Skip to main content

करोना संग्रामातील तात्या (राजेश) टोपे

 #कोरोनायोद्धा

*करोना संग्रामातील तात्या (राजेश) टोपे*

भारतात अठराशे सत्तावनचा स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व तात्या टोपे करत होते. तसेच सध्या महाराष्ट्रात कोरोना संग्रामाचे राजेश टोपे करत आहेत.  

Rajesh Tope

"कृपया माझ्या विधानाचा विपर्यास करू नका" त्यांची ही कळकळीची विनंती ऐकून मनात चलबिचल झाली. आजकालच्या प्रसारमाध्यमां समोर बोलताना भले भले जण घाबरतात. काही थोर मंडळी तर प्रसारमाध्यमांसमोर येत सुद्धा नाहीत. आपल्या कडून चुकून बोलून गेलेल्या वाक्याची चुकीची ब्रेकिंग न्यूज होऊ नये, या भीतीने त्यांनी त्यांची जीभ चावली.

आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे साहेब अशी कळकळीची विनंती करताना, त्यांना नक्कीच काही वर्षांपूर्वीची आठवण मनात झाली असेल. हयाच देशाच्या प्रसार माध्यमांनी आपल्या एका साध्या,सरळ, कार्यक्षम गृहमंत्र्यांची विकेट घेतली होती. तीसुद्धा अशाच एका संकटकाळात. 

मागील वर्षीच्या एप्रिलपासून हा माणूस सदैव अविरतपणे कोरोना विरुद्ध उभा ठाकला आहे. क्षणाचीही उसंत न घेता तो महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेची गेली १२ महिने अहोरात्र वाहून घेऊन सेवा करतोय. अतिशय कठीण प्रसंगांचा सामना करत असतांना देखील आपल्या नेतृत्व कौशल्याने ही कोरोनाची परिस्थिती सांभाळतोय. 

शरद पवार साहेबांना नेहमीच विविध प्रयोग करण्याची सवय आहे. त्यातील काही प्रयोग यशस्वी होतात तर काही फसतात. परंतु साहेबांचं वैशिष्ट्य हेच आहे की ते परत प्रयोग करायला घाबरत नाहीत आणि करायचे थांबत नाहीत. तरुण तडफदार परंतु मितभाषी असलेला, जमिनीवरचा एक आमदार राजेश टोपे यांना दिलेलं आरोग्य मंत्रीपद. हा साहेबांचा एक यशस्वी झालेला प्रयोग. अजूनही एक प्रयोग केला होता गृहमंत्रिपदाचा, परंतु तो सध्या तरी फसलाय असं वाटते. असो

सुसंस्कृत आणि कार्यक्षम असे "श्री राजेश टोपे". आज हया करोनाच्या "न भूतो न भविष्यती" संकटाचा सामना खंबीरपणे करत आहेत. हे सर्व करताना कोणतीही मोठ-मोठी जाहिरातबाजी न करता स्वतः कामाला झोकून देऊन हा माणूस चोवीस तास कार्यरत आहे. सध्याच्या बावचळलेला प्रसारमाध्यमांसमोर धीराने उभा राहून योग्य ती माहिती जनतेपर्यंत पोहचवत आहे. हातात माईक आणि चॅनल लिहून दिलेले चार प्रश्न विचारणे फार सोपं असते. परंतु राज्य, जिल्हा, शहर, तालुका ते पार ग्रामपंचायत पातळीवर आरोग्य व्यवस्थेचे नियोजन आणि नियंत्रण करणे फार अवघड आहे. हेच नियोजन आणि नियंत्रण टोपे साहेब अत्यंत कुशलतेने संभाळत आहेत. हे सगळं करताना संस्कारक्षम प्रतिक्रिया आणि प्रतिसाद हे त्यांचं वैशिष्ट्य. 

भारतात अठराशे सत्तावनचा स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व तात्या टोपे करत होते. तसेच सध्या महाराष्ट्रात कोरोना संग्रामाचे राजेश टोपे करत आहेत.  

त्यांच्या मदतीला विविध पातळीवर अधिकारी असतील तरीही सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे नेतृत्व आणि निर्णय या दोन्ही महत्त्वाच्या बाजू ते उत्तमरित्या संभाळत आहेत. निर्णय घेणे आणि घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी घेणे हे जोखीमीचे काम ते करत आहेत. सध्या संकट मोठं आहे आणि मोठी जोखीमही. इथे जनतेच्या जीवनमरणाचा खेळ चालू आहे. अशा वेळेस पुढे उभे राहून नेतृत्व करणे सोपे नाही.

मागील काही काळात वैयक्तिक आयुष्यात काही दुःखद प्रसंग ओढवले असतानाही हा माणूस थांबला नाही. क्षणभर विश्रांती घेतली नाही. आणि हो, ती तो घेत नाही हयाची त्यांनी जाहिरातबाजी केली नाही. मातृशोक झाल्यावर देखील टोपे साहेब पुढच्या क्षणाला फिल्डवर उभे होते. स्वतःला कोरोना झाला तरीसुद्धा विश्रांती न घेता घरुन अहोरात्र काम करत होते. आज भले-भले नेते फिल्डवर यायला घाबरतात तिथे हा माणूस संयम ठेवून, स्वतः जमिनीवर राहून जमिनीवर कार्य करतोय. 

औरंगाबाद - जालनासारख्या मराठवाड्यातील निमशहरी किंवा काहीश्या ग्रामीण भागातून वर आलेला हा तरुण. स्वतः एक मेकॅनिकल इंजिनिअर असून सुद्धा Health Ministry सारखं नाजूक पण कठीण खातं उत्तमरीत्या सांभाळत आहे. 

सध्याच्या राजकीय परिस्थितीत केंद्र आणि राज्य यांचा समन्वय टोपे साहेब संयमाने हाताळत आहेत. कोणत्याही प्रकारची वायफळ वक्तव्य न करता केंद्राची राज्याला जास्तीत जास्त मदत कशी मिळेल यासाठी ते रोज प्रयत्न करत आहेत. कोणत्याही पक्षाला अथवा नेत्याला जबाबदार न धरता ह्या संकटातून राज्याला बाहेर काढण्याची त्यांची धडपड दिसते आहे जाणवते आहे. 

एवढ्या मोठ्या कामात जबाबदारी पुर्वक काम करतांना, काही कमी जास्त नक्कीच होतं आहे आणि होणार. परंतु त्याच्यावरच बोट ठेवून त्याच्या ह्या कार्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. त्यावरुन त्यांच्या कर्तृत्वाला भविष्यात कमी लेखलं जाऊ नये. 

मला आश्चर्य वाटतं की टोपे साहेबांना दिवस-रात्र प्रश्न विचारायला तत्पर असलेली माध्यमं, त्यांचे दोन शब्द कौतुक करायला का मागच्या रांगेत जाऊन बसली आहेत.

सोशल मीडियावर Memes करणे, मुलाखतीचा मोडून तोडून भाग Viral करणे, शंभर कामांपैकी जर १०-२० टक्के कमी पडले असेल, तर तेवढेच का नाही केले हयावर राजकीय पोळी भाजणे. अशा नानाविध बाणांना आणि वारांना झेलत टोपे साहेब आपण ही लढाई जिगरबाजपणे लढत आहात. आम्हाला खात्री आहे की आपण ही लढाई नक्कीच जिँकून दाखवाल. 

सध्याच्या कोरोना संकटात आपण सर्वजण Doctors, आरोग्य सेवेकरी, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते आणि इतर मदत करणारे हया सर्वांचे कोरोना योद्धा म्हणून कौतुक करतो, त्यांना सलाम करतो. मग हया संकटात सरकारचा एक लढवय्या आणि खंबीर मंत्री. स्वतःच्या जीवाची तमा न बाळगता महाराष्ट्रातील जनतेच्या जीवाची प्रथम काळजी करणारे श्री राजेश टोपे ह्यांचे तेवढेच कौतुक करायला हवे. ते सुद्धा एक कोरोना योध्दा आणि ह्या लढाईत सरसेनापती आहेत. 

श्री टोपे साहेब आज मी कोणाचीही तमा न बाळगता, महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने आपले मनापासून आभार मानतो. आपले हे जे कौतुकास्पद कार्य आहे त्याला मानाचा मुजरा करतो. 

तुम्ही असेच खंबीरपणे कार्य करत राहा. आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी आहोत. बारा कोटी जनतेचा आशीर्वाद आपल्याबरोबर सदैव आहे.

जय महाराष्ट्र..जय हिंद..

तळटीप - कृपया हा कोणताही राजकीय लेख नसून मला वाटलेल्या आपल्या आरोग्यमंत्री हयांच्या कार्याबद्दलच्या भावना आहेत. मी वरच्या किंवा खालच्या आळीतल्या कोणत्याही मंडळाचा कार्यकर्ता नाही.

© मिलिंद सहस्त्रबुद्धे

सदाशिव पेठ पुणे ३०

६/५/२०२१

Comments

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी

*आपण सारे अर्जुन*

*आपण सारे अर्जुन* © मिलिंद सहस्रबुद्धे                   गुरुवारी रामनवमी झाली होती आणि शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बहुतांश घरात लगबग सुरू होती. नऊच्या रामायणाची नाही तर नऊ वाजता देशाचे पंतप्रधान काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत आणि देशाच्या जनतेशी व्हिडिओकॉल द्वारे संवाद साधणार आहेत त्याची. प्रत्येक जण वाट बघत होता नऊ वाजण्याची आणि एकदाचे नऊ वाजले.  प्रत्येक न्युज चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुरू झाला. नेहमीप्रमाणे मोदींनी त्यांच्या शैलीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर भाष्य तर केलेच. खरंतर ते  बोलत असताना प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता की मोदी घोषणा काय करणार. भारतातल्या सवासौ करोड जनतेला आता मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवरून बोलतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करणार असं नक्की माहिती असते. आमच्या ह्या भाऊ चा धक्का आज काय दे धक्का देणार ह्याकडे सगळ्यांचं जीव मुठीत घेऊन लक्ष होतं. तसं पाहायला गेलं तर आदल्या दिवशी जेव्हा मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितलं होतं की मी उद्या सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. तेव्हापासूनच तर्क-वितर्कांचे घोडे वि