Skip to main content

जिंदादिल...

जिंदादिल...

टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल...

प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.

 ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी ऐकतोच. ब्राह्मण कुटुंबात जन्म घेऊन त्यांची जात ही कधीही त्यांच्या राजकारणात आणि समाजकारणात आडवी आली नाही. खरंतर महाराष्ट्रासारख्या "पुरोगामी" म्हणवून घेणाऱ्या राज्यात जात ही कशी उभी-आडवी, तिरपी येते हे आपण नेहमी बघतोच. तरीही प्रमोदजींना हयाचा कधीच स्पर्श झाला नाही हे विशेष.

शरद पवार साहेबांना नंतर जर कोणाला चांद्यापासून बांद्यापर्यंत उभा-आडवा महाराष्ट्र, प्रत्येक गाव-जिल्हा पातळीवर खडा न खडा माहिती असेल तर अजूनही एकच नाव प्रमोद महाजन. संपूर्ण महाराष्ट्र स्वयंसेवकाच्या भूमिकेतून पिंजून काढलेला एकमेव राष्ट्रीय स्तरावरचा नेता. आणि हो कधीही "महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत" अशी बातमी न येता.

असं म्हणतात की यश हे कष्टा व्यतिरिक्त, योग्य संधीला आणि योग्य वेळी तुम्ही उपस्थित असण्यावर अवलंबून असतं किंवा साधता येतं. मात्र अशी योग्य वेळ आणि योग्य संधी स्वत:च निर्माण करून सत्ता यशस्वी होण्याचं गमक कोणी साधलं असेल तर ते म्हणजे प्रमोदजी. राज्याच्या राजकारणात जास्त लुडबूड न करता योग्यवेळी देशपातळीवर स्वतःला "एस्टॅब्लिश" (हाच शब्द चपखल बसतो) करण्यात यशस्वी झालेला एकमेव महाराष्ट्रीय मराठी नेता. रथयात्रेच्या संधीचं त्यांनी रथावर शंख फुंकणाऱ्या हनुमानाच्या भूमिकेत प्रवेश करून स्वतःच्या कारकिर्दीचं सोन कसं करून घेतलं हे आपण सर्वजण जाणतोच.

मुळातच स्वतः शिक्षक आणि शिक्षकी घराण्याचा वारसा, त्यामुळे भाषेवर प्रभुत्व उत्तम,मग ती हिंदी असो व मराठी. प्रमोदजी मंचावर एकदा उभे राहिल्यावर, नुसता समोरचा जनसमुदाय, त्या ठिकाणाचं नाव , तिथल्या समस्या आणि त्यावरचे उपाय यावर कोणतीही पूर्वतयारी नसताना अस्खलित तासभर बोलू शकत होते. हे खरोखरच अतुलनीय आहे.

चेहऱ्यावर आणि बोलण्यात असलेला किंचित मिश्किलपणा हा कायमच समोरच्याला आपलंसं करायचा.  समोरचा मग स्वतःच्या पक्षातला असेल अथवा पक्षाबाहेरचा, त्याला कधी, काय हवय याची उत्तम जाण आणि ते उपलब्ध करून देण्यासाठी लागणारे "रिसोर्सेस" कायम हाताशी असल्यामुळे काँग्रेसच्या गांधी घराण्यापासून, समाजवादी जॉर्ज फर्नांडिस ते अगदी डाव्या विचारसरणीच्या ज्योती बासूंपर्यंत सर्व जण जणू बैठकीतलेच मित्र होते त्यांचे.
NDA सरकार मधील विविध पक्षांची गोळाबेरीज करून त्यांचा हवा तो लसावी काढण्यात जर कोणी यशस्वी झालं असेल तर ते म्हणजे प्रमोद महाजन.

अजूनही जेव्हा जेव्हा त्यांचा फोटो किंवा त्यांची बातमी लोकं बघतात, ऐकतात तेव्हा एक विचार नक्कीच मनाला स्पर्शून जातो. आज आत्ता प्रमोदजी असते तर करण-अर्जुन नक्कीच एकत्र असते. मग कोणी धृतराष्ट्र नसता, कोणी संजय नसता न कोणी शकुनी.

हायटेक, हाय प्रोफाईल नेता म्हणून कायम ओळखले गेले आणि त्याचं त्यांना कधीही वावगं वाटलं नाही. उलट ते अभिमानाने सांगायचे "जेव्हा इन्कमिंगला सुद्धा per minute 16 रुपये चार्ज होता तेव्हापासून मोबाईल वापरणारा मी पहिला आणि एकमेव राजकीय नेता आहे".  अजून एक गंमत म्हणजे त्यांनी त्यांच्या दिल्लीच्या बंगल्यात प्रत्येक खोलीत एक  intercome टेलिफोन ठेवला होता. आश्चर्याची बाब म्हणजे बाथरुममध्ये सुद्धा. त्यावर त्यांना एका मुलाखतीत विचारलं असता ते म्हणाले होते "मी राजकीय नेता आहे. समाजकारण हे माझं पहिलं कर्तव्य आहे. त्यामुळे मी लोकांच्या आणि समाजाच्यासाठी  24 तास उपलब्ध असलं पाहिजे. कोणी फोन केला तर, "साहेब आत्ताच आंघोळीला गेलेत" हे टिपिकल उत्तर पीए नी द्यायला नको".  असा हा दूरदृष्टी, rather out of the box विचार करणारा नेता होता.

त्यांच्या आयुष्यातील स्थित्यंतरे आणि त्यांचा दुर्दैवी अंत बघता अजून पर्यंत कोणी त्यांच्यावर चित्रपट कसा नाही काढला हे आश्‍चर्यच आहे. कारण 'एका पर्वाचा उदय आणि दुर्दैवी अस्त' हा प्लॉट कायमच चित्रपटकारांना आणि रसिकांना खुणावणारा असतो. तसंही सध्या बायोपीकचं पीक जोमातच आहे.

"मुंबई का किंग कौन" तसं "मोबाईलचा किंग कौन" असं म्हटलं तर एक म्हणजे सरकार मध्ये असलेले प्रमोदजी आणि व्यवसायात असलेले अंबानी.  जेव्हा हे दोन किंग एकत्र आले तेव्हा भारतात मोबाईल क्रांती घडणारच होती आणि ती आज आपण अनुभवतोय.

त्यांचा एक स्वभाव विशेष वाखाणण्याजोगा होता. त्यांच्यावर कित्येक वेळा टीका, आरोप, प्रत्यरोप झाले. पार रिलायन्स मधील भागीदारी पासून, त्याच्या शायनिंग इंडिया कॅंपेनमुळे पडलेले NDA सरकार असेल किंवा हितसंबंधाचे आरोप असतील. त्यांनी कायमच त्यांसगळ्यांकडे मिश्किल हसत 'उस मे क्या है! म्हणत स्वतःचं नाणं प्रत्येक क्षेत्रात खणखणीत वाजवलं आहे. आणि बघा ना हे सगळे आरोप किंवा त्यांच्यावर असलेले विविध शंका कुशंका हे जरी आपल्याला माहिती असलं तरी प्रमोद महाजन असं म्हटल्यावर मनात एक जो काही आदर किंवा 'अरे, काय जिंदादिल माणूस होता यार!' हा जो भाव निर्माण होतो ना त्यातच त्यांच्या प्रसिद्धीचे यश आहे.

हल्ली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोणालाही भेटतात. पण त्याकाळी साधारण 90 च्या दशकात अमेरिका, ब्रिटन, जर्मनी आणि विविध देशांचे राष्ट्राध्यक्षांना आपल्या दिल्लीच्या घरी बोलवून खास भारतीय आणि महाराष्ट्र  व्यंजनांचा आस्वाद देणारा हा एकमेव कलंदर नेता प्रमोद महाजन.

प्रमोदजी, मला तुमची ९४-९५ साली पुण्याच्या सारसबागेच्या इथली बाळासाहेब ठाकरेंबरोबर झालेली सभा बघितलेली अजूनही आठवतीय. आठवतीयं काय मनात कोरुन ठेवली गेलीय म्हणा ना..

तो शॉर्ट कुर्ता आणि पायजमा, पायात साध्या चपला, हात सारखा वर करून बोलण्याची स्टाईल, मध्येच एखादा मिश्किल विनोद, माइक विना सुद्धा किलोमीटर भर ऐकू जाईल असा खणखणीत आवाज, ओघवती बोलीभाषा आणि मुद्दा स्पष्टपणे पटवून द्यायची कला. खरंच कमाल, कमालच होतात तुम्ही....

प्रमोदजी तुम्हाला तुमच्या पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली

धन्यवाद
© मिलिंद सहस्त्रबुद्धे
०३/०५/२०२०

सदाशिव पेठ पुणे ३०

Comments

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

*आपण सारे अर्जुन*

*आपण सारे अर्जुन* © मिलिंद सहस्रबुद्धे                   गुरुवारी रामनवमी झाली होती आणि शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बहुतांश घरात लगबग सुरू होती. नऊच्या रामायणाची नाही तर नऊ वाजता देशाचे पंतप्रधान काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत आणि देशाच्या जनतेशी व्हिडिओकॉल द्वारे संवाद साधणार आहेत त्याची. प्रत्येक जण वाट बघत होता नऊ वाजण्याची आणि एकदाचे नऊ वाजले.  प्रत्येक न्युज चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुरू झाला. नेहमीप्रमाणे मोदींनी त्यांच्या शैलीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर भाष्य तर केलेच. खरंतर ते  बोलत असताना प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता की मोदी घोषणा काय करणार. भारतातल्या सवासौ करोड जनतेला आता मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवरून बोलतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करणार असं नक्की माहिती असते. आमच्या ह्या भाऊ चा धक्का आज काय दे धक्का देणार ह्याकडे सगळ्यांचं जीव मुठीत घेऊन लक्ष होतं. तसं पाहायला गेलं तर आदल्या दिवशी जेव्हा मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितलं होतं की मी उद्या सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. तेव्हापासूनच तर्क-वितर्कांचे घोडे वि