Skip to main content

चौरंग

 चौरंग

वयोमानानुसार आणि विविध अनुभवांनी जीवन आपल्याला बरेच काय काय शिकवते..
कधी कधी आपणच अनावधाने केलेल्या चुका लक्षात येत नाहीत. पण निसर्गनियमाप्रमाणे परत आपल्याच बाबतीत असं घडल्यानंतर कुठेतरी आपण पण असं कधी वागलो होतं का असं वाटतं आणि आठवतात काही प्रसंग.
आपण एखाद्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये फॅमिली बरोबर छान डिनर करत बसलेलो असतो. आपण वर्ष दोन वर्षांपूर्वी अश्याच ओळखीच्या एका माणसाचा अडलेले काम करून दिलेलं असतं. तेव्हा तो माणूस चार वेळा आपल्याला भेटून एखादी भेटवस्तू देऊन थँक्यू म्हणून आपल्याशी नम्रतेने वागत असतो. नेमका आज हॉटेलमध्ये तोच माणूस, ती व्यक्ती त्याच्या मित्रांबरोबर बसलेली असते. आपली नजरानजर होते. आपण त्याला हात करतो. तोही आपल्याला छान हात करतो. क्षणभर आपल्याला वाटतं की तो आता आपल्या इथे येईल, आपल्याशी काय म्हणताय म्हणून दोन शब्द नक्की बोलेल. आपण आपल्या घरच्यांशी जुजबी ओळख करून देऊ वगैरे. पण तो मात्र आपल्याला हात करून नंतर मित्रांच्या गप्पांमध्ये रंगलेला दिसतो. हा तोच आहे ना नक्की असा आपल्याला चार वेळा प्रश्न पडतो. दोन वर्षापूर्वी घडलेल्या प्रसंगांमध्ये अजून अडकलेली असते प्रसंगांची आठवण.
ती आठवण निर्माण करते उपेक्षेतला अपेक्षाभंग.
मुलाला नोकरी मिळावी म्हणून बाप ओळखीच्यांच्या घरी आणि ऑफिसमध्ये खेटा घालत असतो. त्यांच्याच ओळखीने त्या मुलाला नोकरी मिळते. सुरुवातीला मुलगा पेढे वगैरे देतो. अगदी वाकून नमस्कार करतो. काही काळ संबंध ठेवतो. पुढे काही वर्षांनी बदली होऊन तेच ओळखीचे मुलाच्या गावात राहायला येतात. तेव्हा मात्र जुजबी ओळख असल्यासारखी त्या मुलाची वागणूक बदललेली असते.
मदतीला मोल नसतेच पण म्हणून नाममात्र किंमत ही नसावी ह्याची खंत वाटते.
असं का होत असेल काळानुरूप माणसं विसरतात. काळ जसजसा पुढे जातो तस तसे त्या गोष्टीचं, प्रसंगांचं महत्त्व माणसाच्या जीवनात तितकसं राहत नाही, जितकं त्या विशिष्ट वेळेस होतं. मग बहुतेक त्या माणसाचं महत्त्व देखील.
अर्थात त्या गोष्टीचे, प्रसंगाचे आणि त्या वेळेला असलेलं त्या माणसांचे महत्त्व हे वयानुसार बहुतेक जीर्ण होत जात असावं.
अशा वेळेस खरोखरच पु.लं देशपांडेंच्या नारायणाची आठवण येते. लग्नकार्यात राब राब रबलेला नारायण, लग्नानंतर कुठल्या अडगळीच्या खोलीत जाऊन झोपतो कोणालाच कळत नाही आणि आठवतही नाही. अगदी लग्नातल्या चौरंगा सारखा. त्या चौरंगाची आठवण पुन्हा येते ती फक्त पुढच्या सत्यनारायण पूजेला किंवा मंगल सोहळ्यातच.
केळीची पानं आणि रांगोळीने त्याची तोंड देखली सजावट केली जाते. कार्य पार पडलं की तोच चौरंग पोट माळ्यावर जाऊन पडतो.
"काही जणांच्या आयुष्यात आपण चौरंगासारखे असतो. एकदा का कार्यभाग साध्य झाला की हा चौरंग अडगळीत जाऊन पडतो"

एकदा का कार्यभाग साध्य झाला कि आठवण होत नाही ती ... ना देवळातल्या नारायणाची ना कार्यातल्या नारायणाची
- मिलिंद सहस्रबुद्धे
पुणे ३०

Comments

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी

*आपण सारे अर्जुन*

*आपण सारे अर्जुन* © मिलिंद सहस्रबुद्धे                   गुरुवारी रामनवमी झाली होती आणि शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बहुतांश घरात लगबग सुरू होती. नऊच्या रामायणाची नाही तर नऊ वाजता देशाचे पंतप्रधान काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत आणि देशाच्या जनतेशी व्हिडिओकॉल द्वारे संवाद साधणार आहेत त्याची. प्रत्येक जण वाट बघत होता नऊ वाजण्याची आणि एकदाचे नऊ वाजले.  प्रत्येक न्युज चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुरू झाला. नेहमीप्रमाणे मोदींनी त्यांच्या शैलीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर भाष्य तर केलेच. खरंतर ते  बोलत असताना प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता की मोदी घोषणा काय करणार. भारतातल्या सवासौ करोड जनतेला आता मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवरून बोलतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करणार असं नक्की माहिती असते. आमच्या ह्या भाऊ चा धक्का आज काय दे धक्का देणार ह्याकडे सगळ्यांचं जीव मुठीत घेऊन लक्ष होतं. तसं पाहायला गेलं तर आदल्या दिवशी जेव्हा मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितलं होतं की मी उद्या सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. तेव्हापासूनच तर्क-वितर्कांचे घोडे वि