Skip to main content

*आपण सारे अर्जुन*

*आपण सारे अर्जुन*

© मिलिंद सहस्रबुद्धे
                  गुरुवारी रामनवमी झाली होती आणि शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बहुतांश घरात लगबग सुरू होती. नऊच्या रामायणाची नाही तर नऊ वाजता देशाचे पंतप्रधान काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत आणि देशाच्या जनतेशी व्हिडिओकॉल द्वारे संवाद साधणार आहेत त्याची. प्रत्येक जण वाट बघत होता नऊ वाजण्याची आणि एकदाचे नऊ वाजले.  प्रत्येक न्युज चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुरू झाला. नेहमीप्रमाणे मोदींनी त्यांच्या शैलीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर भाष्य तर केलेच. खरंतर ते  बोलत असताना प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता की मोदी घोषणा काय करणार. भारतातल्या सवासौ करोड जनतेला आता मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवरून बोलतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करणार असं नक्की माहिती असते. आमच्या ह्या भाऊ चा धक्का आज काय दे धक्का देणार ह्याकडे सगळ्यांचं जीव मुठीत घेऊन लक्ष होतं.
तसं पाहायला गेलं तर आदल्या दिवशी जेव्हा मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितलं होतं की मी उद्या सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. तेव्हापासूनच तर्क-वितर्कांचे घोडे विविध दिशेने उधळायला सुरुवात झाली होती.
                    प्रत्येक चॅनेल, सामान्य नागरिक आणि कित्येक हो कॉल्ड बुध्दीवंत लोकांनी विविध तर्क लावायला सुरुवात केली होती. मोदी आता लॉकडाउन काढून घेणार?, का अजुन वाढवणार,  प्रत्येक घराघरात पंधरा हजार रुपये देणार (आवडीचा विषय)? किंवा प्रत्येक घराला काहीतरी अन्नधान्य, मास्क पुरवणार किंवा  विविध उपाययोजना यांची माहिती देणार? का आमचं सरकारच किती भारी आहे ह्याचे ढोल बडवणार. अशा वेगवेगळ्या तर्कांनी पूर्ण दिवस विविध चॅनेल भरभरून वाहत होते.  त्यामुळे नक्कीच आजच्या नऊ वाजताची वाट सगळे जण आतुरतेने बघत होते.
                   मग तो क्षण आला आणि मोदींनी घोषणा केली की 5 एप्रिल रोजी रविवारी प्रत्येक जणांनी रात्री नऊ वाजता घरातले दिवे बंद करून विविध छोटे दिवे घराच्या बाल्कनीत अंधारात नऊ मिनिटे लावावेत.  हया संदेशात मोदींनी एक महत्त्वाची बाब सांगितली ती म्हणजे जनताजनार्दन. (ज्याच्याकडे सर्वांनी सोयीस्कर रित्या दुर्लक्ष केलं)"जनताजनार्दन हीच माझ्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी देव आहे, परमेश्वर आहे."  ते ऐकल्यावर मला असं वाटून गेलं की मोदींना असं सुचवायचे की एकत्रितपणे एकाचवेळी दिवे लावणे म्हणजे एका अर्थाने परमेश्वराकडे, परमेश्वराकडून आणि परमेश्वरासाठी घातलेलं साकडं आहे की या अस्मानी संकटातून आम्हाला वाचव.

भाडिपा webseriesचे जे चाहते(भक्त)  आहेत त्यांना "शास्त्र असते ते" हे जसं माहितीये  त्या प्रमाणे भाजपचे चाहते आहेत त्यांच्या दृष्टीने मोदीजी जे सांगतात ते "शास्त्र असते ते" असं आहे. ह्या घोषणेनंतर अर्थातच त्याच्यांत सर्वत्र एक उत्साह संचारला. सामान्य लोकांमधे पण तेवढाच.

 साधारणता मोदीजी जेव्हा जेव्हा काही बोलतात तेव्हा त्याच्या विरोधात बोलणारे आपल्याकडे दहा टक्के गैंग आहेच. ह्या दहा टक्के लोकांना कायमच विविध चॅनेल्स विविध पत्रकारकडून नेहमीच हीच 100% असल्यासारखा भासवण्यात आलेलं आहे. हळूहळू ह्या कोरोना संकटामध्ये सर्वसामान्य जनतेला हे जाणीव झालेली आहे  कि या संकटातून मोदींनी ज्या पद्धतीने आपल्या देशाची परिस्थिती हाताळली आहे ती खरंच कौतुकास्पद आहे.  दहा टक्के लोकांनी कितीही त्याचा विपर्यास केला तरी जगभरातून तसेच WHO सारख्या आरोग्य विषयक जागतिक संघटनेकडून होणारं कौतुक, हे असं प्रमाणपत्र आहे की ज्याला कोणी कानाडोळा करू शकणार नाही.

Visionary Leadership किंवा Situational Leadership चा उत्कृष्ट नमुना हा नरेंद्र मोदींच्या विविध कार्यातून आणि जनतेशी योग्य वेळी संवाद साधण्याच्या भुमिकेतून प्रकर्षाने दिसतो आणि त्याची जाणीव पदोपदी होते. ती ह्यावेळेस सुध्दा आली.

युद्धभूमीवर जेव्हा एखादा सरसेनापती आपल्या सैन्याला उद्देशून संबोधित करत असतो की हे युद्ध आपल्याला लढायचं, जिंकायचयं तेव्हा आपल्याकडे किती भाले, तलवारी, बंदूका आहेत किंवा किती मनुष्यबळ आहे याची माहिती तो कधीच सैन्याला देत नसतो. तर तो त्याच्या संभाषणातून सैन्याचे मनोधैर्य, मनोबल उंचावत असतो. कारण शस्त्रास्त्र असून सुद्धा जर मनोबल उंचावलेले नसेल तर आपण बघितलंच आहे की भल्याभल्यांच पानिपत व्हायला वेळ लागत नाही.

चक दे इंडिया मध्ये शाहरुख खान किंवा लगान मधला अमीर खान शेवटच्या मॅचच्या आधी आपल्या टीमला उद्देशून बोलतो तेव्हा तो त्यांच्याकडे असलेली बॅट, बॉल, हॉकी स्टिक, तुमची उंची किती, तुमची ताकद किती याविषयी न बोलता तो त्यांच्यात देशाबद्दलचे किंवा जिंकण्याबद्दल मनोधैर्य वाढवत असतो. ते जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्या डोळ्यात पाणी येतं आपण भारावून जात. तसंच काहीसं मोदींनी जनतेशी संवाद साधला तेव्हा त्यांच्या सव्वाशे करोड टीमला उद्देशून त्यांनी टीमचं या युद्धासाठी मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला.

मोदीजी आपल्याकडे किती हॉस्पिटल्स आहेत, वेंटीलेटर आहेत किंवा मास्क किती आहेत किंवा गोरगरिबांसाठी काय करतोय हे सगळं सांगत बसले नाहीत. कारण ती सर्व माहिती द्यायला हे भाषण म्हणजे Everyday Press Briefing नव्हे. सरकारी यंत्रणेतील विशिष्ट उच्च अधिकारी रोज सकाळी ते सगळं करतच आहेत.

मोदींनी हेच सगळं सांगितलं असतं. पण हेच सांगण्याने कदाचित सर्वसामान्य माणूस जो सध्या घरात बसलेला आहे त्याच्या मनात एक अशी भीती किंवा Panic निर्माण झाला असता, की नेतृत्व एवढं सांगतय म्हणजे ह्यांच्याकडे मोठी इन्फॉर्मेशन आहे की काय. की ज्याच्यामुळे आत्तापासूनच आपल्याला indirectly alert करतायत. कारण सध्या घरात बसलेल्या प्रत्येक माणसाचं मन किंवा मेंदू हा "खाली दिमाग शैतान का घर" झालेला आहे.  अशा मुक्त मेंदू आणि मनाला कंट्रोला करण्यासाठी एक व्हिजन किंवा एक उद्दिष्ट देणं हे गरजेचं होतं. 
म्हणूनच मी वर म्हटलं तसं Visionary Leadership.  कोणत्याही लीडरला (मुद्दाम नेता म्हंटलं नाही) हे माहिती असतं की त्याच्या टीमला त्याने जर का एक Goal(उद्दिष्ट) दिलं आणि एक Time line दिली तर नक्कीच टीम त्या गोलच्या(उद्दिष्टाच्या) दिशेने धावायला सुरुवात करते.  मग तेच बेसिक मॅनेजमेंट स्किल मोदींनी पण अवलंबलेले दिसते. त्यांनी या घरी बसलेल्या शेकडो करोड जनतेला (टिमला) एक Target  दिलं, त्याच्यासाठीची ऍक्टिव्हिटी दिली. या सगळ्या जनतेला एक उद्दिष्ट दिल्यासारखं 5 एप्रिल आणि तुम्ही काय करायचे.

तुम्हाला सगळ्यांना हे जाणवलं असेलच की ह्या घोषणेनंतर, बहुतांश लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा उत्साह संचारला असेल. कसे दिवे लावायचे प्रत्येक जण घरात या विषयावर नक्की चर्चा झाली असेल. मग कोण मेणबत्ती लावणार, कोण पणती लावणार, मोबाईल लावणार टॉर्च लावणार. म्हणजे काय तर आपोआपच तुम्हाला एक उद्दिष्ट मिळालं. सतत घरात बसून जो आळस आला होता किंवा एक शरीराला,  मनाला जो शीण आला होता त्याच्यात एकदम उत्साह निर्माण झाला.

अर्थातच नेहमीप्रमाणे नागा साधूंसारखे आपल्याच धुंदीत असणारे भक्त आहेत त्यांनी विविध खगोल, ज्योतिष,  ग्रह शास्त्रीय असे मेसेजेस किंवा अशा आशयाच्या कल्पना लढवून लोकांना माहिती द्यायला सुरुवात केली की 5 एप्रिलच का. परंतु ह्यया सगळ्या गोष्टींचा फारसा फरक आता लोकांवर पडत नाही कारण सोशल मीडिया वापरणारे सगळेच लोक जागरूक आणि सोशल मीडिया शिक्षित पण झालेले आहेत. त्यामुळे जसं आपण नागा साधूंकडे एका उत्सुकतेने बघतो पण आपल्याला माहिती असतं की ते त्यांच्याच धुंदीत वावरतात, तसंच काहीसं ह्या सोशल मीडियावरच्या भक्त नागासाधूंकडे हल्ली लोक  बघायला लागले आहेत.

मोदींनी काही मिनिटच्या संदेशात, अर्थशास्त्र, देशाची आर्थिक परिस्थिती किंवा देशाचा जीडीपी अश्या सगळ्या विषयांवर बोलायला भारत काही अमेरिका नाही. कारण अमेरिका हे भांडवलशाही वर आधारित उभारलेले राष्ट्र आहे. जरी त्यात लोकशाही असली तरी ती संसदीय लोकशाही आहे. भारताची परिस्थिती वेगळी आहे. भारत हा लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य हया आधारावर उभा राहिलेला देश आहे. जसा भारत हा शेतीप्रधान आहे तसाच आणि तितकाच भावनाप्रधान देश आहे. या देशात "सबसे बडा रुपया" पेक्षा "सबसे बडा दिलवाला" याला जास्त किंमत आहे. अतिथी देवो भव यांसारखे सुविचार हे आपण दैनंदिन जीवनात जगतो. त्यामुळे देशासमोर, भारतीय जनतेसमोर बोलताना आर्थिक विषयाला हात घालण्यापेक्षा मोदींनी नक्कीच भावनिक विषयाला हात घालून लोकांचं मनोधैर्य वाढवले. लोकांनाही उद्धिष्ट दिले हे खरंच कौतुकास्पद आहे.

हे सर्व वाचताना तुम्हाला एखाद वेळेस नक्की वाटू शकतं की मी मोदींचा भक्त आहे,  मी मोदींचा चाहता आहे म्हणून मी हे सगळं लिहितोय. माझं सोडा. तर थोडा तुम्ही पण विचार करा की एखाद्या देशाच्या नेतृत्वानी स्वतःच्या जनतेची नस ओळखून त्यांना काय दिलं पाहिजे आणि सध्याच्या परिस्थितीत कशाची गरज आहे हयाची जाणीव त्याला असणे हे फार महत्त्वाचे आहे. नाहीतर आत्ताच्या परिस्थितीत अमेरिका, इटली, जपान, इंग्लंड, जर्मनी यासारखे बलाढ्य देश अक्षरशः धारातीर्थी पडलेले आहेत. अशा कठीण वेळेस भारतासारखा सर्वात जास्त लोकसंख्या आणि कमी भूभाग असलेला प्रदेश सुद्धा एखाद्या वीर अभिमन्यू प्रमाणे लढतोय. 

मला खात्री आहे की मोदींजीच्या नेतृत्वात हा देश कोरोनारुपी चक्रव्युहात आत जाताना जरी अभिमन्यू म्हणून गेला असेल तरीही चक्रव्यूह भेदून अर्जुन म्हणूनच बाहेर  येईल.

© मिलिंद सहस्रबुद्धे
०५ एप्रिल २०२०

Comments

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी