Skip to main content

आठवणींचा कप्पा

 आठवणींचा कप्पा



दिवाळी - नरकचतुर्दशी पहिला दिवस
वातावरणात थंडीची चाहूल लागली असायची आणि हलक्या धुक्यात एक वेगळाच गंध पसरवून दिवाळी यायची.
"ह्या वर्षी रेनकोट कपाटात परत ठेवावे की नाही ह्याच विचारांच्या धुक्यात पुणेकर हरवून गेले आहेत."
आई आणि आजी हमखास आधी उठून, अभ्यंगस्नान, देवपूजा करून गोडधोड करत असायची. आपण कितीही लवकर उठलो तरी हया तयारच दिसायच्या, जणू आदल्या रात्री पासूनच असल्यासारख्या.
घराबाहेर पणत्या लावलेल्या असत. मोरी, शौचालय स्वच्छ धुउन त्यात पणत्या लावल्या जात. नरकासुराची नरकघाण स्वछ होउन सर्वत्र आरोग्य नांदो ही भावना.
"ही लाल विटकरी मातीची, आनंदाची, प्रेमाची, चैतन्याची पणती अजुनही घरोघरी तेवते आहे."
पहाटे आईच्या 'उठ रे आता' च्या हाकेने नाही तर धडाढधुढुम फटाक्यांनीच जाग यायची. लवकर पहाटे उठून पहिला फटका बौम्ब कोण फोडणार अशी चुरस असायची. मग काय पहाटे तीन साडेतीनला उठून पब्लिक एखादा सुतळी, लक्ष्मी फोडून परत झोपायचं. सकाळी एकमेकांकडे फराळ करत फिरतांना मीच कसा आधी तो फोडला ह्यावर चर्चा आणि धुव्वा.
अगदी सुर्योदय पुर्वी वगैरे नाही पण पहाटे पाच-साडेपाच वाजता जाग यायची. तेल-उटणं लावून, अभ्यंगस्नान करून सगळे तयार असायचे. मनसोक्त फटाके उडवायचे, ज्याला जे झेपतील(आर्थिक) तसे. म्हणजे कोणी लवंगी आख्खी माळ लावेल तर कोणी तीच माळ सुटी करून एक एक वाजवेल. फुलबाजी, भुईनळे, चक्र ह्यांची मात्र रेलचेल होती.
"गेल्या काही वर्षांत फटाके पर्यावरणवादी विचारांच्या पावसात भिजून गेलेत."
मोठी मंडळी नातेवाईकांना भेटून, फोन करून शुभेच्छा देत, चुरस तिथे पण होतीच.."काय मग किती वाजता उठलात आज?" हा प्रश्न आणि उत्तर मिळाल्यावर चेहऱ्यावरचे विविध भाव आणि चेष्टा ठरलेली.
"सध्या whatsapp वरच दिवाळी शुभेच्छांचे लाडू-करंज्या एकमेकांना भरवून आनंद मानला जातो. Facebook वर घरातल्या रांगोळी पासून ते लक्ष्मीपुजन आणि देवघरातील फोटो upload केल्यावर मिळणाऱ्या Likes च्या आशिर्वादाने मनं भरतात."
चिखलात मातीचा किल्ला करणे, खेळणी,चित्रे लावणे ह्यात दिवस कधीच संपून जायचा. आपला किल्ला आपली चित्रे शेजारच्या आळीतील, वाड्यातील, सोसायटी पेक्षा कशी भारी आहेत ह्याची स्पर्धा चार दिवस चालू असायची.
"किल्ले आता राजकीय स्पर्धांच्या तटबंदीत अडकलेले दिसतात. घरोघरी दरवर्षी माळ्यावरुन काढलेले किल्ल्याचे साचे सजवले जातात "
नाष्टा म्हणजे फराळंच. चिवडा, चकल्या, करंजी लाडू वगैरे. होटेल मध्ये जावून इडली सांबर अथवा पोहे-उपमा नव्हे.
घरच्या वडीलधारी मंडळीं बरोबर जवळपासच्या मंदिरात देवदर्शनाला जाणे. दिवाळी पहाटचे कार्यक्रम असे वेगळे काही नव्हते.
अशी समृद्ध सुरवात व्हायची दिवाळीची.
आता सर्वत्र समृध्दी आली आहे...
अजूनही त्या पहिल्या पहाटेची आपण सगळेच वर्षभर वाट बघतो. सुवासिक तेल-उटणं आणि मोती साबणाचा सुगंध मग वर्षभर मनात दरवळतो.
दर महिन्याला जरी कपडे विकत घेतले तरी दिवाळीच्या पहिल्या पहाटेला नवीन कपडे घालण्याचं सुख काही औरच. एरवी रोज जरी विविध चिवडा-लाडू, चकली स्टिक खात असलो तरी, दिवाळीत घरगुती फराळानी भरलेल्या ताटातील खोबर्याचा तुकडा असलेल्या चिवड्याची चव आईच्या हाताची जादु काय असते ह्याची अनुभुती देते.
काही बदल झाले, तर काही तसेच राहिले
काही माजी झाले, तर काही 5G झाले..
तरीही दिवाळीचा लखलखाट कायम आहे आणि राहील.
नव वर्षाचे तोरण बांधून दारी
लक्ष लक्ष दीप उजळत आली ।
सुखसमृद्धीची भरभराट होउनी
आनंदी समाधानी जावो हि दिवाळी ।
© मिलिंद सहस्रबुद्धे
सदाशिव पेठ पुणे ३०
२४-१०-२०२२

Comments

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी

*आपण सारे अर्जुन*

*आपण सारे अर्जुन* © मिलिंद सहस्रबुद्धे                   गुरुवारी रामनवमी झाली होती आणि शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बहुतांश घरात लगबग सुरू होती. नऊच्या रामायणाची नाही तर नऊ वाजता देशाचे पंतप्रधान काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत आणि देशाच्या जनतेशी व्हिडिओकॉल द्वारे संवाद साधणार आहेत त्याची. प्रत्येक जण वाट बघत होता नऊ वाजण्याची आणि एकदाचे नऊ वाजले.  प्रत्येक न्युज चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुरू झाला. नेहमीप्रमाणे मोदींनी त्यांच्या शैलीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर भाष्य तर केलेच. खरंतर ते  बोलत असताना प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता की मोदी घोषणा काय करणार. भारतातल्या सवासौ करोड जनतेला आता मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवरून बोलतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करणार असं नक्की माहिती असते. आमच्या ह्या भाऊ चा धक्का आज काय दे धक्का देणार ह्याकडे सगळ्यांचं जीव मुठीत घेऊन लक्ष होतं. तसं पाहायला गेलं तर आदल्या दिवशी जेव्हा मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितलं होतं की मी उद्या सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. तेव्हापासूनच तर्क-वितर्कांचे घोडे वि