Skip to main content
खिचडी..

नेहमीप्रमाणे संध्याकाळी ऑफिसमधून घरी आलो कुलूप उघडले. सैक टाकली आणि टीव्ही लावला, ऑस्ट्रेलिया- इंग्लंड क्रिकेट मैच चालू होती. पाटीवरचा निरोप वाचला "खिचडी केली आहे, गरम करून घ्या छान". संध्याकाळचे साधारण सात साडेसात वाजलेले, मनात म्हटलं छान आटपू आणि गरमागरम डाळ तांदूळ खिचडी दूध-तूप घालून, बाजूला लिंबाचं लोणचं टॉक्, जमलं तर एखादा पापड भाजू गैसवर...
मस्त फ्रेश झालो आणि ओट्यापाशी आलो. पातेल्याचे झाकण उघडलं आणि बघतो तर काय? च्यायला.. दूध खिचडीला विरजण लागलं ना.
खिचडी म्हणजे साबूदाण्याची खिचडी केली होती. फुल पोपट झाला. मग लक्षात आलं अरे हा! आज संकष्टी चतुर्थी होती ना... म्हणून सकाळचा उरलेल्या साबुदाणा बाईसाहेबांनी "तुम्हाला आवडते ना" या नावाखाली (सरकवलेला) शिजवलेला दिसतोय.

'छान' 'सुंदर' 'अय्या किती गोड' असे शब्द हिने वापरले ना! की का कुणास ठाऊक उगाच मनात शंका चुकचुकतेच. आत्ता ही तसचं झालं "गरम करून घ्या छान"

कसं आहे बघा, काही पदार्थ हे ज्या त्या वेळीच खाण्यात जी मजा आणि रंगत येते ना, ती इतर वेळी नाही. साबुदाणा खिचडी म्हणजे शनिवार, गुरुवार किंवा रविवार सकाळच. रविवारी बिन उपवास वाले स्पेशल. साधारण साडे आठ नऊची वेळ, तूप जिरे फोडणीचा खमंग वास, मिरची चा ठसका, परतलेल्या दाण्याचं कूट घालून मऊ लुसलुशीत शिजवलेला तो टपोरा पांढरा साबुदाणा. त्याला जो काही वास येतो ना त्या वासानेच जिभेची वासना निर्माण व्हायला लागते. जणू ती त्या खिचडीची वाटच बघू लागते

मस्त वाफावळलेली, माझ्या आईच्या भाषेत पहिल्या वाफेची.  ती लोभस थोडी ब्राऊन थोडीशी पांढरी खिचडी प्लेटमध्ये वाढली जाते. ती प्लेट सुद्धा टिपिकल साधारण हातात मावेल आणि तळहातापेक्षा थोडीशी मोठी. स्टीलची बरं का! उगाच microwave safe वाली नाही. त्यावर मग ताज खोवलेलं पांढरेशुभ्र नारळाचे खोबरे. ते कधी कधी मला शिसपेन्सिलीला टोक केल्यावर जे टोक यंत्रातून कातरकाम बाहेर येतं तसं दिसतं. म्हणजे दिसताना जरी पांढरेशुभ्र असलं तरी कुठे कुठे खोबऱ्याच्या पाठीच्या काळ्या विटकरी कडा दिसत असतात.
त्यावर जणू छम छम आवाजच करत येते अशी हिरवीगार कोथिंबीर. बारीक चिरलेली कोथिंबीर जेव्हा भुरभुरलेली असते, तेव्हा उगाच बालकवींची हिरवे हिरवे गार गालीचे कवितेची आठवण होते.  मिरची चे एखाद दोन कापलेले तुकडे खरंतर काढून टाकण्यासाठी च असतात पण ते पाहिजेतच कारण दिसले नाहीत तर गोडीळ तर नाही ना अशी शंका नको. साईडला अगदी बरोबर चतकोर काटेकोर कापलेली लिंबाची रसरशीत पिवळी धमक फोड. त्या फोडीत एक अर्धवट बी असलीच पाहिजे नाहीतर मग लिंबू पिळायच्या आधी झटकायची मजा कशी येणार. साईडला  छोटा चमचा स्टीलचाच.

अशी ही "खिचडी" नावाची अप्सरा सर्व बाजूंनी नटली की मग तो वाफा येणारा, जिभेला थोडा चटका बसणारा, किंचीत आंबट झालेला आणि अविस्मरणीय चवीचा पहिला घास तोंडात गेल्यावर जे काही स्वर्गसुख किंवा बहुतेक त्याहीपेक्षा वरचा आनंद मिळतो तो ज्याचा त्यालाच कळतो.

अगदी पहिल्या घासापासून ते शेवटच्या घासापर्यंत मउ लुसलुशीत साबुदाणा चावतांना,  अर्थातच तो कितपत पूर्ण चावला जातो माहित नाही पण जे काही चर्वण होते त्यातून पोटाचा अग्नी कमी आणि जिव्हेची क्षुधा शांत जास्त होते.

तशी ही खिचडी पित्तकारक असते असे म्हणतात. परंतु जेव्हा ही अप्सरा आपल्यापुढे नटून-थटून प्लेटमध्ये येते आणि मग घरच्या मंडळीं पैकी आजी, मावशी,काकू किंवा आपलीच आई असं कोणी म्हणतं "खा रे ...एका डिशनी काही होत नाही"  तेव्हा मात्र जे पित्त खवळते ते फक्त ती खिचडीच शांत करू शकते.

शेवटी ती "छान" साबुदाणा खिचडी मी मग माइक्रोवेव मधे गरम करून खाल्ली. बाहेर हॉल मधे येऊन क्रिकेट मैच बघत बसलो. अचानक मनात आलं...

क्रिकेटच्या वर्ल्ड कपची फायनल मैच लॉर्डस ग्राउंडवर बघण्यात जी मजा आहे ती कितीही लश ग्रीन केलेलं असलं तरी  कोलकत्याच्या इडन गार्डन वर नाही. तसंच काहीसं, सकाळी साडे आठ नऊ वाजता गरम खिचडी खाण्यात जी मजा आहे ती संध्याकाळी सात आठ वाजता खिचडी गरम करून खाण्यात नाही.

---© मिलिंद सहस्रबुद्धे (एकशुन्यशुन्यशुन्यबुध्दे)

Comments

Popular posts from this blog

१९९२ चे अमिताभ बच्चन

 १९९२ चे अमिताभ बच्चन  पुण्यातील बाजीराव रोडवरील महत्त्वाची खूण म्हणजे आमची नूमवि मुलांची शाळा होय. रस्त्यावरील शाळेच्या कमानीतून आत गेल्यावर लागतं ते एक भलं मोठं इथून-तिथून पसरलेले आडवं प्रवेशद्वार. साधारण पाच-सहा फूट उंचीचं हे गेट कायम लक्षात राहिलं. मधल्या सुट्टीत शाळेतून पळून जाताना ह्याच्यावरुनच उडी मारावी लागायची. मोठ्या सुट्टीत मुख्य प्रवेशद्वार बंद असायचं आणि आम्ही उजव्या किंवा डाव्या बाजूने असलेल्या छोट्या दरवाजातून ये-जा करत असू. शाळेच्या बाहेर जाण्याची मुख्य आकर्षण म्हणजे चिंच आणि पेरूची गाडी, लाल पांढऱ्या गोळ्या विकणारा तो लेंगा-टोपीवाला म्हातार बाबा. ५० पैशात मिळणारी पावभाजी आणि २५ पैशात मिळणारी भेळ. आहाहा! त्या सगळ्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे.  प्रवेशद्वाराच्या मधोमध उभा राहिलं आणि समोर पाहिलं की शाळा म्हणजे अक्षरशः भव्य राजवाडा वाटतो. दोन्ही बाजूंनी काळ्या दगडात बांधलेली तीन मजली कौलारू भक्कम इमारत. ह्या सलग दोन्ही बाजूच्या इमारती जिथे एकत्र होतात ते मोठं प्रशस्त सभागृह. ह्याच सभागृहात दरवर्षी स्नेहसंमेलनातील गाजणारे कार्यक्रम म्हणजे, परचुरे सरां...

"साय"कल

  "साय"कल "तुम्ही कधी प्रेमात पडलात का?" "तुम्ही कधी सायकलवरुन पडलात का? ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं ठामपणे "हो" अशी देताना प्रत्येक जणांच्या डोळ्यात दिसणारी चमक एक सारखीच असते. सायकल वरून पडणे ही एक अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट असते. "सायकलवरून पडल्यावरच सायकल येते" हा सुविचार "शास्त्र असतं ते" सारखा आहे. सायकल शिकणे आणि शिकवणे ह्या दोन विरुद्ध टोकाच्या कला आहेत. जेव्हा आपण सायकल शिकत असतो, तेव्हा समोर आलेला प्रत्येक जण, प्रत्येक गोष्ट आपल्याला मोठ्या रा‌क्षसी संकटासारखी भासते. खरंतर पुढील आयुष्यात त्याहूनही अनेक समस्या, विघ्ने येतात. पण शिकतांना साधं छोटं कुत्रं असेल किंवा मोठी गाडी, समोर आल्यावर भासणारी ती भीती म्हणजे 'या सम हीच' अशी असते. मात्र हेच आपण सायकल शिकवत असतो तेव्हा "अरे किंवा अगं का थांबलीस, उगाच घाबरतेस, साधी स्कूटर तर होती!" अश्या समोरच्याला किरकोळीत काढणार्या वाक्यांची पेरणी चालू असते. आपण स्वतः शिकताना कधीच Hopping ने सुरुवात करत नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे पहिली सायकल सुरुवात ही बिन द...

दादा परत या..

  दादा परत या.. "मी कोणाच्या बापालाही घाबरत नाही" असं तुमच्या कडक आवाजात ऐकताना पुन्हा पुन्हा तुमची उणीव भासते. तुमच्याकडून चुकून बोली भाषेतील शब्दांची उठाठेव कधीतरी झालीही असेल. परंतु संस्कृतीच्या मर्यादा मग त्या राजकीय असतील अथवा सामाजिक तुम्ही कधीही ओलांडल्या नाहीत. कोणा एखाद्यावर उगाच खालच्या भाषेत टीकाटिप्पणी केली नाहीत. तर कधी सत्तेच्या गुर्मीत कोणाची निंदा नालस्ती केल्याचं आठवत नाही. तुमचा बाज आणि दरारा वेगळाच होता आणि आहे. प्रशासनावरची पकड म्हणजे जणू बापाने रस्ता ओलांडताना मुलाचा धरलेला घट्ट हात. धरलेल्या त्या हातात काळजी ही असतेच पण तेवढाच धाक असतो. तशी तुमची प्रशासनावरची पकड आहे. आमच्या पुण्याच्या पालकमंत्री पदी असताना तुमचा आठवड्याला किंवा महिनाभरातील एखादा दौरा ठरलेलाच. हा दौरा म्हणजे साध्या शिपायापासून ते मुख्य आयुक्त पर्यंत एक भीती असायची. महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यापासून ते अगदी रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलीसापर्यंत "दादा आज पुण्यात येणार" हे आधी दोन दिवसापासूनच चर्चेत असायचे. तुम्ही ज्या दिवशी येणार त्या दिवशी सकाळी सात ते रात्री दहापर...