Skip to main content
खिचडी..

नेहमीप्रमाणे संध्याकाळी ऑफिसमधून घरी आलो कुलूप उघडले. सैक टाकली आणि टीव्ही लावला, ऑस्ट्रेलिया- इंग्लंड क्रिकेट मैच चालू होती. पाटीवरचा निरोप वाचला "खिचडी केली आहे, गरम करून घ्या छान". संध्याकाळचे साधारण सात साडेसात वाजलेले, मनात म्हटलं छान आटपू आणि गरमागरम डाळ तांदूळ खिचडी दूध-तूप घालून, बाजूला लिंबाचं लोणचं टॉक्, जमलं तर एखादा पापड भाजू गैसवर...
मस्त फ्रेश झालो आणि ओट्यापाशी आलो. पातेल्याचे झाकण उघडलं आणि बघतो तर काय? च्यायला.. दूध खिचडीला विरजण लागलं ना.
खिचडी म्हणजे साबूदाण्याची खिचडी केली होती. फुल पोपट झाला. मग लक्षात आलं अरे हा! आज संकष्टी चतुर्थी होती ना... म्हणून सकाळचा उरलेल्या साबुदाणा बाईसाहेबांनी "तुम्हाला आवडते ना" या नावाखाली (सरकवलेला) शिजवलेला दिसतोय.

'छान' 'सुंदर' 'अय्या किती गोड' असे शब्द हिने वापरले ना! की का कुणास ठाऊक उगाच मनात शंका चुकचुकतेच. आत्ता ही तसचं झालं "गरम करून घ्या छान"

कसं आहे बघा, काही पदार्थ हे ज्या त्या वेळीच खाण्यात जी मजा आणि रंगत येते ना, ती इतर वेळी नाही. साबुदाणा खिचडी म्हणजे शनिवार, गुरुवार किंवा रविवार सकाळच. रविवारी बिन उपवास वाले स्पेशल. साधारण साडे आठ नऊची वेळ, तूप जिरे फोडणीचा खमंग वास, मिरची चा ठसका, परतलेल्या दाण्याचं कूट घालून मऊ लुसलुशीत शिजवलेला तो टपोरा पांढरा साबुदाणा. त्याला जो काही वास येतो ना त्या वासानेच जिभेची वासना निर्माण व्हायला लागते. जणू ती त्या खिचडीची वाटच बघू लागते

मस्त वाफावळलेली, माझ्या आईच्या भाषेत पहिल्या वाफेची.  ती लोभस थोडी ब्राऊन थोडीशी पांढरी खिचडी प्लेटमध्ये वाढली जाते. ती प्लेट सुद्धा टिपिकल साधारण हातात मावेल आणि तळहातापेक्षा थोडीशी मोठी. स्टीलची बरं का! उगाच microwave safe वाली नाही. त्यावर मग ताज खोवलेलं पांढरेशुभ्र नारळाचे खोबरे. ते कधी कधी मला शिसपेन्सिलीला टोक केल्यावर जे टोक यंत्रातून कातरकाम बाहेर येतं तसं दिसतं. म्हणजे दिसताना जरी पांढरेशुभ्र असलं तरी कुठे कुठे खोबऱ्याच्या पाठीच्या काळ्या विटकरी कडा दिसत असतात.
त्यावर जणू छम छम आवाजच करत येते अशी हिरवीगार कोथिंबीर. बारीक चिरलेली कोथिंबीर जेव्हा भुरभुरलेली असते, तेव्हा उगाच बालकवींची हिरवे हिरवे गार गालीचे कवितेची आठवण होते.  मिरची चे एखाद दोन कापलेले तुकडे खरंतर काढून टाकण्यासाठी च असतात पण ते पाहिजेतच कारण दिसले नाहीत तर गोडीळ तर नाही ना अशी शंका नको. साईडला अगदी बरोबर चतकोर काटेकोर कापलेली लिंबाची रसरशीत पिवळी धमक फोड. त्या फोडीत एक अर्धवट बी असलीच पाहिजे नाहीतर मग लिंबू पिळायच्या आधी झटकायची मजा कशी येणार. साईडला  छोटा चमचा स्टीलचाच.

अशी ही "खिचडी" नावाची अप्सरा सर्व बाजूंनी नटली की मग तो वाफा येणारा, जिभेला थोडा चटका बसणारा, किंचीत आंबट झालेला आणि अविस्मरणीय चवीचा पहिला घास तोंडात गेल्यावर जे काही स्वर्गसुख किंवा बहुतेक त्याहीपेक्षा वरचा आनंद मिळतो तो ज्याचा त्यालाच कळतो.

अगदी पहिल्या घासापासून ते शेवटच्या घासापर्यंत मउ लुसलुशीत साबुदाणा चावतांना,  अर्थातच तो कितपत पूर्ण चावला जातो माहित नाही पण जे काही चर्वण होते त्यातून पोटाचा अग्नी कमी आणि जिव्हेची क्षुधा शांत जास्त होते.

तशी ही खिचडी पित्तकारक असते असे म्हणतात. परंतु जेव्हा ही अप्सरा आपल्यापुढे नटून-थटून प्लेटमध्ये येते आणि मग घरच्या मंडळीं पैकी आजी, मावशी,काकू किंवा आपलीच आई असं कोणी म्हणतं "खा रे ...एका डिशनी काही होत नाही"  तेव्हा मात्र जे पित्त खवळते ते फक्त ती खिचडीच शांत करू शकते.

शेवटी ती "छान" साबुदाणा खिचडी मी मग माइक्रोवेव मधे गरम करून खाल्ली. बाहेर हॉल मधे येऊन क्रिकेट मैच बघत बसलो. अचानक मनात आलं...

क्रिकेटच्या वर्ल्ड कपची फायनल मैच लॉर्डस ग्राउंडवर बघण्यात जी मजा आहे ती कितीही लश ग्रीन केलेलं असलं तरी  कोलकत्याच्या इडन गार्डन वर नाही. तसंच काहीसं, सकाळी साडे आठ नऊ वाजता गरम खिचडी खाण्यात जी मजा आहे ती संध्याकाळी सात आठ वाजता खिचडी गरम करून खाण्यात नाही.

---© मिलिंद सहस्रबुद्धे (एकशुन्यशुन्यशुन्यबुध्दे)

Comments

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी

*आपण सारे अर्जुन*

*आपण सारे अर्जुन* © मिलिंद सहस्रबुद्धे                   गुरुवारी रामनवमी झाली होती आणि शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बहुतांश घरात लगबग सुरू होती. नऊच्या रामायणाची नाही तर नऊ वाजता देशाचे पंतप्रधान काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत आणि देशाच्या जनतेशी व्हिडिओकॉल द्वारे संवाद साधणार आहेत त्याची. प्रत्येक जण वाट बघत होता नऊ वाजण्याची आणि एकदाचे नऊ वाजले.  प्रत्येक न्युज चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुरू झाला. नेहमीप्रमाणे मोदींनी त्यांच्या शैलीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर भाष्य तर केलेच. खरंतर ते  बोलत असताना प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता की मोदी घोषणा काय करणार. भारतातल्या सवासौ करोड जनतेला आता मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवरून बोलतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करणार असं नक्की माहिती असते. आमच्या ह्या भाऊ चा धक्का आज काय दे धक्का देणार ह्याकडे सगळ्यांचं जीव मुठीत घेऊन लक्ष होतं. तसं पाहायला गेलं तर आदल्या दिवशी जेव्हा मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितलं होतं की मी उद्या सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. तेव्हापासूनच तर्क-वितर्कांचे घोडे वि