Skip to main content

"अजिंक्य रहाणे' आम्हाला पसंत आहे

 "अजिंक्य रहाणे' आम्हाला पसंत आहे

वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर कोणी ही कितीही मोठा नामवंत खेळाडू असो परंतु कप्तान पदाला जे सहिष्णुता आणि सर्वांना एकत्र घेऊन जाण्याचे गुण लागतात ते त्याच्यात असतीलच असे नाही. परंतु ज्याच्याकडे ते असतात तोच कठीण परिस्थितीत यशस्वी होतो. हया कसोटीच्या निकालाचे तात्पर्य काय असेल तर हे आहे.

Ajinkya Rahane


आपल्या सध्याच्या भारतीय खेळाडूंना तंबूत परत जाणं पक्कं माहितीय पण खेळपट्टीवर तंबू ठोकून कसं राहयचं हे राहणेंच्या अजिंक्य ने दुसऱ्या मॅच मध्ये दाखवून दिलं. दुसरा द्रविड सापडला की काय असा भास व्हावा इतकं अजिंक्य रहाणे आणि राहुल द्रविड यांच्यात साम्य जाणवलं. तीच ती किरकोळ शरीरयष्टी, चेहर्‍यावरचे शांत-संयमी, भावना अती प्रकट न करणारे भाव आणि तंत्रशुद्ध खेळ.

जडेजाच्या पन्नाशीच्या घाईत चांगला सेट झालेला रहाणे आउट झाला. परंतु सहकाऱ्यांकडून एखादी चूक घडली तर त्या चुकीसाठी मैदानावर प्रतिक्रिया न देणे. पुढे जाऊन मी असं म्हणेन की त्या सहकाऱ्याला त्या चुकीची लाज वाटू नये याची खबरदारी घेत त्याच्या खांद्यावर एक विश्वासाने हात ठेवणे आणि "चलता है रे" असं करून पुढे जाणे.  याच्यासाठी एक वेगळ्याच प्रकारचं मानसिक स्थैर्य आणि धैर्य हे कप्तानाला लागतं. क्रिकेटcommentry च्या भाषेत ज्याला Temperament म्हणतात. अगदी ते राहणेनी या कसोटीत दाखवून दिले.  जे कदाचित विराट आधीच्या कित्येक मॅचेस मध्ये दाखवू शकला नाही. मुद्दामून इथं हे सांगावेसे वाटते. कारण आधीच्या ज्या काही वनडे किंवा T20 मॅचेस झाल्या त्याच्यात एका मॅच मध्ये विराट कोहलीच्या हातून अतिशय सोपा झेल सुटला होता त्यावेळेस अर्थातच बॉलर "नटराजन" काही बोलू शकला नाही. परंतु पुढच्या कुठल्या तरी एका मॅच मध्ये "हार्दिक पंड्याकडून" साधा झेल सुटल्यावर विराटने मैदानावर आणि मैदानाबाहेर जो आकांडतांडव केला तो नक्कीच कप्तानपदाला शोभेसा नव्हता.

टी ट्वेंटी आणि आयपीएलच्या मॅचेस  ह्या Objective MCQ Paper सारख्या असतात. म्हणजे प्रश्नाचे चार पर्याय दिलेले आणि तुम्हाला जे योग्य वाटेल तो निवडा. कित्येक वेळा तुक्के लावत तुम्ही फर्स्टक्लास काय डिस्टिंक्शन पण मिळवू शकता.  परंतु खरा कस लागतो तो Subjective Papers मध्ये. जसं  दहावी-बारावीच्या बोर्डाचे पेपर तीन तीन तास बसून सोडवतांना कळतं खरा अभ्यास काय असतो. तिथं तुमची खरी कस लागते. तीन तास पूर्णवेळ घेऊन दोन तीन पुरवण्या लावून जो पेपर लिहितो तोच बोर्ड फाडून यशस्वी होतो. अगदी तसंच आहे कसोटी क्रिकेटचं, तुम्हाला जिद्द आणि संयमाने टिकूनच राहावं लागतं अजिंक्य होण्यासाठी.

"वक्त सबका आता है, मौका सभी को मिलता है". परंतु मिळालेल्या मोक्याचं यशात रूपांतर करणं फार कमी लोकांना जमतं त्यात आता अजून एक नावाची भर पडलीय..अजिंक्य रहाणे.  कदाचित त्याची वैयक्तिक कामगिरी किंवा हया आधीच्या विविध मॅचेस मधली कामगिरी ही कधी चांगली तर कधी सुमार दर्जाचे असेल. परंतु, एक कॅप्टन म्हणून योग्य वेळी योग्य गोष्टी करणं हे किती महत्त्वाचं असतं हे रहाणेनी ह्या कसोटी मधे दाखवून दिले. 

स्वतः मैदानावर टिकून शतक ठोकले.   परिस्थिती नुसार क्षेत्ररक्षणाचे चपखल डावपेच आखले. आपल्याकडे असलेल्या तुटपुंज्या साधनांचा कौशल्यपूर्ण वापर केला. नव्या गोलंदाजावर विश्वास ठेवून आणि इतर गोलंदाजांना मध्ये एक पार्टनरशिपचे वातावरण निर्माण करून ऑस्ट्रेलियन संघाला नाकी नऊ आणले. अर्थातच, ह्या यशस्वी कामगिरी बद्दल तो Johnny Mullagh Medal  मिळवणारा पहिला खेळाडू ठरला. 

सध्या भारतात एक असं वातावरण आहे की कोणाचं कौतुक किंवा कोणावर टीका करताना प्रत्येकजणच थोडा मनातून घाबरलेला असतो. कोण कधी Troll करेल सांगता येत नाही.  स्पष्टवक्ता गावस्कर सुद्धा परवा "मी राहणेचं कौतुक केलं तर तो मुंबईचा आहे म्हणून करतोय" अशा भीतीने त्याला हवं ते बोलू शकला नाही. हेच ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉंटिंग दिलखुलासपणे राहणेचं कौतुक करून गेला. 

एखादी कसोटी जिंकणे म्हणजे काही एव्हरेस्ट चढलं असं होतं नाही. परंतु तुम्ही जुलै-ऑगस्टच्या मुसळधार पावसात कळसुबाई जरी चढलात तरी ते एव्हरेस्ट सर करण्यासारखेच आहे.

कधीकधी मेलोडीयस किंवा खूप धांगडधिंगा आवाज करणारं संगीत चालू असताना अचानकच शास्त्रीय गायनाची तान ऐकल्यावर जो सुखद अनुभव मिळतो तो काही औरच. भले आपल्याला शास्त्रीय गायनातलं काही कळो अथवा ना कळो, तरी त्या क्षणापुरता जो मनाला एक आनंद आणि समाधान मिळतं ते कदाचित अजिंक्य राहणेनी परवा जिंकलेल्या कसोटीमुळे मिळालं. 

जिंकल्यानंतर कुठलाही धांगडधिंगा, आरडाओरडा, समोरच्या प्रतिस्पर्ध्यांच्या कडे चेहरे करून अंगविक्षेप किंवा  टीव्हीवर ऐकू आली नाही तरी ओठांच्या हालचालींवरून कळणारी अर्वाच्च शीवी कुठेही दिसली नाही. खरं तर आधीच्या पूर्ण कोलमडलेल्या परिस्थितीतून एवढी जोनाथन पक्षासारखी झेप घेऊन यशस्वी कामगिरी केल्यावर आपल्याकडील सध्याच्या GenX संघातील जे   कप्तान आणि खेळाडू आहेत त्यांनी जो काही उरूस मांडला असता, तो उरूस कुठेही दिसला नाही याचे मनापासून समाधान वाटले.

आपल्याकडे सध्या काय झालंय की, कसोटी खेळताना सुद्धा आपण T20 खेळतो आहोत की काय अशा भावनेत बरेच खेळाडू दिसून येतात. कारण आपल्या संघातील निम्म्यापेक्षा जास्त खेळाडू हे दुलीप किंवा रणजी करंडक खेळले आहेत कि नाही किंवा त्यांची तिथली कामगिरी किती समाधानकारक आहे ह्याची कुठेही माहिती मिळत नाही. त्यांची जी मोठ-मोठी रेकॉर्ड दिसून येतात ती फक्त आयपीएल आणि वैश्विक टी ट्वेंटी मॅचेस मध्येच. असो.

वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर कोणी ही कितीही मोठा नामवंत खेळाडू असो परंतु कप्तान पदाला जे सहिष्णुता आणि सर्वांना एकत्र घेऊन जाण्याचे गुण लागतात ते त्याच्यात असतीलच असे नाही. परंतु ज्याच्याकडे ते असतात तोच कठीण परिस्थितीत यशस्वी होतो. हया कसोटीच्या निकालाचे तात्पर्य काय असेल तर हे आहे.

सध्या whatsapp वर खालील मेसेज कोरोनापेक्षा सुध्दा जास्त वेगाने Viral होतोय...

"टीम इंडियाचा २०२१ चा संकल्प काय असायला हवा?" तर

*अजिंक्य रहाणे*

😊😜😃😃

ता.क.

हंगामी फळांची मजा ही उन्हाळ्यात आंबा आणि हिवाळ्यात स्ट्रॉबेरी खाल्यावरच कळते. नाहीतर तर सफरचंद आणि केळी बारमही असतातच की.

Ajinkya Rahane. Image-Twitter.

© मिलिंद सहस्रबुद्धे 

30-12-2020





Comments

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी

*आपण सारे अर्जुन*

*आपण सारे अर्जुन* © मिलिंद सहस्रबुद्धे                   गुरुवारी रामनवमी झाली होती आणि शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बहुतांश घरात लगबग सुरू होती. नऊच्या रामायणाची नाही तर नऊ वाजता देशाचे पंतप्रधान काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत आणि देशाच्या जनतेशी व्हिडिओकॉल द्वारे संवाद साधणार आहेत त्याची. प्रत्येक जण वाट बघत होता नऊ वाजण्याची आणि एकदाचे नऊ वाजले.  प्रत्येक न्युज चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुरू झाला. नेहमीप्रमाणे मोदींनी त्यांच्या शैलीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर भाष्य तर केलेच. खरंतर ते  बोलत असताना प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता की मोदी घोषणा काय करणार. भारतातल्या सवासौ करोड जनतेला आता मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवरून बोलतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करणार असं नक्की माहिती असते. आमच्या ह्या भाऊ चा धक्का आज काय दे धक्का देणार ह्याकडे सगळ्यांचं जीव मुठीत घेऊन लक्ष होतं. तसं पाहायला गेलं तर आदल्या दिवशी जेव्हा मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितलं होतं की मी उद्या सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. तेव्हापासूनच तर्क-वितर्कांचे घोडे वि