Skip to main content

ब्लॅक अँड व्हाईट

 "ब्लॅक अँड व्हाईट"

८० च्या दशकात भारतात जेव्हा टेलिव्हिजन आले तेव्हा ते ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होते. तरी त्यांचं काय ते कौतुक होतं. तुम्ही जरी ब्लॅक अँड व्हाईट बघत असलात तरी बघण्याची दृष्टी मात्र रंगीत होती. बातम्या देणारे निवेदक किंवा निवेदिका यांच्या कपड्यांचा रंग जरी दिसताना काळा पांढरा दिसत असला तरी बघणारे प्रेक्षकांच्या मनात मात्र ज्याचा त्याचा रंग असायचा. कोणाला तो लाल-पिवळा, जांभळा-निळा तर काळा दिसायचा. छायागीत बघताना वहिदाच्या मागे धावणारा देवानंद. त्याच्या हातभर शर्टावरचे चेक्स काळे पांढरे दिसले तरी देवानंद चाहत्यांना मात्र त्यात केशरी हिरवा तांबडा रंग दिसत होता. तर वहिदाच्या साडीवरची फुलं नारंगी आणि गुलबकक्षी रंगाची दिसायची. सांगण्याचे तात्पर्य असे की टीव्ही जरी ब्लॅक अँड व्हाईट होते तरी बघणारे आपापल्या परीने त्यात रंग भरत होते आणि आनंद घेत होते.
अशाच एका ब्लॅक टीव्हीचा २१व्या शतकात बघण्याचा योग परवा मुंबईमध्ये बीकेसीच्या मैदानावर पुन्हा आला. माननीय पंतप्रधान मोदीजी आणि आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे मंचावर एकत्र बसले होते. "एक पांढरी दाढी आणि एक काळी दाढी एका फ्रेम मध्ये". बघायला गेलं तर ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीच जणू. या ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही ची जादू समस्त मुंबईकरांनी आणि प्रसार माध्यमांमुळे महाराष्ट्राने त्या दिवशी अनुभवली.
दोघांनी जनतेला विविध रंगांची उधळण केली. मुंबईतील विविध मेट्रो लाईनच्या उद्घाटनात एक पिवळा आणि एक लाल रंग होताच. मोदीजीं नी मुंबईच्या विकासाला तिहेरी इंजिनची गरज असल्याची भूमिका अधोरेखित करताच, भाजपवासीयांना भगव्या-हिरवा पट्टा रंग दिसायला लागला आणि कमळाची आठवण आली. तर शिंदेजींनी मागील सरकारमधील विविध भ्रष्टाचार आणि अपूर्ण केलेली काम यांची यादी वाचून करडा रंग उलगडून दाखविला.
"स्वनिधी" सारखी अनोखी योजना अमलात आणून मोदीजींनी मुंबई ही अजून कशी रंगीबेरंगी होईल याची माहिती सांगितली. जर फेरीवाले, हातगाडीवाले, रस्त्यावरील छोटे दुकानदार ह्यांना अशा योजनेचा मुंबईत फायदा मिळाला तर नक्कीच विविध प्रांतातील रंग मुंबईत वाढत जातील. एक वेळ अशी येईल की या विविध रंगात मूळ मराठी भगवा रंग अत्यल्प प्रमाणात दिसू लागेल. असो. तशीही मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे इथं रुपयाच्या नोटेचे विविध रंगच महत्त्वाचे असतात आणि उपयोगाला येतात.
शिंदेजींच्या भाषणात अधून मधून डोकवणारा क्रांतीचा लाल रंग जणू कलानगर मध्ये होणाऱ्या सूर्यास्ताची आठवण करून देत होता. मोदीजी देशभर केलेल्या विकासाचा पाढा वाचतांना निळा पांढर्या रंगांची नक्षी श्रोत्यांच्या डोळ्यासमोर आली.
समोर बसलेला सागरासारखा अथांग जनसमुदाय आशेने या ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीची भाषणातून होणारी इंद्रधनुष्य रंगांची उधळण आपल्या डोळ्यात आणि कानात साठवत होता.
आपल्या रोजमराच्या जिंदगीत ह्या ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीने खरंच किती रंग भरतील याची शाश्वती मात्र त्याला अजूनही होत नव्हती. ह्या टीव्हीची अँटिना कधी कोणत्या दिशेला हालेल आणि मग सिग्नल येईनासा झाला तर या अंधूक भीतीनेच तो आपापल्या घरी गेला.
-----------
- मिलिंद सहस्रबुद्धे
२९-०१-२०२३
सदाशिव पेठ पुणे ३०
ता.क.
मराठी-इंग्रजी-हिंदी भाषा संभाळून घ्या. 🙏

Comments

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी

*आपण सारे अर्जुन*

*आपण सारे अर्जुन* © मिलिंद सहस्रबुद्धे                   गुरुवारी रामनवमी झाली होती आणि शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बहुतांश घरात लगबग सुरू होती. नऊच्या रामायणाची नाही तर नऊ वाजता देशाचे पंतप्रधान काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत आणि देशाच्या जनतेशी व्हिडिओकॉल द्वारे संवाद साधणार आहेत त्याची. प्रत्येक जण वाट बघत होता नऊ वाजण्याची आणि एकदाचे नऊ वाजले.  प्रत्येक न्युज चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुरू झाला. नेहमीप्रमाणे मोदींनी त्यांच्या शैलीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर भाष्य तर केलेच. खरंतर ते  बोलत असताना प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता की मोदी घोषणा काय करणार. भारतातल्या सवासौ करोड जनतेला आता मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवरून बोलतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करणार असं नक्की माहिती असते. आमच्या ह्या भाऊ चा धक्का आज काय दे धक्का देणार ह्याकडे सगळ्यांचं जीव मुठीत घेऊन लक्ष होतं. तसं पाहायला गेलं तर आदल्या दिवशी जेव्हा मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितलं होतं की मी उद्या सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. तेव्हापासूनच तर्क-वितर्कांचे घोडे वि