Skip to main content

करोना संग्रामातील तात्या (राजेश) टोपे

 #कोरोनायोद्धा

*करोना संग्रामातील तात्या (राजेश) टोपे*

भारतात अठराशे सत्तावनचा स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व तात्या टोपे करत होते. तसेच सध्या महाराष्ट्रात कोरोना संग्रामाचे राजेश टोपे करत आहेत.  

Rajesh Tope

"कृपया माझ्या विधानाचा विपर्यास करू नका" त्यांची ही कळकळीची विनंती ऐकून मनात चलबिचल झाली. आजकालच्या प्रसारमाध्यमां समोर बोलताना भले भले जण घाबरतात. काही थोर मंडळी तर प्रसारमाध्यमांसमोर येत सुद्धा नाहीत. आपल्या कडून चुकून बोलून गेलेल्या वाक्याची चुकीची ब्रेकिंग न्यूज होऊ नये, या भीतीने त्यांनी त्यांची जीभ चावली.

आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे साहेब अशी कळकळीची विनंती करताना, त्यांना नक्कीच काही वर्षांपूर्वीची आठवण मनात झाली असेल. हयाच देशाच्या प्रसार माध्यमांनी आपल्या एका साध्या,सरळ, कार्यक्षम गृहमंत्र्यांची विकेट घेतली होती. तीसुद्धा अशाच एका संकटकाळात. 

मागील वर्षीच्या एप्रिलपासून हा माणूस सदैव अविरतपणे कोरोना विरुद्ध उभा ठाकला आहे. क्षणाचीही उसंत न घेता तो महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेची गेली १२ महिने अहोरात्र वाहून घेऊन सेवा करतोय. अतिशय कठीण प्रसंगांचा सामना करत असतांना देखील आपल्या नेतृत्व कौशल्याने ही कोरोनाची परिस्थिती सांभाळतोय. 

शरद पवार साहेबांना नेहमीच विविध प्रयोग करण्याची सवय आहे. त्यातील काही प्रयोग यशस्वी होतात तर काही फसतात. परंतु साहेबांचं वैशिष्ट्य हेच आहे की ते परत प्रयोग करायला घाबरत नाहीत आणि करायचे थांबत नाहीत. तरुण तडफदार परंतु मितभाषी असलेला, जमिनीवरचा एक आमदार राजेश टोपे यांना दिलेलं आरोग्य मंत्रीपद. हा साहेबांचा एक यशस्वी झालेला प्रयोग. अजूनही एक प्रयोग केला होता गृहमंत्रिपदाचा, परंतु तो सध्या तरी फसलाय असं वाटते. असो

सुसंस्कृत आणि कार्यक्षम असे "श्री राजेश टोपे". आज हया करोनाच्या "न भूतो न भविष्यती" संकटाचा सामना खंबीरपणे करत आहेत. हे सर्व करताना कोणतीही मोठ-मोठी जाहिरातबाजी न करता स्वतः कामाला झोकून देऊन हा माणूस चोवीस तास कार्यरत आहे. सध्याच्या बावचळलेला प्रसारमाध्यमांसमोर धीराने उभा राहून योग्य ती माहिती जनतेपर्यंत पोहचवत आहे. हातात माईक आणि चॅनल लिहून दिलेले चार प्रश्न विचारणे फार सोपं असते. परंतु राज्य, जिल्हा, शहर, तालुका ते पार ग्रामपंचायत पातळीवर आरोग्य व्यवस्थेचे नियोजन आणि नियंत्रण करणे फार अवघड आहे. हेच नियोजन आणि नियंत्रण टोपे साहेब अत्यंत कुशलतेने संभाळत आहेत. हे सगळं करताना संस्कारक्षम प्रतिक्रिया आणि प्रतिसाद हे त्यांचं वैशिष्ट्य. 

भारतात अठराशे सत्तावनचा स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व तात्या टोपे करत होते. तसेच सध्या महाराष्ट्रात कोरोना संग्रामाचे राजेश टोपे करत आहेत.  

त्यांच्या मदतीला विविध पातळीवर अधिकारी असतील तरीही सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे नेतृत्व आणि निर्णय या दोन्ही महत्त्वाच्या बाजू ते उत्तमरित्या संभाळत आहेत. निर्णय घेणे आणि घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी घेणे हे जोखीमीचे काम ते करत आहेत. सध्या संकट मोठं आहे आणि मोठी जोखीमही. इथे जनतेच्या जीवनमरणाचा खेळ चालू आहे. अशा वेळेस पुढे उभे राहून नेतृत्व करणे सोपे नाही.

मागील काही काळात वैयक्तिक आयुष्यात काही दुःखद प्रसंग ओढवले असतानाही हा माणूस थांबला नाही. क्षणभर विश्रांती घेतली नाही. आणि हो, ती तो घेत नाही हयाची त्यांनी जाहिरातबाजी केली नाही. मातृशोक झाल्यावर देखील टोपे साहेब पुढच्या क्षणाला फिल्डवर उभे होते. स्वतःला कोरोना झाला तरीसुद्धा विश्रांती न घेता घरुन अहोरात्र काम करत होते. आज भले-भले नेते फिल्डवर यायला घाबरतात तिथे हा माणूस संयम ठेवून, स्वतः जमिनीवर राहून जमिनीवर कार्य करतोय. 

औरंगाबाद - जालनासारख्या मराठवाड्यातील निमशहरी किंवा काहीश्या ग्रामीण भागातून वर आलेला हा तरुण. स्वतः एक मेकॅनिकल इंजिनिअर असून सुद्धा Health Ministry सारखं नाजूक पण कठीण खातं उत्तमरीत्या सांभाळत आहे. 

सध्याच्या राजकीय परिस्थितीत केंद्र आणि राज्य यांचा समन्वय टोपे साहेब संयमाने हाताळत आहेत. कोणत्याही प्रकारची वायफळ वक्तव्य न करता केंद्राची राज्याला जास्तीत जास्त मदत कशी मिळेल यासाठी ते रोज प्रयत्न करत आहेत. कोणत्याही पक्षाला अथवा नेत्याला जबाबदार न धरता ह्या संकटातून राज्याला बाहेर काढण्याची त्यांची धडपड दिसते आहे जाणवते आहे. 

एवढ्या मोठ्या कामात जबाबदारी पुर्वक काम करतांना, काही कमी जास्त नक्कीच होतं आहे आणि होणार. परंतु त्याच्यावरच बोट ठेवून त्याच्या ह्या कार्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. त्यावरुन त्यांच्या कर्तृत्वाला भविष्यात कमी लेखलं जाऊ नये. 

मला आश्चर्य वाटतं की टोपे साहेबांना दिवस-रात्र प्रश्न विचारायला तत्पर असलेली माध्यमं, त्यांचे दोन शब्द कौतुक करायला का मागच्या रांगेत जाऊन बसली आहेत.

सोशल मीडियावर Memes करणे, मुलाखतीचा मोडून तोडून भाग Viral करणे, शंभर कामांपैकी जर १०-२० टक्के कमी पडले असेल, तर तेवढेच का नाही केले हयावर राजकीय पोळी भाजणे. अशा नानाविध बाणांना आणि वारांना झेलत टोपे साहेब आपण ही लढाई जिगरबाजपणे लढत आहात. आम्हाला खात्री आहे की आपण ही लढाई नक्कीच जिँकून दाखवाल. 

सध्याच्या कोरोना संकटात आपण सर्वजण Doctors, आरोग्य सेवेकरी, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते आणि इतर मदत करणारे हया सर्वांचे कोरोना योद्धा म्हणून कौतुक करतो, त्यांना सलाम करतो. मग हया संकटात सरकारचा एक लढवय्या आणि खंबीर मंत्री. स्वतःच्या जीवाची तमा न बाळगता महाराष्ट्रातील जनतेच्या जीवाची प्रथम काळजी करणारे श्री राजेश टोपे ह्यांचे तेवढेच कौतुक करायला हवे. ते सुद्धा एक कोरोना योध्दा आणि ह्या लढाईत सरसेनापती आहेत. 

श्री टोपे साहेब आज मी कोणाचीही तमा न बाळगता, महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने आपले मनापासून आभार मानतो. आपले हे जे कौतुकास्पद कार्य आहे त्याला मानाचा मुजरा करतो. 

तुम्ही असेच खंबीरपणे कार्य करत राहा. आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी आहोत. बारा कोटी जनतेचा आशीर्वाद आपल्याबरोबर सदैव आहे.

जय महाराष्ट्र..जय हिंद..

तळटीप - कृपया हा कोणताही राजकीय लेख नसून मला वाटलेल्या आपल्या आरोग्यमंत्री हयांच्या कार्याबद्दलच्या भावना आहेत. मी वरच्या किंवा खालच्या आळीतल्या कोणत्याही मंडळाचा कार्यकर्ता नाही.

© मिलिंद सहस्त्रबुद्धे

सदाशिव पेठ पुणे ३०

६/५/२०२१

Comments

Popular posts from this blog

१९९२ चे अमिताभ बच्चन

 १९९२ चे अमिताभ बच्चन  पुण्यातील बाजीराव रोडवरील महत्त्वाची खूण म्हणजे आमची नूमवि मुलांची शाळा होय. रस्त्यावरील शाळेच्या कमानीतून आत गेल्यावर लागतं ते एक भलं मोठं इथून-तिथून पसरलेले आडवं प्रवेशद्वार. साधारण पाच-सहा फूट उंचीचं हे गेट कायम लक्षात राहिलं. मधल्या सुट्टीत शाळेतून पळून जाताना ह्याच्यावरुनच उडी मारावी लागायची. मोठ्या सुट्टीत मुख्य प्रवेशद्वार बंद असायचं आणि आम्ही उजव्या किंवा डाव्या बाजूने असलेल्या छोट्या दरवाजातून ये-जा करत असू. शाळेच्या बाहेर जाण्याची मुख्य आकर्षण म्हणजे चिंच आणि पेरूची गाडी, लाल पांढऱ्या गोळ्या विकणारा तो लेंगा-टोपीवाला म्हातार बाबा. ५० पैशात मिळणारी पावभाजी आणि २५ पैशात मिळणारी भेळ. आहाहा! त्या सगळ्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे.  प्रवेशद्वाराच्या मधोमध उभा राहिलं आणि समोर पाहिलं की शाळा म्हणजे अक्षरशः भव्य राजवाडा वाटतो. दोन्ही बाजूंनी काळ्या दगडात बांधलेली तीन मजली कौलारू भक्कम इमारत. ह्या सलग दोन्ही बाजूच्या इमारती जिथे एकत्र होतात ते मोठं प्रशस्त सभागृह. ह्याच सभागृहात दरवर्षी स्नेहसंमेलनातील गाजणारे कार्यक्रम म्हणजे, परचुरे सरां...

"साय"कल

  "साय"कल "तुम्ही कधी प्रेमात पडलात का?" "तुम्ही कधी सायकलवरुन पडलात का? ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं ठामपणे "हो" अशी देताना प्रत्येक जणांच्या डोळ्यात दिसणारी चमक एक सारखीच असते. सायकल वरून पडणे ही एक अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट असते. "सायकलवरून पडल्यावरच सायकल येते" हा सुविचार "शास्त्र असतं ते" सारखा आहे. सायकल शिकणे आणि शिकवणे ह्या दोन विरुद्ध टोकाच्या कला आहेत. जेव्हा आपण सायकल शिकत असतो, तेव्हा समोर आलेला प्रत्येक जण, प्रत्येक गोष्ट आपल्याला मोठ्या रा‌क्षसी संकटासारखी भासते. खरंतर पुढील आयुष्यात त्याहूनही अनेक समस्या, विघ्ने येतात. पण शिकतांना साधं छोटं कुत्रं असेल किंवा मोठी गाडी, समोर आल्यावर भासणारी ती भीती म्हणजे 'या सम हीच' अशी असते. मात्र हेच आपण सायकल शिकवत असतो तेव्हा "अरे किंवा अगं का थांबलीस, उगाच घाबरतेस, साधी स्कूटर तर होती!" अश्या समोरच्याला किरकोळीत काढणार्या वाक्यांची पेरणी चालू असते. आपण स्वतः शिकताना कधीच Hopping ने सुरुवात करत नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे पहिली सायकल सुरुवात ही बिन द...

दादा परत या..

  दादा परत या.. "मी कोणाच्या बापालाही घाबरत नाही" असं तुमच्या कडक आवाजात ऐकताना पुन्हा पुन्हा तुमची उणीव भासते. तुमच्याकडून चुकून बोली भाषेतील शब्दांची उठाठेव कधीतरी झालीही असेल. परंतु संस्कृतीच्या मर्यादा मग त्या राजकीय असतील अथवा सामाजिक तुम्ही कधीही ओलांडल्या नाहीत. कोणा एखाद्यावर उगाच खालच्या भाषेत टीकाटिप्पणी केली नाहीत. तर कधी सत्तेच्या गुर्मीत कोणाची निंदा नालस्ती केल्याचं आठवत नाही. तुमचा बाज आणि दरारा वेगळाच होता आणि आहे. प्रशासनावरची पकड म्हणजे जणू बापाने रस्ता ओलांडताना मुलाचा धरलेला घट्ट हात. धरलेल्या त्या हातात काळजी ही असतेच पण तेवढाच धाक असतो. तशी तुमची प्रशासनावरची पकड आहे. आमच्या पुण्याच्या पालकमंत्री पदी असताना तुमचा आठवड्याला किंवा महिनाभरातील एखादा दौरा ठरलेलाच. हा दौरा म्हणजे साध्या शिपायापासून ते मुख्य आयुक्त पर्यंत एक भीती असायची. महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यापासून ते अगदी रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलीसापर्यंत "दादा आज पुण्यात येणार" हे आधी दोन दिवसापासूनच चर्चेत असायचे. तुम्ही ज्या दिवशी येणार त्या दिवशी सकाळी सात ते रात्री दहापर...