Skip to main content

लग्न वाढदिवस

 दिनांक: ०६ /०७/२०२२

वेळ: दुपारी ४:०० (चहाची)

स्थळ: अर्थातच सदाशिव पेठ पुणे ३०


मी: "किती झाली गं?" माहिती असूनही मी मुद्दामूनच विचारलं. 

ती: "लग्नाला १९ आणि भेटून २१ वर्ष. म्हणजे बेडीत अडकून १९ आणि चोरी करून २१"


मी: "शिकलीस की बोलायला"

ती: "हो का. तू ऐकायला शिकलायस असं म्हण"

मी: "अर्थातच. आपला वाद एकतर्फीच असतो. संवाद म्हणशील तर तो बहुमुखी आहे"

ती: " तो कसा काय बुवा?"


मी: "आपल्या संवादात आधी आई-बाबा असायचे (अर्थात माझे) आणि आता दोन्ही मुलंही सामील असतात. म्हणून बहुमुखी "

ती: "हो. हे मात्र खरं आहे. सुरुवातीला आई-बाबांचा तुला आधार असायचा आणि आता मुलंही तुझीच बाजू घेतात. तुझं कायमच बरं आहे."


मी हसतो. 

मी: "मग! मी आहेच तसा सर्वांना हवाहवासा"

ती: "हो ना आई मात्र कायम नको. तुझी नाही हा तुझ्या मुलांची आई असं म्हणतेय मी. तुझ्या आईच्या बाबतीत मात्र असं होत नाही कधी"


मी: "अगं, आजच्या दिवशी एवढं काय वाटून घेतेस. मी आपली सहज चेष्टा करतोय तुझी"

ती: "बरोबर आहे! अंगाशी आलं की चेष्टा करतोय किंवा चेष्टा चालू आहे असं म्हटलं की झालं"


मी: "तुला खरंच वाटतं का? असं असेल म्हणून. तू नसशील तर काय होईल हे तुला पण माहितीय आणि आम्हाला सगळ्यांना तर नक्कीच.  अर्थात ही वरवरची चेष्टा मस्करी म्हणजे चॉकलेटच्या वरचे रॅपर आहे. तु आमचं  आपलं गोड चॉकलेट आहेस.  हे तुझ्यावरचं गोड प्रेम आहे."

ती: "वा छान. झाला का जागा तुझ्यातला साहित्यिक. अलंकारीक शब्द आणि उपमा देऊन वाक्य रचना करायची. मग समोरच्याचा राग विरघळतो. पण बच्चू मी म्हणजे तुझी आई नव्हे तुझ्या मुलांची आई आहे बरं!"


मी: "मला वाटलंच तुला असं काहीतरी वाटणार. खरंच ते गोड चॉकलेट म्हणजे ना तू आहेस. अजून योग्य सांगायचं तर Eclair किंवा Melody चॉकलेट. चघळत राहिलो की त्याचा गोडवा अजूनच वाढत जातो. बघ ना सुरुवातीला चॉकलेट तोंडात टाकल्यावर नीट चवच लागत नाही कळतच नाही गोड आहे का अगोड. चॉकलेटचा फ्लेवर समजत नाही. जस जसं चघळत जातो नि तसं त्या चॉकलेट रॅपरच्या आतल्या पांढऱ्या कागदाची चिकटलेली चव निघून जाते आणि मग चॉकलेटचा गोडवा लागायला लागतो मग असं वाटतं की चॉकलेट संपूच नाही. तसंच काहीसं आहे आपलं प्रेम संसार मुलं सगळंच."


ती: "चल काहीतरीच हो तुझं! तू काय बोलशील ना खरंच."


मी: "अगं तसं नाही.  शप्पथ गेली २१ वर्ष तू अशीच मुरत गेलीस माझ्या जीवनात. सुरुवातीला सगळंच नवीन. त्या रॅपरच्या आतल्या पांढऱ्या कागदासारखं. आपलं प्रेम नवीन प्रेयसी म्हणून तुझा गोडवा निराळा. लग्नानंतर आई-बाबा आणि आपण दोघं असा चौकोनी संसार. तो पण नवीन. मग त्या चॉकलेटचा एक वेगळाच फ्लेवर. तो गोडवा हळूहळू वाढत गेला. काही वेळा चिवट, चिकटपणा दाढेत अडकला पण अर्थातच सामंजस्याने तो काढत परत आपण  चॉकलेट चघळत गेलो." 

आम्ही दोघंही शांत एकमेकांकडे बघत होतो पण शुन्यात...


मी: "पुढे मुलं झाली आणि मग परत माझ्या मुलांची आई म्हणून नव्या चॉकलेटच्या रूपात आलीस. हा एक नवीनच फ्लेवर होता तुझा. आज जशी मुलं वाढत गेली आहेत तसतसं परत या फ्लेवरच्या चॉकलेटचा पण गोडवा वाढत चाललाय. अर्थातच पुढे अजून किती विविध चॉकलेटच्या रूपात, फ्लेवर्स मध्ये तुला अनुभवायला मिळणारे ह्याची उत्सुकता कायम मनात आहे"

पटकन भानावर येत..

ती: "तुझ्या अशाच बोलण्यावर आणि समजावून सांगण्यावर भाळले होते मी. लहान होते तशी पण आज मात्र तेव्हा केलेल्या धाडसाचं माझं मीच मनात रोज कौतुक करते"


मी: "मग, सांगतो काय आहेच माझा प्रभाव हवाहवासा."


मी: "एक सांगू का? प्रत्येक वेळेस तुझ्या नवीन रूपातलं नवीन फ्लेवरचे चॉकलेट खाण्यासाठी दुकानातल्या बरणीकडे निरागसपणे बघणारा तो लहान मुलगाच आहे मी अजूनही." 

तुझाच एकमेव निस्सीम चाहता

- मिलिंद 


तन्मया, आपल्या दोघांना

लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा 

खुप प्रेम....

Comments

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी

*आपण सारे अर्जुन*

*आपण सारे अर्जुन* © मिलिंद सहस्रबुद्धे                   गुरुवारी रामनवमी झाली होती आणि शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बहुतांश घरात लगबग सुरू होती. नऊच्या रामायणाची नाही तर नऊ वाजता देशाचे पंतप्रधान काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत आणि देशाच्या जनतेशी व्हिडिओकॉल द्वारे संवाद साधणार आहेत त्याची. प्रत्येक जण वाट बघत होता नऊ वाजण्याची आणि एकदाचे नऊ वाजले.  प्रत्येक न्युज चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुरू झाला. नेहमीप्रमाणे मोदींनी त्यांच्या शैलीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर भाष्य तर केलेच. खरंतर ते  बोलत असताना प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता की मोदी घोषणा काय करणार. भारतातल्या सवासौ करोड जनतेला आता मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवरून बोलतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करणार असं नक्की माहिती असते. आमच्या ह्या भाऊ चा धक्का आज काय दे धक्का देणार ह्याकडे सगळ्यांचं जीव मुठीत घेऊन लक्ष होतं. तसं पाहायला गेलं तर आदल्या दिवशी जेव्हा मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितलं होतं की मी उद्या सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. तेव्हापासूनच तर्क-वितर्कांचे घोडे वि