Skip to main content
शिर्षक मुद्दामच शेवटी लिहलयं...
वाचतांना तुम्हाला सुचतयं का बघा.. आणि सांगा.


              जाग आली अन् बघते तर काय सहा वाजून गेलेले. पटापट आवराआवरी केली आणि किचनमध्ये आले.  चहा टाकला पटकन. बाहेरचं वातावरण बघून कळतच नव्हतं सकाळ झाली का संध्याकाळ. सध्या रात्र काय दिवस काय आणि पहाट काय आणि संध्याकाळ काय. सगळं सारखंच वाटतंय कारण पक्षी दोन्ही वेळेस ओरडतात आणि कुत्री कायमची भुंकणं बंद झाली आहेत. 
जरा शुद्धीवर आल्यासारखी झाल्यावर कळले की संध्याकाळ झाली आहे. दुपारचे जेवण झाल्यावर ओटा आवरला. नंतर त्या व्हाट्सअप फेसबुक बघण्याच्या नादात कधी डोळा लागला कळलेच नाही. सध्या रोजच रविवार. भरगच्च नाश्ता तोसुद्धा वैविध्यपूर्ण आणि दुपारचं जेवण उशिरा तेसुद्धा चारीठाव.  दुसरा उद्योगच नाही. मग काय "पन्नास रुपये अनलिमिटेड थाळी" च्या पाटी सारखी मेस झालंय आमचं किचन.

ह्यांना चहा दिला. ह्यांना म्हणजे एरवी सुहासला मी अरे-तुरेच करते पण तुमच्या समोर म्हणून ह्ययांना बरं का.  तर सुहासला चहा दिला आणि बेडरूममध्ये अदिती खेळत होती एकटीच. अर्थातच एकटी नव्हती तिचा तो पण होता ना! लाडका जीवश्चकंठश्च प्राणप्रिय असा....मोबाईल

सुहास बाहेर हॉलमध्ये एबीपी माझावर कोरोना पेशंटचा आकडा किती वाढतोय हे बघत होता आणि त्याच्याकडे त्याचे लक्ष होतं. मला मात्र मेलीला चहा पिता पिता त्याच्याकडे बघताना असं वाटलं बसल्याबसल्या पोट किती वाढतयं ते बघ आधी. पण शेवटी मनातल्या मनात असा विचार करतच मी चहा पीत परत किचन मध्ये आले. सहज बघते तर काय भांडी घासून ठेवलेली आणि परत वाळत घातलेली. मी बुचकळ्यात पडले म्हणजे आश्चर्यचकित झाले. काय झालं, मला एक तर ती दुपारची झोपेची तार इतकी भारी झाली होती की खरंच काहीच आठवत नव्हतं. मग वाटलं आपणच आओट आवरतांना  घासून ठेवली असतील भांडी बहुतेक. असा विचार केला आणि मग संध्याकाळचा नाश्ता काय करायचा याचा विचार करू लागले.

सध्या दोन वेळचा नाष्टा, दोन वेळचं जेवण, अधून-मधून मिळून पाच ते सहा वेळा चहा-कॉफी झालं तर फलआहार असा भक्कम भटारखाना सतत चालू असतो.  च्यायला सॉरी हां पण असच बोलावसंवाटतंय म्हणून.  च्यायला साला तीन महिन्याचं अन्नधान्य, गॅस फळभाज्या तीन आठवड्यातच संपतील की काय असं वाटतंय. तीन आठवडे म्हणजे एकवीस दिवस. बहुतेक म्हणूनच सरकारने पण तीन आठवड्यासाठी तीन महिन्याचा शिधा गोरगरिबांना द्यायला सुरुवात केली असेल.
सध्याच्या मिसेस मुख्यमंत्री गायिका नाहीयेत पण तर पत्रकार आहेत अर्थातच संपादक.  त्यांना नक्कीच याची जाणीव असणार म्हणूनच आपल्या सरकारने या सर्वसामान्य गोरगरीब जनतेचं मातोश्री होऊन हा निर्णय घेतला असावा.

आज मस्त ब्रेड पॅटीस करूया असं म्हणत मी बाहेर आले तर सुहास खूष झाला. म्हणाला "त्यावर मस्त शेव , कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा टाक, त्या आपल्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये टाकतात ना अगदी तसाच." मी जरा सुहासकडे चिडून बघत म्हणलं "हो टाकते ना!  ते तर टाकतेच आणि हा लॉकडाउन संपला की तू घरी बस आणि मी एक हॉटेल टाकते" मी जरा चिडलेच होते. तेवढ्यात अदिती बाहेर आली, "आई भुक.. आज काय आहे मम्मा evening ला, प्लीज मला पास्ता कर ना! परवा सारखा"
झालं मी म्हणाले ना खरंच होटेलच टाकते बघाच आता सगळ्यांनी.  "आदिती, ती भांडी घेऊ नकोस की मी दुपारीच वाळत टाकली आहेत. दुसरी घे  कोणतीतरी ट्रॉलीतून." असे म्हणाल्यावर आदिती पटकन म्हणाली "मम्मा तू कुठे धुतललीयेस भांडी आज?"  मी जरा तिच्याकडे आश्चर्यचकित ह़ोऊन म्हणाले "म्हणजे? मग मीच तर दुपारी ओटा आवरला तेव्हा धुतली ना!" अदितीच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि ती म्हणाली " छे..आज बाबा ने धुतली सगळी भांडी आणि मग ओटा, गॅस पण पुसून घेतला त्यानी. मी त्याला पाणी टाकायला मदत केली.."
"अय्या!  हो का ! अगोबाई, तरीच म्हणलं की सगळी भांडी एकावर एक, ताटं आडवी आणि त्यावर पातेली . अशी वेडीवाकडी भांडी मी कशी वाळत घालेन?" पण खरंच सुहासनी धुतली आज भांडी. अरे वा किती छान. मला मनात जो काही आनंद झाला ना आदिती जवळ होती म्हणून नाही तर मी त्याला मिठीच मारली असती.  तेवढ्यात सुहास सॉरी हां 'आमचे अहो'  आत आले. आता 'अहो' अगदी मनापासून म्हणते बरं का!

मी सुहासला म्हणलं "सुहास आज सगळी भांडी तु घासलीस,  किती छान खूप खूप थँक्यू तुला". त्यावर सुहास जरा कॉलर ताठ करूनच म्हणाला "हो, म्हटलं, तू एवढं सगळं करतेस. दिवसभर आमचं खाणं-पिणं, कपडे धुणं, भांडी केरवारे. सध्या कुठल्याच मावश्या पण येत नाहीत आपल्याकडे. म्हणलं आपण पण थोडीशी मदत करावी तुला. ते व्हाट्सअप वर आलाच आहे ना सध्या आपण सगळे ' Maid for Each Other' म्हणलं तसंच जरा"

हे सगळं ऐकल्यावर मला जो काही हुरूप आला आहे. काय काय वाटलं म्हणून सांगू आणि सुहास साठी काय करू न काय नको असं झालं. असा नवरा सगळ्यांना मिळो गं आंबाबाई असा शंभर वेळा मनात विचार आला.  खरंच गो कोरोना गो.
मग मी ब्रेड पॅटीस छान बटर लावून तळले. सुहासला आवडते तशी पुदिना आणि चिंचेची चटणी केली. ते ब्रेड पॅटीस मधोमध कापून त्यावर शेव, कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा, हिरवी ब्राऊन चटणी सजवून दिलं. खुश झाला सुहास.  आदितीला पण पटकन छान पास्ता बनवून दिला. माझं काय नेहमीप्रमाणे दोन्ही खाल्लं थोडं थोडं.

थोड्यावेळाने मग मस्त चहा केला. सुहासला बाहेर नेऊन दिला आणि मग मी डायनिंग टेबलवर बसले तेच नेहमीचं व्हाट्सअप फेसबुक काहीतरी वाचत.
सुहास बाहेर हॉलमध्ये बसला होता तेवढ्यात त्याला योगेश चा म्हणजे त्याच्या मित्राचा फोन आला आणि मग त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. सुरुवातीला कोरोनाचे पेशंटचा आकडा कसा वाढतोय, मग सध्या पंतप्रधान काय म्हणतायेत मुख्यमंत्री काय उपाय करतायत. ट्रंप  कसं इकॉनोमी बद्दलच बोलतोय. असे सगळे विषय करत करत त्यांच्या गप्पांची गाडी बॉलीवूडवर आली. बॉलीवूड च्या गप्पा चालू असतानाच सुहास एकदम जोरात म्हणाला "अरे योग्या, तो 'कतरिनाचा'  चा व्हिडिओ पाहिलास ना. अरे काय साला काटा दिसते रे भांडी घासतांना पण.  एवढी कंडा दिसते ना काय सांगू. मी तो व्हिडीओ परत परत पाहिला आणि मग काय म्हणलं 'कतरिना' जर घरी भांडे असू शकते तर आपण का नाही घासू शकत. तिचा तो व्हिडिओ बघत बघत दुपारी घरची सगळी भांडी घासून टाकली. साला व्हिडिओ बघताबघता भांडी कधी घासून झाली कळलंच नाही." "आणि हो परत आमच्या मॅडम पण भांडी घासली म्हणून खूष झाल्या"  अशा त्यांच्या गप्पा रंगल्या आणि मग स्टॉक एक्सचेंज आणि स्टॉक मार्केट कडे वळल्या

मला मात्र एवढं ऐकल्यावर जाम संताप आला. मी जाम तडकलेच. म्हटलं अच्छा म्हणजे हे 'गो कोरोना गो नाहीतर ओ कतरिना ओहो असं प्रकरण आहे तर.  बाहेर जाऊन सुहासचा चांगला समाचार घ्यावासा वाटला पण म्हटलं जाऊ दे 'त्यानिमित्ताने तरी त्यांनी घर काम केलं ना, थोडा तरी चार प्रेमाचे शब्द बोलला ना, थोडं तरी कळालं त्याला की दिवसभर काय काय काम असतं ते.  उलट त्यानंतर मनात कतरिनाला दुवा देत मी म्हटलं अगोबाई असं तु 'करीना' आणि 'रवीना' ला पण सांग गं बाई भांडी घासायला, कपडे धुवायला आणि आठवणीने त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करायला. म्हणजे मग त्यांचे पण जे विविध सुहास असतील ते घरात मदतीचा हात पुढे करतील. हो की नाही.....

शेवटी गो कोरोना गो नाही तर आता थँक्यू कतरीना थँक्यू...


शिर्षक....."मी, कतरिना आणि लॉकडाउन"

© मिलिंद सहस्रबुद्धे
सदाशिव पेठ, पुणे ३०

Comments

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी

*आपण सारे अर्जुन*

*आपण सारे अर्जुन* © मिलिंद सहस्रबुद्धे                   गुरुवारी रामनवमी झाली होती आणि शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बहुतांश घरात लगबग सुरू होती. नऊच्या रामायणाची नाही तर नऊ वाजता देशाचे पंतप्रधान काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत आणि देशाच्या जनतेशी व्हिडिओकॉल द्वारे संवाद साधणार आहेत त्याची. प्रत्येक जण वाट बघत होता नऊ वाजण्याची आणि एकदाचे नऊ वाजले.  प्रत्येक न्युज चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुरू झाला. नेहमीप्रमाणे मोदींनी त्यांच्या शैलीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर भाष्य तर केलेच. खरंतर ते  बोलत असताना प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता की मोदी घोषणा काय करणार. भारतातल्या सवासौ करोड जनतेला आता मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवरून बोलतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करणार असं नक्की माहिती असते. आमच्या ह्या भाऊ चा धक्का आज काय दे धक्का देणार ह्याकडे सगळ्यांचं जीव मुठीत घेऊन लक्ष होतं. तसं पाहायला गेलं तर आदल्या दिवशी जेव्हा मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितलं होतं की मी उद्या सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. तेव्हापासूनच तर्क-वितर्कांचे घोडे वि