Skip to main content

 नेतृत्व की विचारधारा.....



2019 चा निकाल 2014 पेक्षाही सर्वार्थाने मोठा ऐतिहासिक, धक्कादायक आणि आश्चर्यचकित करणारा आहे. 201४ ची परिस्थिती वेगळी होती सलग दहा वर्ष एक पक्ष इतर पक्षांना घेऊन एकसुरी राज्य करत होता. राष्ट्रीय आणि प्रादेशिक दोन्ही पातळीवरील विविध पक्षांना बदल हवा होता. त्या बदलाच्या मानसिकतेचा परमोच्च बिंदू गाठला आणि नरेंद्र मोदी नामक एक नेतृत्व उदयास आले. जागतिक इतिहासात जेव्हा जेव्हा जनमानसात एक देशाच्या सरकार अथवा नेतृत्वाबद्दल एक विरोधाची भावना तीव्र होत जाते तेव्हा कधीतरी एक असा परमोच्च क्षण येतो आणि सरकार अथवा नेतृत्व इतक्या मोठ्या प्रमाणात पराभूत होते की त्याची इतिहासात नोंद होत जाते . त्याच मुळे 2014 हे लोकांनी मतपेटीतून उलथवलेले आणि ज्याचा फायदा एका नेतृत्वाने योग्य पद्धतीने घेतला असे हे सरकार होते.

 भारताच्या स्वातंत्र्यानंतर च्या इतिहासात मधील काही अपवाद वगळता एकाच पक्षाचे एकाच विचारधारेचे सरकार राज्य करीत होते अगदी २०१४  सालापर्यंत. दोन विविध  विचारधारांचे पक्ष राष्ट्रीय पातळीवर एकमेकांशी लढत होते. आपण नेहमीच म्हणतो की विचारधारा ही जिंकून देते लोक विचारधारा  किंवा विचारसरणी ला मत देतात. पण खरंच असं होतं का? झालंय का? जर तसं असतं तर मग महात्मा गांधींनी कधी असं म्हटलं नसतं की स्वातंत्र्यानंतर काँग्रेस बरखास्त करा. लोकांना जर विचारधाराच प्रिय होती विचार धारेवरच लोकमत ठाम होती तर त्यांनी सदैव काँग्रेसलाच मत दिले असते पण तसे झाले नाही मत हे नेहमी नेतृत्वाला दिले जाते.

 देशभक्ती, देशप्रेम, स्वातंत्र्य मिळवून देणे आणि देशाचे स्वातंत्र्य ही प्रथम भावना असलेला काँग्रेस हा पक्ष स्वातंत्र्यपूर्व काळात जन्माला आला. तो आला तेच मुळी देशभक्तीच्या बीजातून. पुढे काँग्रेसचा उदय आणि त्याचा प्रसार हा राष्ट्रीय सेवा दल, युथ काँग्रेस सारख्या विचारधारेतून झाला. या विचारसरणीत गरिबांची खरोखरच सेवा करणे, त्यांची उत्क्रांती अथवा त्यांना सेवा-सुविधा पुरवणे, लोकांची कामे करून देणे हे प्रथम कार्य होते.  गरीब, मजदूर आणि शेतकरी हयांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांच्यासाठी काम करणारा असा हा पक्ष होता. त्यातूनच हा पक्ष खेड्यापाड्यात अगदी माजघरात पोचला.  त्या काळात जरी नेहरूंचे नेतृत्व आंतरराष्ट्रीय स्तरावर जास्त रमणारे असे होते तरी देशाचा विकास त्यांनी विविध नवीन कल्पना सरकारी सामाजिक संस्था निर्माण करून आणि योजना आणून राबवून साधण्याचा प्रयत्न केला. त्या काळात नेतृत्वापेक्षा ही जमिनीवर होणारे कार्य काँग्रेस पक्षाला पुढे घेऊन गेले.

पुढे नेहरूंच्या निधनानंतर सहाजिकच इंदिराजींच्या काळात पक्षाने मात्र कूस बदलली. नेतृत्वापुढे विचारधारेने शरणागती पत्करली. गरिबी हटाव हा फक्त नारा होता त्या नेतृत्वाने दिलेला. पण प्रत्यक्षात भ्रष्टाचार बोकाळलेला समाजकारणातून राजकारणाकडे वाटचाल वेगाने सुरु झाली. कधी बेरजेच्या, वजाबाकीच्या तर कधी लांगूलचालनातून गुणाकाराच्या तर दडपशाहीतून भागाकाराच्या राजकारण्याच्या दिशेने प्रवास सुरू राहिला.
 नेतृत्वाने विचारधारेवर मात केलेली होती. ती प्रचंड बहुमताने सत्ता मिळाली होती. एकाधिकारशाही काय असते याची चुणूक 1977 च्या आणीबाणी ने भारतीय समाजाला बघायला मिळाली. समाज खडबडून जागा झाला.  त्यांनी दुसऱ्या इतर विविध विचारसरणीच्या पारड्यात आपली मते टाकली, पण ती तुटपुंजी असल्याने फार कमी काळ ही विचारधारांची मिसळ गरम राहीली. पुन्हा एकदा तिच्यावर कणखर इंदिराजींच्या नेतृत्वाने मात केली.
 त्याहीपुढे जाऊन इंदिराजींच्या हत्येनंतर ज नवखे नेतृत्व उदयास आले त्याला सुद्धा विचारधारेची साथ लाभली असे नाही तर सहानुभूतीच्या लाटेवर राजीवजी विराजमान झाले. परंतु पुढील तीस वर्षात कोणते एखादे नेतृत्व कणखरपणे उभे राहू न शकल्याने कोणतीच अशी एक विचारधारा बाळसं पकडू शकले नाही. बऱ्याच अंशी विविध विचारधारांची मोट बांधतच गाडा ओढला गेला.

 1980 च्या दशकात उदयास आलेल्या जनसंघाची विचारधारा ही जरी त्या वेळेसच्या काँग्रेसची भिन्न असली तरी मुळातल्या काँग्रेसचे जवळ जाणारी होती कारण दोन्हींचा पाया हा प्रखर देशप्रेम आणि देशभक्ती असाच होता.  अर्थात जनसंघाचे  पितृत्व असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो एका प्रखर हिंदू विचारसरणीची संघटना होती आणि आहे. अर्थातच हे देशप्रेम हिंदूत्व आणि हिंदुस्थान यातच अडकून राहिले. या जनसंघाची स्वतःची अशी काही मुल्ये होती, विचार होते आणि एक शिस्त होती.  त्यामुळे त्यांची वाढ ही इनऑरगॅनिक म्हणजेच अनैसर्गिक न होता ऑरगॅनिक पद्धतीने म्हणजे नैसर्गिक पद्धतीने होत गेली.  जसं मनसे राष्ट्रवादी हे पक्ष अनैसर्गिक रित्या वाढले आणि एकदम संपल्या सुद्धा. तसे जनसंघ अथवा पुढे भाजपचे झाले नाही.
याच जनसंघ आतून पुढे मग भाजपची निर्मिती झाली हा पक्ष हळूहळू वाढत गेला दोन आवरून आता साडेतीनशेवर पोहोचला. जनसंघ मूल्य जपत अटलजींच्या नेतृत्वगुणांच्या आणि प्रथम सबका साथ घेऊन अस्तित्वात आणलेल्या विना काँग्रेस सरकारची स्थापना झाली. तरी हे नेतृत्व बहुमत नसल्याने त्याला इतर विचारधारांची गरज भागवावी लागत होती त्या इतरांच्या गरज भागवण्याचा तारांबळीत स्वतःच्या विचारधारे पासून थोडा का होईना हा पक्ष दूर जात गेला

 २००४ साला इंडिया शायनिंग कॅम्पेन मुळे भाजपला पराभव पत्करावा लागला. कारण तेव्हा इंडिया शायनिंग होते पण भारत डाईंग होता. पुढे दहा वर्षे मनमोहन सिंगसाहेबांच रिमोट सरकार आलं. इथंही नेतृत्व नसल्याने ते सुद्धा स्वतःच्या व इतरांच्या विचारधारांचे टेकू घेऊनच उभे राहिले होते.
Accidental Prime minister  (अपघाती पंतप्रधान) ही उपमा मनमोहनसिंगांनी मिळाली. अर्थात त्यात काही संपूर्ण वावगं होतं असं नाही. विदेशी मुद्द्यावर झालेला राजकीय अपघात.
इंदिराजी नंतर आता २०१४च्या मोदीं पर्यंत जवळपास एखाद-दुसरा अपवाद वगळता तर प्रत्येक पंतप्रधान हा अपघाती पंतप्रधानच होता ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर.

अपघात कधी राजकीय असतील सामाजिक असतील तर वैयक्तिक असतील.

 १९८४ ला इंदिराजींचे निधन झाल्यावर राजीव गांधी पंतप्रधान झाले अर्थात ह्या वैयक्तिक अपघात मुळेच राजीवजींना अचानकपणे वारसदार राजपुत्र असल्याप्रमाणे पंतप्रधान पद मिळाले.

विश्वनाथ प्रताप सिंग मंडल आयोगाच्या मागणीच्या जोरावर अगदी वर्षभर करता का होईना विश्वनाथ जी पंतप्रधान झाले हा पण एक सामाजिक अपघातच होता.
परत एकदा राजकीय अपघात आणि चंद्रशेखर जी सात महिन्याकरता पंतप्रधान म्हणून मिरवले गेले.

अपवादात्मक  नरसिंह राव सरकार हे पूर्ण काळ टिकलेले सरकार आणि मग परत अटलजींचे तेरा दिवसाचे अपघाती सरकार.

 देवेगौडा आणि आई के गुजराल हे तर अगदीच देशाच्या राजकारणातील मोठा राजकीय अपघातचं धादांत उदाहरण आहे.

पुन्हा एकदा वाजपेयी एक वर्ष सात महिने आणि पुन्हा सलग पाच वर्षे.
म्हणजे नरसिंह राव आणि बाजपेयी साहेबांची तिसरी टर्म वगळता, सर्वच सरकारे ही Accidental Prime minister ठरली. हा्याचं मह्त्वाचे कारण विचारधारेला नाही तर नेत्रुत्वालाच नेहमी बहुमत मिळते.

१९८४ पासून च्या या सर्व सरकारांमध्ये एक समान धागा मात्र दिसून येतो की कोणत्याही एका विचारसरणीला पूर्ण बहुमत अथवा एका नेतृत्वाला पूर्ण बहुमत मिळाले नाही तर प्रत्येक वेळेस कोणताही ही सर्व लोकांनी मान्य केलेला अथवा निवडलेला नेता नसल्यामुळे जो त्या त्या वेळेस योग्य वाटला किंवा सापडला असा नेता अथवा सरकार बनत गेले.
१९८४ ते २०१४ म्हणजे तब्बल तीस वर्ष
 कोणत्याही एका विचारसरणीला अथवा एकाद्या नेतृत्वाला पूर्ण बहुमत न मिळता देश सतत राजकीय सामाजिक व वैयक्तिक अपघातातूनच पंतप्रधान निवडत गेला एखाद-दोन अपवाद वगळता.

जेव्हा जेव्हा एखाद्या विचारसरणीत एखादं मोठं नेतृत्व उदयास येते किंवा निर्माण होतं तेव्हाच त्या विचारसरणीचा विजय होऊन ती सत्ता स्थापन करू शकते. फक्त विचारसरणीच्या जोरावर बहुमत मिळत नाही. ती विचारसरणी त्या नेतृत्वाची तेव्हा गुलाम झालेले असते आणि मग नेतृत्व जी दिशा ठरवेल त्याच दिशेला विचारसरणीचे वारे वाहू लागतात
 नेतृत्वाची विचारधारा हीच त्या पक्षाची विचारसरणी ठरू पाहते हे सतत सिद्ध होतंय.

आज त्या जनसंघाची मूल्य, विचार यांना कोणी मत दिलेले नाही तर मत दिले आहे ते एका नेतृत्वाला. नेतृत्व हे कायमच विचारधारे पेक्षा वरचढ असते याचे उत्तम उदाहरण 2019 ची निवडणूक आणि त्याचे निकाल.
म्हणूनच ना कधी कॉंग्रेस बहुमताने जिंकली ना कधी भाजप (जनसंघ).


जिंकले ते फक्त इंदिरा आणि नरेंद्र.



-© मिलिंद सहस्त्रबुद्धे
५ जुन २०१९


Comments

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी

*आपण सारे अर्जुन*

*आपण सारे अर्जुन* © मिलिंद सहस्रबुद्धे                   गुरुवारी रामनवमी झाली होती आणि शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बहुतांश घरात लगबग सुरू होती. नऊच्या रामायणाची नाही तर नऊ वाजता देशाचे पंतप्रधान काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत आणि देशाच्या जनतेशी व्हिडिओकॉल द्वारे संवाद साधणार आहेत त्याची. प्रत्येक जण वाट बघत होता नऊ वाजण्याची आणि एकदाचे नऊ वाजले.  प्रत्येक न्युज चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुरू झाला. नेहमीप्रमाणे मोदींनी त्यांच्या शैलीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर भाष्य तर केलेच. खरंतर ते  बोलत असताना प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता की मोदी घोषणा काय करणार. भारतातल्या सवासौ करोड जनतेला आता मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवरून बोलतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करणार असं नक्की माहिती असते. आमच्या ह्या भाऊ चा धक्का आज काय दे धक्का देणार ह्याकडे सगळ्यांचं जीव मुठीत घेऊन लक्ष होतं. तसं पाहायला गेलं तर आदल्या दिवशी जेव्हा मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितलं होतं की मी उद्या सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. तेव्हापासूनच तर्क-वितर्कांचे घोडे वि