Skip to main content

वेड....."अरे अभिजीत, खाली ये, जरा बघ देशपांडेकाका आलेत. बराच वेळ झाला."

वेड
11/02/2019

"अरे अभिजीत, खाली ये, जरा बघ देशपांडेकाका आलेत. बराच वेळ झाला." "काय ना! या अभिजीतचं वेड काय विचारू नका. सुट्टी असली ना! की हा असाच तासनतास वरच्या खोलीत जाऊन बसलेला असतो." "किती वाचन करावे म्हणते मी.  वेड लागलय वाचनाचं नुसतं. जे नवीन जुनं पुस्तक मिळेल ते तो वाचतो आणि दोन दोन तीन तीन दिवसात संपून टाकतो."
"अहो घारे काकू, असू दे. त्याच्या वाचनाचं आणि एखादा विषय स्पष्ट उलगडून सांगण्याच्या स्टाईल मुळे तर तो कॉलेजमध्ये आम्हा मित्रांमध्ये आणि शिक्षकांमध्ये फेमस आहे"
असे कित्येक अभिजीत सध्या कमी होत आहेत.
"चांगले बोलू शकतात पण त्यात सकसपणा नाही आणि चांगले लिहू शकतात पण त्यात स्निग्धता नाही" अशी अवस्था आहे.

गेल्या दहा बारा वर्षात आणि नव्वदच्या दशकानंतर जन्मलेल्या सर्वच मुला-मुलींच्या पिढीमध्ये वाचन संस्कृती लोप पावते आहे.  प्रसिद्ध लेखकांच्या कादंबऱ्या नाटके कथा संग्रह आत्मचरित्र किंवा प्रवासवर्णनांची छोटी छोटी पुस्तकं वगैरे तर सोडाच पण साधा वर्तमानपत्रसुद्धा वाचत नाही. एक वेळ अशी होती की भेळपुरी च्या राहिलेल्या कागदावरच्या बातम्या पण वाचायची ही वेडी लोकं. आणि सध्या काय 599 रुपये वर्षाला वाल्या व्रुत्तपत्रांमुळे, घरात कदाचित दोन-तीन वर्तमानपत्र येतच असतील पण त्या वर्तमानपत्राची साधी घडी देखील मोडलेली नसते अशी रोजची अवस्था.

व पु काळे पु ल देशपांडे किंवा गुलजार किंवा कुसुमाग्रज यांच्या सारख्यांच्या कथासंग्रहातील कवितासंग्रहातील आठ दहा ओळी सर्वत्र व्हायरल होतात पण त्यांच्या एखाद्या चांगल्या पुस्तकाचा चार किंवा त्याच्यात असलेले एखादी कथा किंवा समीक्षण व्हायरल होत नाही की जेणेकरुन इतरांना पुस्तक घेऊन वाचावासा वाटेल.
 वपु पुलं विंदा विसं असे अनेक थोर लेखक कवी सध्या व्हॉटस्अप आणि फेसबुकवर कागदाच्या चिठ्ठ्या चिटोरे लिहिलेल्या अक्षरांत सापडतात.  त्यांची संपूर्ण एखादी कथा एखादी कविता एखादा नाटकातला अंक किंवा एखादा आत्मचरित्रातला एक भाग असं लेखन जे आहे ते कोणी वाचतच नाही.  हे म्हणजे असं की आईस्क्रीमच्या मिठाईच्या मोठ्या दुकानात जायचं त्या दुकानदाराकडून सर्व प्रकारची मिठाई त्या लाकडी चमच्यावर छोटी-छोटी चव घ्यायची आणि मुळ पदार्थ संपूर्ण न खाता फुशारक्या मारायच्या हो मी खाल्ले अमुक-तमुक आईस्क्रीम किंवा काय होती विरघळणारे मिठाई काय भारी असतं हो वगैरे वगैरे.

नवीन मेसेज, फॉरवर्ड वगैरे पद्धतीने बैठकीच्या वाचनसंस्कृतीला खीळ बसली आहे.  मग कोणी अमकातमका सामाजिक,राजकीय, शैक्षणिक किंवा भावनिक पोस्ट पाठवतो आणि आम्ही ते साहित्य म्हणून समाधान मानतो. मग त्यात जुन्या बालपणीचा त्याच ठरलेल्या आठवणी, कोणतं डाऐट भारी, स्त्रीवर एखादी भावनिक किंवा क्रांतिकारी कविता वगैरे वगैरे. सर्व चांगलेच आहे पण शेवटी ते वाचून व्हाट्सएपच्या "clear chat" सारखं काही दिवसांनी निघून जातं. आत पर्यंत पोहोचत नाही किंवा परत परत विचार करायला लावत नाही.

 बाजीराव रोडवरील "अक्षरधारा" किंवा  फिरती ग्रंथालय, विविध नगर वाचनालय यांसारखे अनेक जण आपापल्या परीने वाचन संस्कृती टिकवण्याचा जोपासण्याचा आणि पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायेत.  त्यात ते काही प्रमाणात यशस्वी सुद्धा होतायत.
 तरीही आज घराघरात स्वतः मम्मी-पप्पा मोबाईल टॅब यांच्यावर वरवरच्या वाचन संस्कृतीचे भाग बनत चालले आहेत त्यामुळे पूर्ण पुस्तक वाचण्याची संस्कृती पुढे नेणं अवघड बनत चाललंय. अहो वेळ कुठे असतो, आम्ही फार बिझी आहोत यासारख्या कोरड्या सबबी पुढे केल्या जातात.

पुण्या-मुंबई सारख्या आणि इतर निमशहरी भागात गल्लोगल्ली अभ्यासिका भरपूर झाल्या आहेत, पण ग्रंथालय अर्थातच "लायब्ररी" बोटांवर मोजण्याइतक्याच राहिल्या आहेत कदाचित हेच द्योतक आहे "विद्यार्थी परीक्षार्थी झाल्याचं."

 सावरकर, नेहरू-गांधी, आंबेडकर, रतन टाटा, अब्दुल कलाम अशी कित्येक थोरामोठ्यांची चरित्रे किंवा शिवाजी महाराजांचे शिवचरित्र, पेशवाईचा इतिहास वगैरे किती वाचली जातात माहित नाही. व्हॉट्सॲप आणि फेसबुक वर कोणीतरी काहीतरी संदर्भहीन माहिती छापतो आणि सर्वसाधारण माणूस तीच माहिती खरी खोटी मानतो. आणि त्या व्यक्तीच्या बद्दलचे स्वतःची मतं बनवतो. जे काही प्रमाणात नक्कीच घातक आहे.
 पुढच्या पिढीला इतिहास व्हाट्सअप फेसबुक मधूनच कळतोय. हि परिस्थिती नक्कीच विचार करायला लावणारी आहे. खरा इतिहास वाचायला आणि समजून घ्यायला कोणाला वेळच नाही.

 पूर्वी घरांमध्ये एखाद्या रविवारी खास इंग्रजी पेपर आणण्याची सवय होती. इंग्रजी सुधारावे, इंग्रजी शब्दकोश सुधारावा हा हेतू. त्यातून वाचन घडत होते.  वाचतांना आपोआप तीनही इंद्रिये सहभागी होत होती. तोंड, डोळे आणि कान, त्यामुळे आपोआपच एकदा वाचलेली माहिती किंवा गोष्ट कायमस्वरूपी मेंदूत साठवून ठेवली जात होती आणि त्याचा वैयक्तिक जीवनात त्याचा उपयोग होत होता.
 आता काय त्या गुगलच्या बाईनं आणि लाडक्या अलेक्सानं डिक्शनरी, अटलास, माहितीकोष वगैरे कालबाह्य करून टाकली आहेत.
 ASTONISH हा शब्द त्याचा अर्थ समजण्यासाठी कपाटातील डिक्शनरी काढा, A..S...T..अशा पद्धतीने तो शब्द डिक्शनरी त्या त्या ठरावीक पानावर शोधा आणि मग त्याचा अर्थ, समानार्थी विरुद्धार्थी समजून घ्या. हे सर्व करताना एक उत्सुकता होती आणि एवढे सगळं शोधल्यावर तो शब्द नक्की लक्षात राहत होता. कारण परत डिक्शनरी बघण्याचा द्राविडी प्रणाम कोण करेल.
पण आता काय आहे डायरेक्ट गुगल कभी भी कही भी।

संपूर्ण कथासंग्रह, दिवाळी अंक, कादंबरी गेलाबाजार वर्तमानपत्र ह्या वाचनात एक बैठक होती. ज्यांनी बुद्धी मन आणि शरीर यांना एकता, स्थिरता मिळत होती. एकाग्रता आणि संयम या गुणवैशिष्ट्यांची आपोआपच निर्मिती व्हायची. मुळात वाचन बैठकच हरवल्यामुळे हल्लीच्या पिढीतील एकाग्रता आणि संयम यांचा पूर्ण अभाव निर्माण झाला आहे.  मग आपसूकच विद्यार्थी हा परीक्षार्थी बनत चालला आहे.

"पुस्तकी वाचन आणि मोबाईल बघत वाचून लागलेला चष्मा यात जमीन अस्मानाचा फरक आहे. मोबाईल मुळे लागलेला चष्मा हे वैयक्तिक व्यंग निर्माण करतो, तर पुस्तक वाचनातून लागलेला चष्मा हा समाजातील व्यंग बघायला शिकवतो."

 वाचन संस्कृतीची जोपासना घराघरात करणे ही सध्याच्या मधल्या म्हणजेच आमच्या पिढीची गरज आहे. आपल्या आधीच्या पिढीने जो वाचनाचा वारसा, संस्कृती दिली आहे ते आपण आपल्या कृतीतून पुढच्या पिढीला देण्याचे कर्तव्य आहे. विविध खाद्यजत्रा, शॉपिंग फेस्टिवल, विकेंड ट्रीप अथवा वन डे मॉल विजीट याचबरोबर मुलांना एखाद्या पुस्तक प्रदर्शनाला किंवा ग्रंथालयाला किंवा पुस्तकांच्या दुकानात महिन्या-दोन महिन्यातून एकदा घेऊन जाऊ या. त्यानिमित्ताने त्यांनाही कळेल की पुस्तकं, ग्रंथ, कादंबरी, कथासंग्रह दिवाळी अंक, मासिकं असही काहीतरी असतं जे खोलवर ज्ञान देत.
"शब्द आणि ज्ञानकोश म्हणजे फक्त गुगल किंवा विकी नव्हे तर त्यांचे मायबाप कोण आहेत ते पण दाखवा त्यांना "


ता.क.
मी देखील या विषयात शिकाऊ उमेदवारच किंवा पालक आहे आणि हा टिपिकल पुणेरी सल्ला आहे (जो फक्त दुसर्यांनाच दिला जातो) असे मानू नये.

धन्यवाद
---©मिलिंद सहस्त्रबुद्धे
९९22१८26३२

Comments

  1. मिल्या, फारच सुंदर. ओघवती शैली. लाजवाब 👌👌👌

    ReplyDelete
  2. मिल्या फार सुंदर मला ही वाचनाचे वेड आहे सगळे वाचूनच कळते हे नक्की 👍

    ReplyDelete
  3. मिलिंद फारच सुंदर झालाय अणि सत्य परिस्थिती लेखाच्या आधीच पुस्तके भरलेल्या कपाटाचा फोटो पाहून पण बरे वाटले

    ReplyDelete
  4. छान उपक्रम. सर्व लेख नक्की वाचणार. All the best.

    ReplyDelete
  5. It's reality of today's world..parents give kids phones to play instead of books, sports.

    ReplyDelete
  6. मित्रा अभिनंदन खूप छान लिहले आहेस .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी

*आपण सारे अर्जुन*

*आपण सारे अर्जुन* © मिलिंद सहस्रबुद्धे                   गुरुवारी रामनवमी झाली होती आणि शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बहुतांश घरात लगबग सुरू होती. नऊच्या रामायणाची नाही तर नऊ वाजता देशाचे पंतप्रधान काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत आणि देशाच्या जनतेशी व्हिडिओकॉल द्वारे संवाद साधणार आहेत त्याची. प्रत्येक जण वाट बघत होता नऊ वाजण्याची आणि एकदाचे नऊ वाजले.  प्रत्येक न्युज चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुरू झाला. नेहमीप्रमाणे मोदींनी त्यांच्या शैलीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर भाष्य तर केलेच. खरंतर ते  बोलत असताना प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता की मोदी घोषणा काय करणार. भारतातल्या सवासौ करोड जनतेला आता मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवरून बोलतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करणार असं नक्की माहिती असते. आमच्या ह्या भाऊ चा धक्का आज काय दे धक्का देणार ह्याकडे सगळ्यांचं जीव मुठीत घेऊन लक्ष होतं. तसं पाहायला गेलं तर आदल्या दिवशी जेव्हा मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितलं होतं की मी उद्या सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. तेव्हापासूनच तर्क-वितर्कांचे घोडे वि