Skip to main content

सुचणं

 #सुचणं

सुचलेल्या प्रतिभेची प्रतिमा जर कागदावर योग्य प्रकारे उमटवता आली, तर त्याचं उत्तम साहित्य व्हायला वेळ लागत नाही...

काही सुचतच नाही सध्या? "खूप दिवस झाले, तुझा एखादा लेख article आलं नाही Facebook वर". असं कोणी म्हटलं ना की मनात येतं "काय सांगू?" खूप विचार, खूप विषय मनात येतात आणि चमकून जातात. तेवढ्यापुरतं काहीतरी सुचतं परंतु नंतर पुढे मात्र वाढत नाही.

एखादा विषय सुचणं किंवा खरं सांगू का? बसलोय आणि सुचतं असं काहीच नसतं. जसं घरातले दिवे गेलेत, आपण अंधारात मेणबत्ती लावून बसलोय. अचानक पापणी लवताक्षणी पटकन दिवे येतात. ज्या खोलीत बसलोय तिथली ट्यूब पटकन पेटते. तसंच होतं. कोणीतरी काहीतरी बोलत असतं, आपण काहीतरी ऐकत असतो, बघत असतो किंवा वाचत असतो. समोरची बोलणारी व्यक्ती काहीतरी बोलून जाते आणि पटकन आपली ट्यूब पेटते. तोवर डोक्यातले दिवे गेलेलेच असतात. त्या खोलीतली ट्युब पेटली की आपण लगेच बाहेर बघतो. आजूबाजूचे दिवे मग एकामागोमाग पेटतात. अगदी तसंच होतं पहिली ट्यूब पेटते, डोक्यात विषय किंवा विचार क्लिक होतो. मग इतर दिवे जसे  पाठोपाठ लागतात तसं त्या विषयाच्या अनुषंगाने फटाफट पानभर सुचतं. त्यानंतर मग साकारतो तो झगमगाट, लखलखाट एखाद्या जमून आलेल्या लेखाचा, कवितेचा, गाण्याचा किंवा कथेचा.

कधी काय सुचेल, कोठे सुचेल हे सांगता येत नाही. प्रतिभा ही लहान मुलासारखी असते. काय प्रश्न विचारून ते लहान मूल आपल्या निरुत्तर करेल हे जसं सांगता येत नाही अगदी तसेच ती तुमच्या मनात कुठल्या विषयावरून कोणता विचार प्रकट करेल आणि सुचायला सुरुवात होईल हे सांगणं कठीण.

प्रत्येकाला काही ना काही तरी सुचतच असतं.  गेलेल्या दिव्यानंतर प्रत्येकाची ट्यूब पेटतेच. परंतु आजूबाजूला दिवे पटापट लागतीलच हे सांगता येत नाही. म्हणून तर ज्यांचे पुढचे दिवेपण पटापट पेटतात, ते लेखक, कवी, गीतकार असं काहीतरी होतात.

## सुचलेल्या प्रतिभेची प्रतिमा जर कागदावर योग्य प्रकारे उमटवता आली, तर त्याचं उत्तम साहित्य व्हायला वेळ लागत नाही ##

खूप वाचन करणारे खूप चांगलं लिहितातच असं नाही. मात्र जे चांगलं लिहितात ते नक्कीच बर्‍यापैकी वाचन करतात.

अडचण अथवा संकट ही जशी नवनिर्मितीची जननी असते. तसंच, एखादा अनुभव, एखादी कटुता किंवा अति आनंद आणि मग त्या क्षणी होणारी मनाची दोलायमान स्थिती हे एखाद्या चांगल्या साहित्याचं उगमस्थान असतं.

लिहिणाऱ्याला वयाच्या कोणत्या टप्प्यावर सुचेल हे सांगणे फार कठीण.  मी डॉक्टर होणार,  इंजिनियर किंवा आर्किटेक्ट होणार असं म्हणता येतं.  परंतु ठरवून कोणाला लेखक , कवी किंवा साहित्यिक होता येत नाही. 

एखादी व्यक्ती लेखक अथवा कवी झाली की त्या व्यक्तीने मनात आणलं तरी विचारांचा धबधबा कागदावर उतरवायचा थांबवू शकत नाही. अर्थातच जोपर्यंत ती प्रतिभा जिवंत आहे. प्रतिभा ही कायम येणाऱ्या जाणाऱ्या दिव्यासारखी असते. कधीकधी दिवे थोड्या वेळापुरते जातात तर कधी कधी खूप वेळ. इतर कुठल्याही बाहेरच्या इन्व्हर्टर चा उपयोग होत नाही. 

सध्या माझ्याकडचे दिवे बरेच दिवस गेले होते. अचानक "काही सुचतच नाही सध्या?" हया एका वाक्यावर आज "सुचणं" हयावर एवढं बरंच काही लिहून झालं.  माझ्या मेंदूतील MSEB नी आज खूप दिवसांनी काम केलं आणि फटकन दिवे आले.  ट्यूबतर पेटली, बाकी झगमगाट, लखलखाट झालाय की नाही हे शेवटी तुम्ही वाचकच ठरवाल.

© मिलिंद सहस्रबुद्धे

तळटीप- नेहमीप्रमाणे लिहायला गेलो, पण *सुचलंच* नाही. 😀

Comments

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी

*आपण सारे अर्जुन*

*आपण सारे अर्जुन* © मिलिंद सहस्रबुद्धे                   गुरुवारी रामनवमी झाली होती आणि शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बहुतांश घरात लगबग सुरू होती. नऊच्या रामायणाची नाही तर नऊ वाजता देशाचे पंतप्रधान काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत आणि देशाच्या जनतेशी व्हिडिओकॉल द्वारे संवाद साधणार आहेत त्याची. प्रत्येक जण वाट बघत होता नऊ वाजण्याची आणि एकदाचे नऊ वाजले.  प्रत्येक न्युज चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुरू झाला. नेहमीप्रमाणे मोदींनी त्यांच्या शैलीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर भाष्य तर केलेच. खरंतर ते  बोलत असताना प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता की मोदी घोषणा काय करणार. भारतातल्या सवासौ करोड जनतेला आता मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवरून बोलतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करणार असं नक्की माहिती असते. आमच्या ह्या भाऊ चा धक्का आज काय दे धक्का देणार ह्याकडे सगळ्यांचं जीव मुठीत घेऊन लक्ष होतं. तसं पाहायला गेलं तर आदल्या दिवशी जेव्हा मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितलं होतं की मी उद्या सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. तेव्हापासूनच तर्क-वितर्कांचे घोडे वि