Skip to main content
"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?"

इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही.

उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ शहर, स्वच्छ शहर असे फ्लेक्स लावून आपणच आपले शहर विद्रूप करतोय. याकडे मात्र कुणाचं लक्ष नाही. आम्ही स्वच्छ आहोत असं म्हणून होत नाही तर ते असावं आणि दिसावं लागतं. चेहरा कितीही मेकअप करुन सुंदर केला आकर्षक केला तरी जवळ आल्यावर जर कानातलं मळ दिसत असेल तर कळतं की  हे सौंदर्य म्हणजे मुखवटा आहे.

आपल्या देशात शेकडो वर्षापासून खराटा अन् झाडू हातात घेऊन स्वच्छतेचे धडे दिले जातात. अगदी संत महाराज गाडगेबाबां पासून ते सध्याचे उत्साही पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत व्हाया महात्मा गांधी आणि विनोबा भावे. तरीही आमच्यात सुधारणा होत नाही.  रस्त्यावर मनसोक्त गलिच्छपणे थुंकणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी करणारच असे वावरणारे कित्येक लोकमान्य आपण दररोज बघतोय. बऱ्याच वेळेस राग येतो आणि मग या सगळ्याच गोष्टी अंगवळणी पडतात.. पडल्यात म्हणा ना.

हागणदारी सारखी समस्या देश स्वतंत्र झाल्यापासून 70 वर्षानंतर आत्ता कुठे आपण म्हणू की हद्दपार होतीय.  ती सुद्धा गेल्या दहा-पंधरा वर्षातच खूप फरक पडलाय. शिक्षण आणि त्याबद्दलची जागरूकता आलीय.  सोशल मीडिया आणि हिंदी चित्रपटातून या विषयावर भाष्य केल्यानंतर आपण आत्ता कुठे हळूहळू मुक्त होत आहोत. मी वर म्हटल्याप्रमाणे इंग्रजांचं आपण बरंच काही घेतलं पण परत इंग्रजांचं टॉयलेट आपण काही घेतला नाही.

आम्ही अजुनही रस्त्याच्या कडेला कुठेही उभे राहून शु करण्यात धन्यता मानतो. तो मोठा पराक्रम पुरुषार्थ मानतो. कित्येक जण अमेरिका युरोप सिंगापूर अशा प्रदेश वाऱ्या करतात. परदेशातून भारतात दिल्ली अथवा मुंबईला उतरल्यावर एअरपोर्ट वरून घरी जाताना वाटेत रस्त्यावर थांबून रस्त्याच्याकडेला बिनधास्त लघु शंकेची इच्छा भागवून घेतात. म्हणजे बाहेरच्या देशात गेल्यावर आपण ज्या गोष्टी करायला सर्रास लाजतो किंवा घाबरतो त्या इथं आपण इथं बिंदास करतो आणि त्याची आपल्याला आपल्याच देशात लाज वाटत नाही.

गावाकडचं तर सोडाच पण खरं सांगायचं तर स्वच्छतेचा खरा प्रश्न निमशहरी उपनगर आणि मोठ्या शहरातच आहे. कारण इथला प्रत्येक जण नोकरी-धंदा करीता इथे आलेला. त्यामुळे "मी टॅक्स भरतो" हया टॅगलाईन खाली स्वैर वावरत असतो आणि त्या ठिकाणच्या प्रशासनाला, व्यवस्थापनाला शिव्या देत असतो. कारण शिव्या दिल्या की आपल्याला असं वाटतं की आपण आपल्या जबाबदारीतून मुक्त झालो.  स्वतःच्या घरात जी स्वच्छता आपण ठेवतो त्यातली किमान 50% स्वच्छता जरी प्रत्येकाने रस्त्यावर सार्वजनिक जीवनात ठेवायचा प्रयत्न केला तरी भारत हा अस्वच्छता मुक्त देश , स्वच्छता कडे जाणारा देश म्हणून प्रस्थापित होईल.

भारतात पुढील काही वर्षात पाणी, वीज, रस्ते या वर्षानुवर्ष असलेल्या समस्यांवर निवडणुका लढणं बंद होऊन फक्त कचरा स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन स्वच्छ शहर स्वच्छ विभाग याच्यावर निवडणुका लढल्या जातील. इतकी ही समस्या भीषण होत चालली आहे. काही वर्षांनी पाणी आणि वीज टंचाई ऐवजी स्वच्छता टंचाईमुळे लोक शहर सोडतील अशी परिस्थिती आली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

आम्हाला स्वतःला बदलायचे नाहीये स्वतःला वेगळे सोपे असलेले कष्ट घ्यायचे नाहीयेत स्वतःला प्रार्थमिक आरोग्याची शिस्त लावायची नाहीये जे काय करायचंय ते प्रशासनाने आणि व्यवस्थेने. आम्ही आहोत असेच आहोत असेच राहणार घेऊ वाटले घ्या नाहीतर दुसरे तयारच आहेत मतपेट्यांचं वाडगं घेऊन. हे माहिती असल्यामुळे कदाचित ही दुरावस्था किंवा याविषयीच अनस्था आपल्या समाजात आहे

भारतात हिंदुस्तान लिव्हर आणि आय टी सी सारख्या कंपन्या फक्त अंगाला लावण्याचे विविध साबण आणि हात धुवायचे हँडवॉश यांच्यावर गब्बर झाले आहेत. देशाच्या जाहिरात क्षेत्रातील आर्थिक उलाढालीत साबण या उत्पादनाचं अनन्यसाधारण महत्त्व निर्माण झालेलं आहे.एवढ्या साबणाच्या जाहिराती जगात कुठल्याही देशात नसतील एवढ्या भारतात किंवा भारताच्या जाहिरात क्षेत्रात आहेत. आणि हो आमच्या चित्रपटातील आदर्श अभिनेत्री सौंदर्यवती आणि अभिनेते त्यावर आपले करिअर घडवत आहेत ही बाब आनंदाची का दुःखाची हे आपणच ठरवलं पाहिजे. गम्मत बघा एक छोटं उदाहरण, संतूर साबणाचा २०१९ चा सहामही खप २००० करोड होता, ज्याचा बाजारात हिस्सा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

मुळात आमच्या मनातल्या स्वच्छतेचा, शिस्तीच्या साबणाचा अभाव असल्याने हया अशा बाह्य साधनांचा भडीमारा हा आमच्यावर होत असतो.

भारतात तुम्ही कुठल्याही भागात जा प्रत्येक कोपरा प्रत्येक फुटपाथ मागच्या बाजूला या छोट्या-छोट्या कचराकुंड्या बनलेल्या असतात प्रशासकीय कर्मचारी दिवसातून दोन वेळा तीन वेळा झाडतात तरी त्या तेवढ्याच जोमाने आणि वेगाने भरतात जणू स्पर्धाच आहे की काय. तुम्ही किती स्वच्छ करता बघू आणि आम्ही किती त्याची विल्हेवाट लावतो अशी.
गेल्या काही वर्षात नवीन पिढीतील जागरूकता वाढते आहे पण तेसुद्धा अगदी शुल्लक प्रमाणात. नुसतं सर्व शिक्षण अभियान राबवून उपयोग नाही तर त्या शिक्षणातून शिस्त आणि स्वच्छतेचे धडे गिरवलेली नवीन पिढी निर्माण होणे गरजेचे आहे.

प्लास्टिक निर्मूलन आणि उच्चाटन करण्याच्या बाबतीत मात्र खरोखरच आपण गेल्या काही वर्षात भरीव कामगिरी केली आहे. त्याचं कौतुक करावंच लागेल. तरीही मी म्हणेन की या विषयात जास्त कौतुक सरकारी यंत्रणेचं आणि नाममात्र कौतुक नागरिकांचं. कारण आपल्याकडे नियम कडक केले आणि अंमलात आणले तरच सुधारणा होते हे हया निर्मूलनाने सिद्ध केलं आहे.

स्वच्छता एक धर्म तर स्वच्छता म्हणजे देवभक्ती, देशभक्ती असं आपल्या देशात सर्वसामान्यपणे मानतात.  केरसुणी किंवा झाडूला आपण लक्ष्मीचं रूप देतो त्याचे पूजन करतो. इथं दैनिक लोकसत्ता मध्ये वाचलेलं एक वाक्य तंतोतंत लागू होतं ते असं 'आपल्याकडे एखाद्या गोष्टीला देवत्व प्राप्त झालं की आपण त्याची हिरीरीने वाट कशी लावता येईल ते बघत असतो'. जेव्हापासून स्वच्छता अभियान आले तेव्हापासून किमान पुणे शहरातलले सर्वच कचरा कंटेनर काढून घेण्यात आले. मग काय पर्वणीच, लोक कुठेही कचरा टाकायला लागले.  कारण कचरा टाकण्याची ठराविक जागा आणि त्याचं व्यवस्थापनच नाही त्यामुळे प्रत्येकजण लोकमान्य. मिळेल तो कोपरा कचरापेटी बनली आहे.

सार्वजनिक आरोग्याच्या सर्वेक्षण क्रमवारीत, जगातील 180 देशात शेवटच्या पाच नंबर मध्ये भारत "विजेता" ठरला आहे. हे एवढं माहिती झालं तरी तुम्हाला अंदाज येईल की आपल्या ह्या क्षेत्रात अलिबागच्या समुद्र सपाटीपासून एव्हरेस्टच्या बेस कॅम्प पर्यंत जायचे आहे.

 नुसतेच टॉयलेट बांधले म्हणजे काही होत नाही. कागदावर 'शेर आया शेर' पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र ढेर अशी आपली अवस्था आहे. टॉयलेट बांधले पण त्याला लागणारी पाणी आणि मलनिस्सारण व्यवस्था त्याचं काय. असे बरेच प्रश्न अनुत्तरित आणि सामान्यांना न कळणाऱे आहेत. सामान्यांना फक्त एवढेच दिसतं की मागच्या दोन चार वर्षात एवढांले टॉयलेटस बांधले. पण टॉयलेट बांधले म्हणजे स्वच्छता आली असा अर्थ होत नाही. कारण आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार असं आहे आपल्या देशात. सार्वजनिक स्वच्छता आणि शिस्त आमच्या रक्तातच नाही. तर मग कितीही बाह्य नियोजन, शिक्षण आणि योजना आणल्या तरी ते आचरणात कसे येणार त्याचा तर मुळात अभाव आहे.

फक्त टॉयलेट हीच सार्वजनिक अस्वच्छतेचे समस्या नाही तर ओला सुका कचरा, कचरा वर्गीकरण, कचरा टाकण्याची व्यवस्था, विल्हेवाटीची व्यवस्था आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या विषयातली नागरिकांची जागरूकता अशा बऱ्याच इतर समस्या आहेत की ज्यांनी आमचं सार्वजनिक आरोग्य धोक्यात आहे. तुम्ही पहा शहरातील प्रत्येक रस्त्यावर प्रत्येक रस्त्यावरील शहरात कडेला तुम्हाला मिनी कचराकुंड्या झालेल्या दिसतील. मोबाईल प्रीपेड कार्डची जाहिरात असते ना छोटा पॅक बडा रिचार्ज तसं छोटी कचराकुंडी मोठी आरोग्य समस्या. थेंबे थेंबे तळे साचे.. त्यामुळे या छोट्या-छोट्या कचरा कुंडातून अस्वच्छतेचं भलमोठं तळंच नाही तर समुद्र निर्माण होतोय.

 काही वर्षांपूर्वी कोणत्यातरी साबणाची जाहिरात खूप प्रसिद्ध झाली होती. ती मुलगी हात धुवत असलेल्या त्या छोट्या मुलाला म्हणते "बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" स्वच्छतेचे
ची जागरूकता आणि आपल्या प्रॉडक्टचे इफेक्टिव्ह मार्केटिंग कंपनीने उत्कृष्टरित्या साधले होते. आपल्याकडे तशी एक गावरान म्हण आहे ना की "नाही निर्मळ मन, तर काय करेल साबण".  खरोखर तसंच आहे साबणाची आवश्यकताच भासू नये असे आपले प्रयत्न असायला हवेत.

 मग परत परत ती जाहिरात आठवते आणि त्या बंटीच्या रूपात भारत देश दिसतो. "बंटी तुम्हारा साबुन स्लो है क्या?" हो खरंच भारताचा जागतिक स्तरावर स्वच्छतेच्या बाबतीतला साबुन स्लोच आहे. 70 वर्षांपासून स्वतंत्र होऊन सुद्धा आम्ही अजूनही स्वच्छतेच्या परीसाला स्पर्श करुन आमच्या वेगवान प्रगती करणार्या खणखणीत नाण्याचं सोनं करू शकलेलो नाही.

© मिलिंद सहस्रबुद्धे
०५/०३/२०२०

तळटीप:-
हा विषय आणि या विषयावर लिहिण्यासारखे खूप आहे. एवढं लिहून किंवा अजुन लिहून काय साध्य होणार हे तुम्हाला आणि मला दोघांनाही माहिती आहे.  पण बरेच दिवस मनात अस्वच्छते बद्दलची तळमळ, तिडीक होती ती कागदावर उतरवून माझं मन स्वच्छ करण्याचा प्रयत्न. कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांना याविषयी खूप काही वाटत असेल, हे वाचल्यावर तेवढे थोडं बरं ही वाटेल. तुम्हाला पण या विषयावर लिहावसं वाटेल इतरांना काही सांगावेसे वाटेल. म्हणून ही सुरुवात...like #hashtag challenge

महात्मा गांधीजींच्या १५०व्या जयंतीच्या निमित्ताने वरील लेख आणि आपले विचार, संकल्पना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवुया आणि जनमानसात स्वच्छता आणि शिस्तीची जागरुकता आणूया...

© मिलिंद सहस्रबुद्धे
फोटो सौजन्य.. महाराष्ट्र टाईम्स पुणे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी

*आपण सारे अर्जुन*

*आपण सारे अर्जुन* © मिलिंद सहस्रबुद्धे                   गुरुवारी रामनवमी झाली होती आणि शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बहुतांश घरात लगबग सुरू होती. नऊच्या रामायणाची नाही तर नऊ वाजता देशाचे पंतप्रधान काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत आणि देशाच्या जनतेशी व्हिडिओकॉल द्वारे संवाद साधणार आहेत त्याची. प्रत्येक जण वाट बघत होता नऊ वाजण्याची आणि एकदाचे नऊ वाजले.  प्रत्येक न्युज चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुरू झाला. नेहमीप्रमाणे मोदींनी त्यांच्या शैलीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर भाष्य तर केलेच. खरंतर ते  बोलत असताना प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता की मोदी घोषणा काय करणार. भारतातल्या सवासौ करोड जनतेला आता मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवरून बोलतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करणार असं नक्की माहिती असते. आमच्या ह्या भाऊ चा धक्का आज काय दे धक्का देणार ह्याकडे सगळ्यांचं जीव मुठीत घेऊन लक्ष होतं. तसं पाहायला गेलं तर आदल्या दिवशी जेव्हा मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितलं होतं की मी उद्या सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. तेव्हापासूनच तर्क-वितर्कांचे घोडे वि