या सुमारास. व्यवसायाची गणितं त्यांचीही पक्की होती. कारण घरातील बाई नेमकी ह्याच वेळात साधारण थोडी निवांत असते. त्याच बरोबर तिला पुढच्या स्वयंपाकाला सुरी विळीची घाई असते.
धारवाला रस्त्यावर आला किंवा एखाद्या गल्लीत आला की नेहमीप्रमाणे घराघरातून बायका त्यांच्या सुरी, कात्री, विळी क्वचित कोयता असं घेऊन धारवाल्याकडे आणून द्यायच्या. मग त्या त्या घरातली मुलं गंमत बघत बसायची. आपल्या वस्तू धार लावून झाल्या की ताब्यात घ्यायच्या आणि आईला किंवा काकू वगैरेला हाका मारायची.
'धारवाला त्या चाकावर सुरी कात्री घासायचा आणि ह्या बायकांची पैशावरुन घासाघीस चालायची.'
साधारण शनिवार रविवारच्या सुट्टीत किंवा मे महिन्याच्या सुट्टीत ठरलेला कार्यक्रम असायचा. विविध हत्यारांना धार लावणारा हा धारवाला कायम कुतूहलाचा विषय होता.
आजकाल आपण सोशल मीडियातून बऱ्याच वेळा वाचतो की महिंद्रा उद्योगाचे व्यवस्थापक आनंद महिंद्रा हे विविध 'जुगाड' करणाऱ्यांना भेट म्हणून गाड्या किंवा इतर वस्तु देत असतात. एवढेच काय तर व्यवस्थापनशास्त्रात किंवा त्या विश्वात 'जुगाड' नावाचं एक इंग्रजी पुस्तक देखील प्रसिद्ध झालेला आहे.
पण खरं सांगू का? जेव्हा 'जुगाड' हा शब्द ऐकिवात नव्हता किंवा त्याचा अर्थही माहीत नव्हता तेव्हा आमच्या सारख्या पिढीने पहिल्यांदा पाहिलेलं जुगाड कोणतं असेल तर धारवाल्याची सायकल आणि त्यावर फिरणारं Grinding Wheel ( धार लावणारा दगडी चाक)
अतिशय सोप्य पद्धतीने आणि कमी खर्चात केलेला सायकलचा उपयोग. Paddle फिरवून मागच्या चाकाला मिळालेल्या गतीचा केलेला चपखल उपयोग. सायकलचं Paddle मारल्यानंतर मागचं चाक फिरतं, फिरणाऱ्या चाकाच्या वेगाचा उपयोग करून विकसित केलेलं हे धार लावण्याचं तंत्र.
पूर्वी सायकलला डबल स्टॅण्ड असायचा. जो मागच्या चाकाला लावलेला असायचा. अर्थात डबल स्टॅन्ड सायकलची प्रथा गेली आता. त्या स्टँडवर सायकल उभी राहिली की मागचं चाक फिरवल्यावर नुसता हवेत फिरायचं. अर्थात हयाचा उपयोग करून त्याकाळी कोणाच्या डोक्यात ही सुपीक कल्पना आली त्याचं कौतुक करायला महिंद्रा नव्हते.
मागच्या चाकातील तारांमध्ये (spokes) एक मोठी Pulley (चक्री/कप्पी) लावून, त्या चक्रीतून एक जाड वादी (belt) (जाड दोरी) फिरवून ती दोरी सायकलच्या Handle ला जोडणार्या पुढील दांड्यावर असलेल्या छोट्या Pulley (चक्री/कप्पी) ला अडकवलेली असते. सायकलची चेन जशी एकसंध असते तशी ही वादी ही एकसंध असते. छोट्या चक्रीच्या दुसऱ्या टोकाला धारदार जाड ग्राइंडिंग व्हील (दगडी चाक) जोडलेले असते.
धारवाला सायकल स्टँडवर लावून त्यावर बसतो. दोन्ही पेडल सायकल चालवावी तशी जोरजोरात चालवतो. मागचं चाक जोरात फिरायला लागतं. अर्थात सायकल स्टँडवर असल्यामुळे ती पुढे जात नाही. मागचं चाक जोरात फिरत असतं फिरलेल्या चाकाची गती चाकात लावलेल्या मोठ्या चक्री च्या वादीतून वरील दांड्यावर लावलेल्या छोट्या चक्रीत Transfer होते. मोठ्या Diameter (व्यासाच्या) चक्रीतून जेव्हा ही गती छोट्या Diameter चक्रीला मिळते तेव्हा वेग हा कित्येक पटींनी वाढतो. अर्थात हे तंत्र फिजिक्स किंवा मेकॅनिकल इंजिनिअर ला लगेच कळेल. यामुळे पुढील छोटी चक्री जोरात फिरते आणि त्या चक्रीला जोडलेले Grinding Wheel (दगडी चाक) देखील कित्येक पटीने वेगाने फिरते. धारवाला त्या दगडी चाकाच्या दोन्ही टोकावर सुरी चाकू कोयता विळी यांची पाती वर पासून खाली पर्यंत चांगली चार-पाच वेळा फिरवून देतो. दोन्ही बाजुंनी फिरवुन झाली की आपली सुरी किंवा कात्री जी काही चकचकीत होते ना त्याला तोड नाही.
लहानपणी ही गंमत बघतांना सर्वात भारी वाटायचं जेव्हा कात्री किंवा विळी त्या दगडी चाकावर घासली जायची तेव्हा हवेत लांब लांब स्पार्क उडायचे. त्या स्पार्कची एक वेगळीच गुढ भीती आणि ओढ असायची. स्पार्कला हात लावावा असं वाटायचं. भीत-भीत हात जवळ नेला की " ये पोऱ्या मागे हो! चटका बसेल ना!" असं धारवाला ओरडायचा. आजही जेव्हा मी रस्त्यावर धारवाला बघत होतो तेव्हा तो चटका मनाला हुरहुर लाऊन गेला. आणि मग तुमच्या समोर लुप्त होत चाललेल्या कलेचा किंवा कौशल्याचा दुसरा भाग सादर केला.
आजच्या हया D-Mart, Dunzo, Big Basket आणि Amazon च्या जमान्यात, १९ मिनिटात घरात येणारी वस्तू. मग मला सांगा? कोण कशाला थांबेल चार-पाच दिवस धारवाला येईपर्यंत घरातल्या सुऱ्या आणि कात्र्यांना धार लावायला. तसं पाहायला गेलं तर धारवाले सुद्धा आहेत तरी कुठे आता! अजून अशीच एक कला व कौशल्य हळूहळू लुप्त होत चाललेलं आहे.
मला आज भेटलेले हे श्री. यंदलकर, गेली ३५-४० वर्ष हा व्यवसाय करतात. सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत धारवाले म्हणून व्यवसाय करतात. गणेशजी दुपारनंतर एका नामवंत वकिलाकडे कार्यालयात कर्मचारी म्हणून काम करतात. कौतुकाची बाब म्हणजे ते लहानपणापासून हे धार लावण्याचं काम करत आहेत. सध्या या धारेतून तसा धंदा होत नाही, पैसेही फारसे मिळत नाहीत. तरीही ही कला हे कौशल्य जिवंत राहवं, पुढच्या पिढीला कळावं म्हणून ते आवर्जून आठवड्यातील काही दिवस पुणे शहरातील विविध भागात फिरून धार लावण्याचं काम करतात आणि "धारवाले काका" म्हणून प्रसिद्ध आहेत.
फोटो, व्हिडिओ काढून आणि माहिती घेऊन निघालो. काका म्हणाले "साहेब, प्रत्येक सुरी- कात्री मागे किती रुपये मिळतात हयापेक्षा धार लावण्याची आणि लावण्यासाठी वापरत असलेली आजोबांपासूनची ही सायकल चालती बोलती राहते आणि तिची धार लावण्याची कला जिवंत राहते हाच अनमोल मोबदला आहे"
खरंच ह्या शब्दांनी निघता निघता माझ्या विचारांनाही धार लावून गेले.
- मिलिंद सहस्रबुद्धे
२१-०५-२०२२
ता.क.
आणि हो..तुम्हाला जिभेची धार बघायची असेल तर, दुपारी १ ते ४ वेळेत पुण्यात पेठेतल्या कोणत्याही घरी जाऊन पत्ता विचारा..




Thursday, March 17, 2022

फाइल्स Reopened - Kashmir Files

 #latepostednow

फाइल्स Reopened

सिनेमाची सुरुवात त्याच्या क्लायमॅक्स पासूनच होते. ती सुरुवात होते तुमच्या आमच्या मनात.
सिनेमाचा शेवटचा सीन संपतो आणि अचानक दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री अशी पाटी येते. खरं सांगायचं तर आधीच्या तीन तासात आपण कलम ३७० आणि काश्मीरमय होऊन जातो.
१९९०च्या काश्मीरमधील आपण जणू एखादा स्टींग ऑपरेशनचा कॅमेरा किंवा खोर्यातील पानझडी झालेलं सूरुचं झाड झालेलो असतो. एक एक प्रसंग पुढे पुढे सरकत असतात आणि साधारण पावणेतीन तास झाल्यावर अंगावर काटा आणणार्या एका प्रसंगानंतर अचानक ब्लॅक आऊट होतं. "फिल्म निर्माण विवेक अग्निहोत्री" अशी पाटी येते. अख्खं थिएटर भानावर येत. एकदम लक्षात येतं की
"अरेच्या आपण थिएटरच्या खुर्चीत बसलो आहोत". लाइट्स ऑन होतात. प्रेक्षक जागेवरच बसलेले दिसतात. काही मिनिटांनी एक एक जण उठत जातो. आपणही थिएटरच्या बाहेर पडतो. परंतु सिनेमाला इथूनच सुरुवात झालेली असते. तीन तास बघितलेला विविध पात्रांचा, प्रसंगांचा, ठिकाणांचा आणि वातावरणाचा एक मुक सिनेमा आपल्या प्रत्येकाचा मनात सुरू होतो.
तसं पाहिला गेलं तर १९९० साल म्हणजे फारसं लांब नाही. इतिहासात गणण्याजोगं तर अजिबातच नाही. एवढं सगळं भीषण चित्र आणि क्रुर घटना आपल्या देशाच्या एका मोठ्या राज्यात घडत होत्या. भारताच्याच नागरिकांवर भारतातच अत्याचार होत होते आणि ते सुद्धा स्वतंत्र भारतात. एका बुध्दी संपन्न आणि शांत संयमी समाजाच्या ह्या लोकांना उंदीर-घुशींना मारांवं आणि पळवून लावांवं अशा क्रूर पद्धतीने पळवून लावलं जात होतं.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गमजा मारणारा आणि राजकीय अभिनिवेश अभिमानाने बाळगणारा समाज ह्या सगळ्या अत्याचाराकडे जाणून बुजून कानाडोळा करत होता.
समाज आणि प्रसार माध्यमं नेहमीपेक्षा खालच्या पातळीवर जाऊन सोयीची भूमिका घेत होती. तेथे घडलेली प्रत्येक घटनाही तेवढीच बर्फासारखी थंड रक्त गोठविणारी ह़ोती. ते सर्व पाहिल्यावर गेली तीस वर्षे हया संवेदनशील विषयावर आपला देश, काश्मीरच्या बर्फासारखा थंड होता ह्याचं वाईट वाटतं.
सिनेमातील प्रत्येक प्रसंग मनात विचारांची आंदोलनं आणि काहूर निर्माण करतो. मध्यंतराच्या आधीचा प्रसंग तर तुम्हाला पॉपकार्न आणि पेप्सी आणण्यासाठी उठायचं असतं हेच विसरून टाकतो. आपण आणि आपल्या आजूबाजूचे मध्यंतर झाला तरी खुर्चीवरच खिळलेले असतात. मला खात्री आहे विविध थिएटर मधील पॉपकार्न आणि पेप्सी विक्रेते देखील मध्यांतरात वाट बघत असतील. कारण पब्लिक इतकं थिजून जातं की मध्यंतरला बाहेर येतच नाही आणि त्यांचा धंदाही होत नाही. हा सुद्धा एक अनुभव हा सिनेमा देऊन जातो.
वास्तविक पाहता माझ्या मते ह्या सिनेमाचे खरे दोन हिरो आहेत. पहिला अनुपम खेर आणि दुसरा चिन्मय मांडलेकर. सिनेमाच्या पहिल्या पाच मिनिटाच्या फ्रेमपासून ते अगदी शेवटच्या फ्रेम पर्यंत मनात ते दोघं सतत वावरतात आणि लक्षात राहतात. बिट्टा (चिन्मय) आणि पुष्कर (अनुपम).
अनुपम खेर एक स्वतः चतुरस्त्र आणि प्रतिभावान अभिनेता आहेत. त्यांच्याबद्दल लिहिणे म्हणजे कागदावर पुन्हा तीच शाई माझ्या Font मधे उतरवण्यासारखे आहे.
आझादीच्या गदारोळात, स्कूटर चालवत आणि महाशिवरात्रीच्या शंकराच्या गेटअपमध्ये खेर साहेबांच्या चेहऱ्यावरचे भीतीचे भाव तुम्हाला सुरवातीलाच पुढील कित्येक भयानक प्रसंगाची जाणीव करून देतात. मनावर झालेले खोल आघात स्वतःच्या डोळ्यासमोर पाहिलेली बीभत्स (हा शब्द सुद्धा कमी पडावा) अशी क्रूरता त्यामुळे सतत एका भीतीच्या सावटाखाली वावरणारं पुष्करचं पात्र. Dementia झाल्यावर कश्मीरी भाषेतील "ये रे माझ्या बर्फा" हे गाणे गुणगुणताना त्यांचं झालेले लहान मुलासारखं रूप सुन्न करुन टाकतं.
चिन्मय मांडलेकर, मराठीतला आपला माणूस. प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता. सर्वसाधारण चेहरा, आवाज आणि तशीच शरीरयष्टी. परंतु अभिनय अन्यन साधारण आणि विलक्षण भेदक. मराठीत "लोकमान्य" सारख्या चित्रपटात प्रखर राष्ट्रप्रेम आणि जाज्वल्य देशाभिमान उत्तुंग साकारणारा चिन्मय इथे एकदमच विरुद्ध अशा एका आतंकवाद्यांच्या भूमिकेत जबरी भाव खाऊन जातो. काश्मीर फाईल्समध्ये बीट्टा नावाचा converted आतंकवादाच्या भूमिकेत त्यानी मेहनतीने तेवढीच क्रूरता आणि भीती जीवंत केलीय. त्याच्या सतत हातात असलेल्या रायफलनेच (तो जसा निर्दयपणे इतरांचे करतो) तसा त्याचा शिरच्छेद करावा असं थिएटर मधील प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात संपूर्ण तीन तास वाटत राहतं.
एकाच डोळ्याची पापणी बारीक लपकवत तो थंडरक्ताचा भीषण दहशतवाद संवादातून साकारतो. तेव्हा चिन्मय मांडलेकर मराठी रंगभूमीची ताकद काय आहे हे आपल्या अभिनयाने संपूर्ण जगाला दाखवून देतो. त्यानी पकडलेला कश्मीरी तर अर्धवट इंग्लिश भाषेचा लहेजा (बेअरींग) कौतुकास्पद. त्याच्या डोळ्यातील बीभत्स भीती आपल्याला आतून-बाहेरून हादरवून टाकते.
अर्थात पल्लवी जोशी, मिथुनदा आणि दर्शन कुमार सहीत इतर छोट्या मोठ्या कलाकारांनी देखील आपापल्या ‌चपखल अभिनयाने हा प्रवास जीवंत केलाय. विवेक अग्निहोत्रीचे धैर्य कौतुकास्पद आहेच. त्याच बरोबर कथेला मेलोड्रामाटिक न करता, त्या वेळची कश्मिरमधील परिस्थितीची प्रेक्षकांना स्वानुभुती दिली आहे.
एका प्रसंगात refugee camp मध्ये तत्कालीन गृहमंत्री दौरा करताना, एक महिला पुढे येऊन म्हणते "महाराष्ट्र मे बाळासाहेब ठाकरे ने कश्मीर बच्चों को शैक्षणिक संस्था मे कोटा दिया हैं." बाळासाहेबांचं नाव ऐकताच आपल्या मराठी माणसाच्या पोटात जे काय हालतं ना ते फक्त सिनेमा बघतांनाच अनुभवावं असं आहे. ह्या एका व अश्या अनेक हृदयस्पर्शी dailogue च्या अनुभवांसाठी हा सिनेमा जरूर बघावा.
बाळासाहेबांबद्दलचं हे वाक्य ऐकल्यावर आठवतं अरे हो की साधारण १९९४ नंतर महाराष्ट्रातील बहुतांश इंजिनिअरिंग कॉलेजेस मध्ये वर्गात दोन चार तरी रैना, भट, पंडिता नावाचे तरुण-तरुणी दिसू लागले होते.
मनात सुरू झालेलल्या चित्रपटाचा प्रवास हा ज्याचा त्याचा होत रहातो. कुणाचा तीन-चार तासाचा होतो तर काही जणांचा दोन-तीन दिवसही संपतं नाही.
एक मात्र नक्की प्रत्येकाच्या मनात सुरू झालेला सिनेमा सरतेशेवटी एक निश्चय आवर्जून करतो. हयापुढे भारतातील कोणतेही राज्य अशाप्रकारे बळकावले जाऊन अमानुष हिंसाचाराच्या तोंडी जाणार नाही. तर पुढील तीस-चाळीस वर्षांनी अजून एखाद्या राज्याचा *फाइल्स* नावाने कुणी एखादा अग्निहोत्री सिनेमा काढणार नाही.
-- मिलिंद सहस्रबुद्धे
१७/०३/२०२२

Saturday, January 29, 2022

अनिल अवचट - मी आणि बाबा

 मी आणि बाबा


खरंच असं जगता येईल का? हा एकमेव प्रश्न मनात घर करून राहिला. काल शाळेच्या व्हाट्सअप ग्रुप वर सदर दिलेला फोटो open केला.

वाचून झाल्यावर नेहमीप्रमाणे अजून दोन चार ग्रुप वर "शास्त्र असतं ते" नियमाप्रमाणे Forward देखील केला.
इतका सोपं असू शकतं का जगणं? विचार करणं? असं सतत मनाला वाटत राहीलं. घरासमोरची काढलेली सुंदर रांगोळी, कौतुक करायला "अरे वा छान काढलीय" "आज 32 ठिपक्यांची का?" "रंग मस्त भरलेत" वगैरे म्हणणारं कोणीही नाही. परत कुणीतरी येणारा जाणारा चालतांना चुकून पुसून जाणार. तरीही कोणतीही चिडचिड, मनात खंत न बाळगता उद्या तशीच नवीन सुंदर रांगोळी काढायची. काय असेल ना!
अनिल अवचट (बाबा), त्यांनी जे मुलाखतीत म्हटलंय ते आत्मसात करणं खूप अवघड आहे. सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात म्हणाल तर Impossible आहे. स्वतःच्या आई कडून शिकलेली "आनंदी राहण्याची" गोष्ट कदाचित त्यांच्या रक्तात कायमची भिनून गेली असावी. "एखादी गोष्ट करताना जो आनंद मिळतो तोच आपला आनंद बाकी कोणी कौतुक केलं पाहिजे असं काही नाही" हे जीवनाचं मुल्य ठरवून बाबा कायम जगले. म्हणूनच अनिल सरांचं कधीही सोशल मीडिया वर असलेले एखाद्य अकाऊंट किंवा स्वतःची वेबसाईट अथवा ब्लॉग असल्याचं ऐकिवात वाचनात आलं नाही. त्यावरून प्रदर्शित केले जाणारे त्यांचे विचार वैगरे वैगरे.
विविध कला आणि कार्यकुशल असलेले त्यांचे हात आणि मन (विचार) यामुळे ते कायमच जमिनीवर जोडलेले आणि जमिनीवरच जगलेले राहिले.
आज मी जराशी जरी एखादी वेगळी गोष्ट केली की कधी एकदा ती सोशल मीडियावर पोस्ट करतोय हयाची घाई झालेली असते. त्यावर किती लाईक्स मिळत आहेत किती कॉमेंट येतात यावरून माझ्या आनंद आणि दुःखाचा Barometer वर खाली होत असतो. हे सगळं कॉमेंट्स आणि लाईक्स कधीकधी 'अब तक छप्पन' वाल्या नायक ची आठवण करून देतात. एन्काऊंटर नंबरच्या नादात तो नायक माणुसकीच्या सीमा तर ओलांडत नाही ना असे जसं आपल्याला वाटतं; अगदी तसंच लाईक आणि कमेंट च्या नादात ती गोष्ट करताना जो आनंद मिळाला होता तो तर आपण नंतर हरवून बसत नाही ना हा विचार मनाला सतत भेडसावतो. हे असे सकस विचार वाचल्यानंतर.
'जगाला तुम्ही ओरडून, ओढून-ताणून सांगण्यापेक्षा जगाने तुम्ही आहात हे सांगणं महत्त्वाचं'. अर्थातच सध्याच्या काळात हे वाक्य एखाद्याला सुविचार वाटू शकते.
मी एखादा लेख लिहितो, कविता लिहितो अजून काही स्फुटलेखन करतो त्यातून जो आनंद मिळतो तो मिळतोच. मनातील अस्वस्थता, स्वस्थता, कधी सुचलेला वेगळा विचार मांडतो. नक्कीच प्रोसेस मध्ये जे काय चालू असतं ते कुठे तरी एका बाजूला आनंद देत असतंच. परंतु दुसऱ्या बाजूला ( back of the mind) हे सगळे सोशल मीडियावर पोस्ट केल्यावर काय होईल याचाही विचार असतोच. (अर्थात आत्ता सुद्धा ते चालू आहे हे मात्र खरं)
गिरीश कुबेर एकदा म्हणाले होते की मी एखादं पुस्तक, लेख लिहून प्रकाशित केला की मी सोडून देतो. त्याच्याकडे बघत नाही येणाऱ्या चांगल्या वाईट प्रतिक्रिया वाचत नाही. कला किंवा कृती घडण्याला आणि घडवणार्याला महत्त्व असतं. त्या कलेचं-कृतीचं अस्तित्व हे त्या प्रोसेस मध्ये किती आनंद मिळाला हयावर अवलंबून असतं. ना की नंतर त्याचं काय झालं. तो आनंद जितका अधिक तितकी ती कला अथवा कृती सकारात्मकरीत्या जगासमोर येते.
अनिल सरांचे आयुष्य हे असंच विविध कृतीतून मिळणाऱ्या आनंदात गेले. डॉक्टरकीचा अभ्यासापासून ते मुक्तांगणचं अफाट कार्य. विविध विषयांवर पुस्तक लेखन आणि सतत चालणाऱ्या हाताने केलेली ओरेगामी. समाजातील विविध वर्गांच्या व्यथा जवळून बघितल्यामुळे बाबांच्या मनातील अस्वस्थता हातावाटे ओरिगामीतून प्रतीत झाली. मनात साठलेलं कारुण्य अथवा दुःख बासरी वाटे आनंद स्वरात बाहेर आलं.
ओतूर सारख्या छोट्या खेड्यातून 'पुणे' नावाच्या भल्या मोठ्या शहरात गाजावाजा न करता प्रस्थापित होतांना बाबांना हयाच प्रोसेस मधून मिळणाऱ्या आनंदाने आपलासा वाटणारा बाप माणूस म्हणून नावलौकिक मिळवून दिला.
मी स्वतः अनिल सरांना कधी प्रत्यक्ष भेटलो नाही. त्यांची बहुतांशी पुस्तक जरूर वाचली आहेत. कधीतरी कुठल्या कार्यक्रमात त्यांची भाषणं, विचार ऐकले आहेत. त्यांच्या त्या जाड भिंगाच्या चष्म्यातून कायम कुतूहल जागं असणारी नजर आणि मोठ्या दातांचा दर्शन घडवणारा तो हसरा चेहरा कायमच 'आनंद किती निरागस' असू शकतो हयाची जाणीव करून द्यायचा हे मात्र नक्की.
साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचे एक मूर्तिमंत रूप म्हणजे मुक्तांगणचे "बाबा" अनिल अवचट सर. आयुष्य हे किती साधेपणाने जगता येतं हे अवचटांच्या मुलीं इतकं सविस्तर कोणीही सांगू शकणार नाही.
लोकसत्ताच्या त्यांच्यावरील अग्रलेखातील एक वाक्य त्यांच्या सामाजिक आणि वैयक्तिक जीवनाचं दर्शन घडवतं....
"डावे-उजवे 'मधले' असे विचारधारांच्या क्षेत्रातले प्रवाह तेव्हाही होते (अनिल सरांच्या उमेदीच्या काळात) पण विचारधारा ही जगाकडे पाहण्याची खिडकी आहे प्रत्यक्ष जग नाही हे कळण्याचे भान अवचटांना होतं"
नावाप्रमाणेच बाबा अनिल होते..वार्याची एखादी हलकी झुळूक देखील जो आनंद देऊन जाते. तसं बाबांचं होतं, विविध क्षेत्रातील त्यांचं साधं हलकं फुलकं अस्तित्व वेगळाच अनुभव देऊन जातं.
--मिलिंद सहस्रबुद्धे
२९/०१/२०२२
ता. क. - हा लेख म्हणजे अवचट सरांनी आनंदाची नवीन व्याख्या आम्हाला सोप्या समजेल अशा भाषेत सांगितल्याबद्दल ही त्यांना स्तुती सुमनांजली आहे.

Saturday, January 22, 2022

Adv OR Skip Ad ->>

 Adv OR Skip Ad ->>

दररोज सकाळी दारात पडणारं वर्तमानपत्र आणि ठरलेला तक्रार वजा संवाद "हल्ली ना, पेपरात जाहिरातीच जास्त आणि बातम्या कमी." संध्याकाळी ठरलेल्या वेळेत लागोपाठ चार सिरीयल बघणाऱ्या बायकासुद्धा जाहिराती आल्या की एक प्रकारे चिडतात. "काय बाई अर्धा तासाची सीरीअल आणि जाहीरातीच निम्म्यावेळ..मग चालणारच ह्या वर्ष वर्ष भर." एवढं सगळं असलं तरी आपण नियमितपणे वर्तमानपत्र घेत असतो, रोज पुन्हा नव्याने सीरीअल बघणं चालूच असतं. वर्षभराच्या सवलतीवर मिळते म्हणून अजूनपण एखादे वर्तमानपत्र आपण लावतो आणि लागोपाठ चार चार सिरीयल बघत असतो. मग हया जाहिरातींचं एवढा वाईट का वाटतं?
जाहिरात म्हटलं की मला मी आठवतं ते म्हणजे लहानपणी पेपर वाचायला लागलो की आई-बाबा ओरडायचे "काय रे! काय बघतोयस? त्या सिनेमा नाटकाच्या जाहिराती बघू नको सारख्या." त्याकाळीसुद्धा ठराविक पानांवर पानभर नाटक सिनेमाच्या भरगच्च जाहिराती असत. त्यात आपण किशोर वयात कोणत्या बघायचो हे तुम्हाला नक्की आठवत असणार.
आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य घटक म्हणजे जाहिरात. कदाचित आपण आपली बरीचशी मतं हया जाहिरातींवर ठरवतो. कधी चुकतो तर कधी बरोबर ठरतो‌. पेपरातली छापील असेल, रस्त्यावर लावलेल्या फलकावरील, टेलिव्हिजनवर अथवा आता सोशल मिडीयावर केल्या जाणाऱ्या जाहिरातींचा भडीमार सहन करत आपण आपल्या आवडीनिवडी ठरवत असतो.
कित्येक वेळा हया जाहिरातीच आपल्याला एखादा प्रायोजित कार्यक्रमापेक्षा आवडायला लागतात. रोजच्या डेली सोप सिरीयलच्या दर पाच मिनिटांनी येणाऱ्या ब्रेक मध्ये कोणत्या जाहिराती येतील हे सुद्धा सर्वांना पाठ असते. घराघरातील लहान मुलं अगदी परवाचा आणि पाढे पाठ असावेत अश्या तोंडपाठ जाहिराती म्हणून दाखवतात. त्यावर कौतुकाची थापपण मिळते कधी कधी.
काही जाहिराती मात्र आपल्याला वर्षानुवर्षे लक्षात राहतात. मग तो मर्फी रेडिओ बॉय असेल किंवा पार्ले जी चं बाळ. पेपरातील छापीलपेक्षा सुध्दा टीव्ही नवीन आला आणि घरोघरी पसरला तेव्हापासून Digjam Suitings चा दाढीवाला शेखर कपूर, Boost is the secret of my Energy म्हणणारा कपिल देव. कॅडबरीचा एक तुकडा डोळे मिटून तोंडात टाकून बाउंड्री वरून उडी मारून स्कर्ट उडवत मैदानात नाचणारी ते सौंदर्यवती, सौंदर्य साबून वाली निरमा गर्ल. विक्स की गोली लो खीच खिच दूर करो म्हणणारी छोटी मुलगी. Surf Excel खरीदनेमेही समझदारी है म्हणणारी तब्बसुम उर्फ ललिताजी. बुलंद भारत की बुलंद तसबीर मधला बजाज चेतकचं हैडल फिलवणारा छोटा शीख मुलगा. वाह उस्ताद वाह म्हणत ताज चहाचा आस्वाद घेणारे झाकीर उस्ताद असतील. Neighbours envy owners pride वाला तो शिंग असलेला ONIDA चा टकला माणूस. (खरं सांगू का त्याकाळी आपण एवढे इंग्रजाळलेले नसल्याने, त्या Neighbours envy owners pride चा अर्थ कळायचा नाही पण तो टकला आवडायचा), ये दिल मांगे मोअर पेप्सीवाला शाहरुख.....
अश्या अनेक आणि विविध जाहिरातींचा आपल्या मनावर एक कायमचा पगडा आणि परिणाम निर्माण झालेला आहे. आपण तीच वस्तू किंवा सुविधा वापरत असो वा नसो पण एखादी जाहिरात आपलीशी वाटते एवढं मात्र नक्की .
शेवटी जाहिरात म्हणजे काय तर तीन तासाच्या सिनेमात जे प्रदिर्घ दाखवून प्रेक्षकांच्या मनात बिंबवायचे आहे ते केवळ तीस सेकंदात तोच Effect आणि Impact निर्माण करणे. अतिशय कौशल्यपुर्ण आणि अवघड अशी हि कला आहे.
वर्तमानपत्रात या जाहिरातींची पानं ठरलेली असतात. दुसऱ्या आणि चौथ्या पानावर नोकरी, जागा, पर्यटन, सहली इत्यादी देणे-घेणे विषयांवर असतात. तर सात नंबरचं पान कायम नाटक सिनेमाला दिलेलं असतं. इतर पानांच्या खालच्या किंवा कोपऱ्यातल्या बाजूला विविध क्लासेस हॉटेल्स इत्यादींच्या जाहिराती. हल्ली पहिलं आणि मागचं अर्धपान हे एखाद्या वाहनाची एखाद्या घराच्या स्कीमची किंवा ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट च्या सेवेस वाहिलेलं. आपण किती नाही म्हणालो तरी आपण आपल्याच नकळत या जाहिराती चवीने वाचत आणि बघत असतो. अर्थात मनुष्यस्वभाव जे काही चकचकीत चमचमीत दिसेल तिकडे पहिले आकर्षित होतो. मग ते चकाकणारे पितांबरी चे पितळे का असेना.
जाहिरातीचा पहिला प्रयोग रोम मध्ये झाला होता. रोममधील दुकानदार त्यांच्या दुकानाची जाहिरात दाराबाहेर पाटी लावून करत असंत आणि अजूनही ती पद्धत चालूच आहे. मध्ययुगात तेराव्या शतकात लंडनमध्ये भिंतीवर एका दुकानदाराने तो विकत असलेल्या धार्मिक पुस्तक, मेणबत्त्या अत्तर हयांची जाहिरात चिटकवल्याची माहिती मिळते.
संशोधकांच्या मते सतराव्या शतकात वर्तमानपत्राचा उदय झाला तेव्हापासून साधारण जाहिरातींचा उगम झाला. त्यांची प्रसिद्धी वाढत गेली वर्तमानपत्र हे असे माध्यम होते की जे घराघरात पोहोचत होते आणि अजूनही ते तसेच आहे. १७१३ साली लंडन न्यूज पेपर मध्ये पहिल्यांदा जाहिरात स्वीकारण्यात आली आणि छापण्यात आली. पुढे १९२० च्या सुमारास रेडिओचा शोध लावल्यानंतर श्राव्य जाहिरातींचा जन्म झाला. छापील ते श्राव्य असा हा प्रवास सतराव्या ते एकोणिसाव्या शतकातला.
रेडिओच्या काळात बिनाका-सिबाका गीतमाला लोकांची पाठ होती. अमीन सायानी सारखे साहेबांचा आवाजाची कित्येक जण नक्कल करायचे त्याच वेळेस त्या गीतमालेत मधे मधे डोकावणाऱ्या श्राव्य जाहिराती सुद्धा जनमानसात शब्द आणि स्टाईल सकट तोंडपाठ होत्या.
१९५० ला टीव्हीच्या आगमनाने जाहिरात क्षेत्रात आमूलाग्र क्रांती घडवली ती दृकश्राव्य जाहिरातींची. अर्थात भारतात ही क्रांती पोहोचायला जवळपास ८०चे दशक उजाडले. टिव्ही घराघरात पोहचला. सर्व कुटुंबासमवेत एकत्र टीव्ही बघणे हा एक दैनंदिन उपक्रम झाला. त्याचा फायदा जाहिरा क्षेत्राला होत गेला. भारतात टेलिव्हिजनवर पहिल्यांदा १९७६ साली ग्वालियर सुटिंगची जाहिरात प्रदर्शित झाली होती.
या क्षेत्रात अत्यल्प वर्षांमध्येच क्रांती घडत गेली सुरुवातीला मौखिक मग छापील मग श्राव्य आणि दृकश्राव्य स्वरूपातील विविध जाहिरातींचे रूप आपण अनुभवत आहोत. आता तर आपला मोबाईल फोन चालू केल्या केल्याच एखादी नको असलेली जाहिरात सुद्धा दिसते आणि ती जाहिराती आपल्याला नकोय ह्यासाठी गुगल ला रिक्वेस्ट टाकावे लागते.
Skip advt चा option आपल्याला टीव्ही किंवा वर्तमानपत्रात मिळत नाही.
हा Skip advt चा option त्याकाळी नसल्यामुळे. वेळ Skip करण्यासाठी आम्ही लहानपणी जाहिरात जाहिरात खेळायचो. म्हणजे काय तर टीव्हीवर अथवा रेडिओवर दोन कार्यक्रमांमध्ये अथवा सिनेमाच्या मध्यंतरात मध्ये येणाऱ्या सात-आठ जाहिराती. मग नंबर नुसार पहिली जाहिरात हयाची दुसरी त्याची तिसरी तिची असा क्रम लावलेला. खूप मजा यायची कारण उत्सुकता असायची कोणाला कोणती येणार ह्याची. कोणाला Cadbury, toothpaste, साबण तर बाईक. नाही तर कोणाला दंतमंजन सुद्धा यायचे. आपल्याला जी जाहिरात मिळाली त्यातली वस्तू सुद्धा आपलीच झाली आहे की आपण त्या वस्तूचे मालक आहोत अशाच आविर्भावात आम्ही खुश व्हायचो. त्यावेळी खुष होण्याची आभाळंसुध्दा ठेंगणी होती. लगेच हात पोचायचे.
जाहिरात क्षेत्र हे सर्वात मोठे व्यवसायिक क्षेत्र आहे. त्याची वार्षिक उलाढाल साठ हजार कोटी भारतीय रुपये इतकी आहे. त्यात काम करणारे आणि त्यावर अवलंबून असलेले साधारण शंभर करोड लोकांची रोजीरोटी चालते. मात्र त्याच्या इतकं सुप्रसिद्ध पण तितकच बदनाम क्षेत्र कोणतंच नाही. इथं जी मॉडेल अर्थात स्त्री किंवा पुरुष हे उदबत्ती अथवा चहाच्या जाहिरातीत दिसते तीच व्यक्ती काही काळाने एखाद्या अंतर्वस्त्राच्या किंवा व्हिस्कीच्या च्या जाहिरातीत दिसू शकते. हया क्षेत्रातील राजकारण आणि काही प्रमाणात चालणारे पडद्यामागचे चाळे हयांनी या क्षेत्राला थोडंफार बदनाम केलेलं आहे.
जाहिरातीमधील एक पंच लाइन (Tag Line) सुद्धा एखाद्या कंपनीच्या Product अथवा Service चा खप किंवा प्रसिद्धी बदलवून टाकते. नाना पाटेकरचा तो सुप्रसिद्ध डायलॉग इथं तंतोतंत फिट बसतो, "साला एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है". तसं पंचलाईन मधला एक चपखल अथवा चुकीचा शब्द ते Product स्वर्गात कि नरकात पोचवायला कारणीभूत ठरू शकतो. ही ताकद आहे जाहिरातीची. जाहिरात म्हणजे विष अमृताचा खेळ आहे. चुकली तर विष घेऊन खाली बसायचं परत अमृत वेळ येईपर्यंत.
असो. अर्थात आता सर्वत्र येणाऱ्या बातम्या हया जाहिराती सारख्याच झाल्या आहेत. मग त्या वर्तमानपत्रात असतील टिव्ही चैनल वर अथवा सोशल मीडियावर असतील. त्या बातमीत कधी राजकीय पक्षाची जाहिरात डोकावते तर कधी एखाद्या पक्षाची विचारधारा झळकते. कधी एखाद्या धर्म किंवा जातीचा केलेला उदोउदो तर काही वेळेस एखाद्या व्यक्तीची ठरवून केलेले बदनामी किंवा स्तुती.
मग मला प्रश्न असा पडतो की, पेपरात जाहिराती जास्त आणि बातम्या कमी असं आपण म्हणतो खरं पण आता पेपरात "सर्वच ठिकाणी फक्त जाहिरातच असते तुम्ही फक्त ती बातमी म्हणून वाचत असता इतकंच"
--मिलिंद सहस्रबुद्धे
सदाशिव पेठ पुणे ३०


हम दो हमारे दो

 हम दो हमारे दो "कितने आदमी थे" "सरदार दो"  शोले सिनेमातला डायलॉग.  २०१४ च्या निवडणूक निकालानंतर प्रत्ययास आला आणि खूप प...