Skip to main content

समुद्र...... प्रत्येकासाठी वेगळा असतो...

समुद्र...... प्रत्येकासाठी वेगळा असतो.

प्रेमींसाठी नभ-धरा मिलनाचा किनारा असतो..
शोध घेणा-यासाठी सागरतळ एक गूढ असतो..
बाल मनासाठी तो एक लाटांचा खेळ असतो..
तर एकांतात आपलासा वाटणारा मित्र असतो..

मलापण समुद्राचं हे अनाकलनीय आकर्षण नेहमीच विचार करायला लावणारं आहे.
हया विचारमंथनातूनच समुद्र आणि मानवी आयुष्याचं जे संलग्न नातं आहे ते सुचत गेलं आणि तेच मांडण्याचा मागील आठ दिवस प्रत्येक दिवशी माझ्या फेसबुक स्टोरीमध्ये प्रयत्न केला.
आज आठवड्याच्या आठवणी एकत्र गोळा करून तुमच्यासमोर मांडतोय. बघा आवडतायत का!!

© समुद्र......खोल
आत आत जात गेलं की वरवरचं वाटणारं काळं वाळूने गढुळलेलं पाणी स्वच्छ पारदर्शी होऊ लागतं. सागर तळाशी असलेला वाळूचा प्रत्येक कण स्पष्ट दिसू लागतो. आपण म्हणतो वाळू काळी आहे पण तळाशी तर ती कायम सफेद, पांढरी स्वच्छच असते.
मानवी मनासारखंच की, वरवरची वहात आलेली विचारांची वाळू जरी काळी गढूळलेली असली तरी अतंरगच्या तळाशी जन्म घेतांना उरलेली नाळ निरागसच असते..
जेवढं खोल जाऊ तेवढं हे निरामय निर्गुण विश्व उलगडायला लागतं.

© समुद्र.....अथांग
किनार्यावर उभं राहीलं ना की आपोआप समुद्राच्या आणि मनाच्या अथांगतेतची व्याप्ती कळते. क्षितिजावर दूर धुसर दिसणारं शिडाचं गलबत बघत राहीलं की हळूहळू अगदी स्पष्ट दिसायला लागतं. कदाचित मनानं आपण त्याच्या इतकं जवळ पोहचतो की त्याचं  टोकदार आकार, शिडावर फडफडणारं ते कापड, कच्चीपक्की ती नाविकाची खोली, बाहेर पडलेलला नांगर,सामान असं बरंच काही दिसू लागतं..
पलिकडच्या किनार्याचा पत्ता न लागू देणारा समुद्र हा मनासारखाच..अथांग....
दुसरं टोक कधीच दिसत नाही आणि मग ते शोधण्यासाठी विचारांच्या गलबतातून केलेला प्रवास... आयुष्य

© समुद्र......किनारा
समुद्रात भरती ओहोटीचे खेळ सुरु असतात. ह्या सगळ्यात स्तब्ध असतो तो किनारा. जसा
भरतीच्या उसळणाऱ्या बेधडक लाटा झेलतांना तो भावनिक ओलावा दाखवतो, तेवढाच तो तीच लाट जेव्हा ओहटीला मागे निघून जाते तेव्हा तो कणखरपणे स्थितप्रज्ञ असतो.
कोण्या चंद्राचं गुरुत्वाकर्षण पण त्याचं संगोपन करतो तो अभेद्य किनारा.
मनाचा कारक चंद्र असतो असं म्हणतात तर त्याच्या विचारांच्या गुरुत्वाकर्षणाची भरती ओहटी झेलतो तो किनारा...मेंदू

© समुद्र......वाळू
अनेक आकार, चित्र, नक्षी, अक्षरं सगळं काही काढता येतं हीच्यावर...केवढा मोठा तो कॅनव्हास..थकून जाईल एखादा..
मुठीत घट्ट पकडून हा कॅनव्हास कायमचा घरी न्यावा म्हंटलं तर..पकडलेल्या क्षणी निसटून जाणारी ही वाळू..
मानवी मनाचं ही असंच, एक विचार अनेक आकार, ऊकार,विकार निर्माण करतो. कॅनव्हास म्हणाल तर अनंत अनादी. ते सर्व साठवून ठेवावं म्हंटलं तर पुढच्याच क्षणी आलेला विचार मागचं सगळं पुसुन टाकतो...लाट आल्यावर जसं वाळूतलं चित्रकाम वाहून जातं...
वाळू आणि मन...पकडून ठेवता येत नाही...

© समुद्र.....लाट
विविध लाटा काही शांत, काही रेंगाळणाऱ्या, काही जोरात धडकून मगच शांत होणार्या, तर काही रौद्र रूपात खवळलेल्या...हे खेळ  किनार्यावरच चालतात फक्त. समुद्रात मध्य भागात खाली कायम नीस्सीम शांतताच असते..
आयुष्यात येणाऱ्या विविध किनार्यांवर विचारांच्या लाटांचा असाच आलेख खेळ चालू असतो. मात्र खोलवर मध्यभागी मनाच्या गाभाऱ्यात, संस्कारातून जपलेल्या मुल्यांची शांतता स्थैर्य देते.
लाटा आणि विचार हे क्षणभंगुरच..

© समुद्र......माड (नारळझाड)
उंच उंच ती माडाच्या झाडांची समुद्रा लगत एकामागोमाग असलेली रांग किती आखीव रेखीव. आकाशाला गवसणी घालणारा माड त्या भुसभुशीत वाळूत सुध्दा स्वत:ला घट्ट रोवून असतो. कीतीही मोठी वादळं आली तरी मोडत कधीच नाही. कदाचित त्याची उंची इतकी असते की समुद्रात येणारं वादळ लांबूनच दिसतं.
आयुष्यात यशाच्या आकाशाची गवसणी घालत एका ठराविक उंचीवर पोहचलं आणि जमीनीवर राहून आपल्या मातीशी स्वत:ला घट्ट रोवून घेतलं असेल तर मग भविष्यातील वादळाची चाहूल लागते आणि माडासारखं न मोडता खंब्बीरपणे उभं राहता येतं.

© समुद्र.......दीपगृह (lighthouse)
सफारी मधे होकायंत्रासारखी उपकरणं असुनही समुद्रात मध्यभागी असलेल्या दिपगृहाचं अनन्य महत्व तो दर्यावर्दी जाणून असतो.  दीपगृह जहाजाला योग्य ‌दिशा दाखवते पण तीथेच तो नांगर टाकत नाही.
आयुष्याच्या भवसागरात वेळोवेळी दिशादर्शक म्हणून मध्यभागी ठामपणे निश्चल ते उभे असते, परंतु तिथंच नांगर टाकून प्रवास थांबवता येत नाही....
अध्यात्म.... एक दीपगृहच

© समुद्र.......शंख शिंपले
शंख, काही अणुकुचीदार काही बोथट, काही ढब्बे तर काही बारीक निमूळते . आतला प्राणी किटक मधेच बाहेर येतो, परत लपतो.
शिंपले पण असेच काही कायमचे बंद काही उघडलेले, काही अर्धवट काही पुर्ण, काही सुबक गोल तर काही खडबडीत. काहींमध्ये सापडतो मोती मग कीती तो आनंद.
असे विविध शंख विविध शिंपले आपण आयुष्यभर गोळा करतो. काहींना बरोबर ठेवतो तर काहींना बाजूला ठेवतो. मोती असलेले शिंपले अलगद जपतो.
समुद्रावर गोळा केलेले शंख शिंपले...
जीवनात सापडलेली माणसं, नाती..

© समुद्र........खारं पाणी

अमर्याद साठा असूनही, वल्हवून थकलेल्या नाविकाची तो तहान भागवू शकत नाही.. ही तर समुद्राची शोकांतिका...
मनात जर कायम खारट विचारांची भरती ओहटी चालू असेल..तर पाण्यासारखी संप्पती असुनही काय उपयोग... कधीच कोणा श्रमिक गरजूच्या कामी येत नाही..
आयुष्याची शोकांतिका होते..

धन्यवाद
©मिलिंद सहस्रबुद्धे
२५/०४/२०२०

P.S. काही जणांनी fb story नंतर सगळं एकत्र वाचायला आवडेल अशी कल्पना सुचवली,त्यातूनच ही गोळाबेरीज मांडली आहे.
Thank you all.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी

*आपण सारे अर्जुन*

*आपण सारे अर्जुन* © मिलिंद सहस्रबुद्धे                   गुरुवारी रामनवमी झाली होती आणि शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बहुतांश घरात लगबग सुरू होती. नऊच्या रामायणाची नाही तर नऊ वाजता देशाचे पंतप्रधान काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत आणि देशाच्या जनतेशी व्हिडिओकॉल द्वारे संवाद साधणार आहेत त्याची. प्रत्येक जण वाट बघत होता नऊ वाजण्याची आणि एकदाचे नऊ वाजले.  प्रत्येक न्युज चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुरू झाला. नेहमीप्रमाणे मोदींनी त्यांच्या शैलीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर भाष्य तर केलेच. खरंतर ते  बोलत असताना प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता की मोदी घोषणा काय करणार. भारतातल्या सवासौ करोड जनतेला आता मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवरून बोलतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करणार असं नक्की माहिती असते. आमच्या ह्या भाऊ चा धक्का आज काय दे धक्का देणार ह्याकडे सगळ्यांचं जीव मुठीत घेऊन लक्ष होतं. तसं पाहायला गेलं तर आदल्या दिवशी जेव्हा मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितलं होतं की मी उद्या सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. तेव्हापासूनच तर्क-वितर्कांचे घोडे वि