Skip to main content

मकबूल फिदा खान....


मकबूल फिदा खान....

हॉलीवूड मधील डेंजील वॉशिंग्टन हे नाव असं आहे की, "एखादा इंग्लिश मूवी बघू, अरे डेंजील वॉशिंग्टन आहे का? चल भारी असेल मग". जरा तसंच हिंदी पिक्चरच्या वेळेस "इरफान आहे का? तर मग बघूच, चांगला असेल नक्की" असं वाटावं असा Born Actor.  ज्याच्या फक्त नावामुळे पिक्चर बघावा, त्या पिक्चर मध्ये आपल्याला काहीतरी बघायला मिळेल असं वाटावं.
वास्तववादी पिक्चर बघायची ज्यांना आवड आणि नशा आहे ना, त्यांच्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीने काही हिरे नेहमीच राखून ठेवलेले आहेत. अर्धसत्य मधला घामाघूम होवून धावत पळणारा इन्स्पेक्टर ओमपुरी असेल, "मुंबई का किंग कौन? भिक्कू म्हात्रे" म्हणणारा मनोज वाजपेयी असेल, सरकार मधला के के मेनन असेल, नाहीतर मग "भाई.. सोडा बाॉटल की किंमत तब तक जबतक की वो बंद...जैसे ही बुच खुला...फुस्स..झाग बह जाता है...रह जाता है क्या...पानी" वाला आन मधला पठाणवाडीतला पठाण इरफान खान असेल. हया सर्वांचा एक वेगळाच वरचा क्लास आहे. म्हणजे दहावी फ असून सुद्धा हे सगळेजण बोर्डात आलेले आहेत.
हो बरोबर ओळखलंत..आज इरफान खान.
उत्तर प्रदेश मधील पठाणी कुटुंबात जन्मलेला एक साधा युपी का लौंढा. मला तो सापडला तो हासिल नावाच्या जिम्मी शेरगील नामक हिरोच्या पिक्चर मध्ये. विद्यार्थी राजकारणावर बेतलेला चित्रपट. त्यात इरफाननी व्हिलनची भूमिका केली होती. टिपिकल उत्तर प्रदेश मधला रणविजय सिंग नावाचा नेता.  यूपीच्या बॅकग्राऊंड वरून असलेल  हे पिक्चर. त्यामुळे इरफान साठी जणू  होम ग्राउंडच होतं. त्यानी त्याचा पुरेपूर फायदा उठवत त्या भूमिकेचं सोनं केलं. त्याला त्या वर्षीचं फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं. साधारण 2003-2004 साल असेल.
कायम पारोसा दिसणारा चेहरा, बटबटीत बाहेर आलेले डोळे, अगदी अर्धवट वाढलेली दाढी आणि बोलताना एकीकडे सतत लवंग किंवा काहीतरी खातोय असं वाटावं असा लूक.
तो कितीही मोठा सेलिब्रिटी झाला ना तरी या लुक मधून बाहेर येऊ शकला नाही, अगदी ऑस्कर समारंभातपण. पण हाच त्याचा लुक भल्याभल्यांना वेड करून गेलाय हे मात्र नक्की.
अभिनय ही तर जबरदस्त ताकदीची बाजू होतीच पण सगळ्यात उजवी आणि महत्त्वाची बाजू म्हणजे डायलॉग डिलिव्हरी. त्याचा प्रत्येक डायलॉग, डिलिव्हरी साठी कायम लक्षात राहील.  भूमिका फक्त चित्रपटापुरती नाही तर ती वास्तववादी आहे आणि खरंच कोणीतरी असा माणूस आहे, असं वागतोय असं वाटावं इतकी तो ती भूमिका आणि त्याचा अभिनय हुबेहूब करायचा. कित्येक वेळा आपण एखाद्या रस्त्यावर किंवा नाक्यावर एखाद्या टिपिकल पान खात चाललेला माणूस पाहिला ना की उगाच आठवतं च्यायला साला इरफान त्या अमुक पिक्चरमध्ये तमुक रोल हुबेहूब करून गेलाय. हेच तर त्याच्या यशाचं गमक होतं असं वाटतं.
अर्थातच एनएसडी मधील शिक्षण. हे शिक्षण काही औरच असतं. इथं तुम्हाला शबनम आणि चप्पल घालून जमिनीवरच सत्य अनुभवायला शिकवतात. एकदा का जमिनीला कान लावून शिकलात ना! की मग उंच उड्या मारायला आरामात जमतं. भीती वाटत नाही. जमिनीवर परत खाली येताना पडायची भीती नसते, कारण आधी कित्येक वेळा तिच्यावर पडून आणि आपटून झालेलं असतं.
हासिल पिक्चर नंतर, हया हिऱ्याला स्पर्श झाला तो गुलजार नामक वडाच्या सावलीत वाढणाऱ्या विशाल भारद्वाज ह्या जौहरी दिग्दर्शकाचा. मकबूल...बास मग अजून काय हवं होतं. आप, मै और बॅगपायपर सारखी बैठक जमून आली. आणि ती आल्यावर मैफल तो रंग लानी ही ती. सिर्फ रंग नहीं लायी तर पुरे दुनिया में छा गई.
इरफान खान हे नाव इंटरनॅशनल लेव्हलवर झळकू लागलं.  कसं असतं बघा, सर्वसाधारणपणे राहुल आणि सिमरन मागे असणारे सगळे चाहते, अचानक त्यांना इरफान आवडायला लागला. तोपर्यंत हा माणूस त्यांना कुठेच दिसला नाही. बिचारा 1988 च्या सलाम बॉंबे पासून ते मग मकबूल 2004 ला रिलीज होई पर्यंत विविध छोट्या-मोठ्या भूमिका यशस्वीपणे करत होता.  पण आपल्याकडे सामाजिक दृष्टीकोनाच्या काचा नेहमी अधूनमधून गाडीच्या वायपर सारख्या हलवून साफ कराव्या लागतात. मगच आपल्याला दिसतात ओम पुरी, नासिरउद्दीन शाह, गिरिष कर्नाड, मनोज वाजपेयी, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि इरफान खान ...असे बरेच जण.
मकबूल पासून मात्र इरफानने मागे पाहीलेच नाही. आमच्या पब्लिक नी पण त्याला डोक्यावर घेतलं.  मग नॅशनल, इंटरनॅशनल विविध चित्रपटांमध्ये तो झळकू लागला.  शाहरुख बरोबर बिल्लू बार्बर, अमितजींबरोबर पिकू, अक्षय कुमार बरोबर आन असे बरेच कमर्शिअल सिनेमे तर केलेच. त्याच वेळेस लंचबॉक्स, पानसिंग तोमर, मदारी यांसारखे वास्तववादी पिक्चर करून तो कायम याद राहिला.
हॉलिवूड मध्ये Slumdog Millionaire, Jurrasic Park आणि त्याचा अतिशय गाजलेला Life of Pie. हया चित्रपटांमुळे तर तो अमेरिकेच्या चंदेरी दुनियेत नावाजला गेला. एक मात्र कायम दिसून आलेलं आहे की, ऑस्करच्या वारीत तुम्ही चंदेरी दुनियेत झळाळणारे स्टार असायलाच पाहिजे असं नाही आणि तिथं गुलछबू चेहऱ्यांची गरज नाही. तुम्ही जर हाडाचे नट असाल तर हॉलीवुड कायमच तुम्हाला त्याच्या साम्राज्यात सहभागी करून घेतो. ओम पुरी पासून ते इरफान खान पर्यंत हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे.
पानसिंग तोमर हा माणूस पुढील कित्येक वर्षांनी इरफाननीच आपला आत्मचरित्र चित्रपट करावा म्हणूनच जन्माला आला होता की काय असं वाटावं, इतका जिवंतपणा त्या पिक्चर मध्ये इरफानने आणलेला आहे. "बिघड मैं बागी होते है साहीब, डकैत मिलते है पार्लमेंट मे!" हा त्याचा डायलॉग इतका जबरदस्त होता की देशाच्या राजकारणाचं कसं चंबळचे खोरे होत चाललंय याची जाणीव हा डायलॉग वेळोवेळी करून देत गेला.
असा हा आपला पानसिंग, कॅन्सरची रेस जिंकण्यासाठी त्याच तळमळीने धावला कधी जिंकला तर कधी हरला. पण  न डगमगता लढतच राहिला. मागच्या आठवड्यापासून शेवटची रेस होती आणि ती लालफित क्रॉस करण्यासाठी, जिंकण्यासाठी त्यांनी दाखवलेली जिद्द खरंच संस्मरणीय राहील. आयुष्याच्या शर्यतीत जरी ती लालफीत तो क्रॉस करू शकला नसला तरी लोकांच्या ह्रुदयात त्याच्या नावाचा लाल रंगाचा हार्ट शेप कायम ठेवून गेला.
शेवटी त्याच्याच एका D- Day  नावाच्या पिक्चरमधील डायलॉग आठवतो
"सिर्फ इन्सान गलत नही होते. वक्त भी कभी  गलत हो सकता है"

© मिलिंद सहस्रबुद्धे
०१/०५/२०२०

Comments

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी

*आपण सारे अर्जुन*

*आपण सारे अर्जुन* © मिलिंद सहस्रबुद्धे                   गुरुवारी रामनवमी झाली होती आणि शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बहुतांश घरात लगबग सुरू होती. नऊच्या रामायणाची नाही तर नऊ वाजता देशाचे पंतप्रधान काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत आणि देशाच्या जनतेशी व्हिडिओकॉल द्वारे संवाद साधणार आहेत त्याची. प्रत्येक जण वाट बघत होता नऊ वाजण्याची आणि एकदाचे नऊ वाजले.  प्रत्येक न्युज चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुरू झाला. नेहमीप्रमाणे मोदींनी त्यांच्या शैलीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर भाष्य तर केलेच. खरंतर ते  बोलत असताना प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता की मोदी घोषणा काय करणार. भारतातल्या सवासौ करोड जनतेला आता मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवरून बोलतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करणार असं नक्की माहिती असते. आमच्या ह्या भाऊ चा धक्का आज काय दे धक्का देणार ह्याकडे सगळ्यांचं जीव मुठीत घेऊन लक्ष होतं. तसं पाहायला गेलं तर आदल्या दिवशी जेव्हा मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितलं होतं की मी उद्या सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. तेव्हापासूनच तर्क-वितर्कांचे घोडे वि