Skip to main content

खूब भालो दादा.......त्याची मुलगी मागच्या महिन्यात त्याला म्हणाली "बाबा, तु लॉर्डस वर तेव्हा जर्सी(टी शर्ट) काढून

त्याची मुलगी मागच्या महिन्यात त्याला म्हणाली "बाबा, तु लॉर्डस वर तेव्हा जर्सी(टी शर्ट) काढून फिरवलास ते मला काही आवडलं नाही", "इट्स नॉट इथिकल" वगैरे वगैरे. ह्या नवीन पिढीला काय कळणार त्या जर्सी काढून फिरवण्या मागची भावना. ती दिडशे वर्षे हेटाळलेली आणि तुंबलेली उपेक्षा. इंग्रजांना त्यांच्याच जमीनीवर हरवण्याचा आनंद आणि हो माजपण.
तो जिद्दीने ओढून आणलेला विजय, ती यशाची भावना.
बस्स आम्ही त्यादिवशी तुझे बेहद्द फैन झालो. जिंकलस भावा, तोडलस मित्रा अश्या शब्द प्रयोगांना चपखल बसेल अशी ती तुझी लॉर्डस वर ची प्रतिक्रिया.
अझरउद्दिन नंतर भारतीय क्रिकेट ला एक सातत्याने यश देणारा कैप्टन गवसतच नव्हता. बीसीसीआयचे ट्रायल एंड एरर पध्दत चालूच होती आणि एक दिवस तुझ्यात तो सूर गवसला. अर्थातच हा सूर 'निरागस' नक्कीच नव्हता तर तो 'खर्ज्यातला सा' होता. भारतीय क्रिकेट मधल्या त्या सुवर्ण काळातला तु एक हुकुमाचा एक्का होतास. तुझ्यातली नेतृत्व कसब हि खरंच काही औरच होती. रसगुल्ला सारखा थिबथिबीत गोडीळ नसून चमचमीत चटपटी बंगाली मछली होतास तू.
तुझ्या बाबतीत एक किस्सा नेहमी चर्चेला गेला तो म्हणजे, तू एक्सट्रा मधे असताना मैदानावर र्डींक्स पाणी नेण्यास नकार दिला होतास म्हणे. स्वाभाविकच आहे कोलकत्ता चा प्रिंस तु, तुझ्या बुटाची लेस बांधायला सुध्दा लहानपणापासून तुझ्या कडे माणसं असतील तर तू का बरं पाणक्या होशील.
करीअरच्या सुरवातीला ४-५ स्थानावर बैटींग ला येणे आणि मग एकदम "द सचिन" बरोबर ओपनिंग ला सुरवात केलीस. त्यावेळी तुम्ही दोघं जेव्हा बैटींग ला मैदानात उतरायचात तेव्हा सचिन मैदानाला नमस्कार करणार आणि तू तुझ्या स्टाईल ने डोळे मोठे करत मिचकावत मागे सुर्याकडे पहाणार हे ठरलेलच समीकरण. आमची उत्सुकता ओपनिंग कोण करणार ह्या कडे, कारण तुला तसे बाऊंन्सर बॉल नकोसे असायचे.
तुमची ती "लेफ्टी-राईटीची' जोडी म्हणजे "सुवासिनीच्या कपाळावरचं हळदी-कुंकू" च जणू. मग तुमच्या धुवाधार ओपनिंग पार्टनरशिपने आपली इनिंग "सौभाग्यवती" व्हायची.
इंप्रोव्हाजनचा तु बादशाह होतास. पहिल्या बारा पंधरा ओव्हर नंतर फिल्डर मैदानात पांगले की स्पीनर्स ला क्रीजच्या चार फुट पुढे येउन लॉंग ऑन लॉंग ऑफ ला मारलेले चौके छकडे अजूनही डोळ्यासमोर आहेत.
जेफ्री बॉयकॉटचा तु लाडका, त्यानेच तुझं प्रिंस ऑफ कोलकाता नाव ठेवून दुसरं बारसं केलं.
सचिन, सौरव, लक्ष्मण आणि द्रविड. अशोक स्तंभाप्रमाणे तुम्ही भारतीय क्रिकेटचे चार सिंह होतात त्या सुवर्णकाळात. चार जणांची चार दिशेला तोंडे जशी.. कारण प्रत्येकाची एक वेगळी शैली आणि प्रत्येकाचं वेगळं प्रभुत्व.
तुझं एग्रेशन, इंप्रोव्हाजेशन आणि नेतृत्व गुण इतरांपेक्षा "उजवे" होते जरी तु "डावा" असलास तरीही.
बाबू श्रीनाथ आणि मंगळ्या* प्रसाद सारख्या सो कॉल्ड फास्ट बौलर घेऊन मैचेस काढून देणं म्हणजे खायची गोष्ट नाही. (* मंगळ्या- कारण तो चौकोनी चेहऱ्याचा आणि उगाच परग्रहावरुन आल्या सारखा दिसायचा)
खरं एक वेगळंच नेतृत्व होतं तुझ्यात. त्या नेतृत्वाखाली सचिन पासून युवी पर्यंत आणि श्रीनाथ पासून ईरफान पर्यंत खेळाडू बहरले. कपिलदेव नंतर लाभलेलं हे दुसरं कणखर नेतृत्व.
खरंच, नावाप्रमाणे दादा होतास तू वागायला बोलायला आणि जणू नात्यानेपण वीरुचा, युवीचा, कैफचा, नेहराचा दादा. ह्या सगळ्यांना बोट धरुन क्रिकेट विश्वात प्रसिद्ध केलंस.
फील्डींग हे डिपार्टमेंट आपलं नाही हे नक्की उमजल्यामुळे तिथं उगाच ओढून ताणून प्रयत्न नाही केलेस कधी. प्रिंस ना बाबा तू. म्हणे ती नगमा सारखी सौंदर्यवती तुझ्या प्रेमात पडली पण ह्या *फील्डींग*ला काही पटवू शकला नाहीस.
तसा तू सध्याच्या विराट नंतर अथवा आधीचा मोस्ट कॉट्रोव्हरशल कैप्टन राहिला आहेस मैदानावर आणि मैदानाबाहेरपण. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना त्याच्याच भ, भा, भे च्या भाषेत उत्तर देण्याची धमक दाखवणारा एकमेव कैप्टन फक्त तूच.
तु येईस पर्यंत भारतीय क्रिकेटला फक्त अरबी समुद्रातच मोती असतात असे वाटायचे. पण तुझ्या येण्याने बंगालच्या उपसागरात फक्त मच्छि नाय तर मौल्यवान मोती देखील मिळतात हे समजले.
आहेसच तू अस्सल शुभ्र मोती भारतीय क्रिकेटच्या सुवर्ण अलंकारांमधला.
©मिलिंद सहस्त्रबुद्धे
तळ टीप--
हा लेख "ज्याने मला क्रिकेट बघायला वाचायला आणि कॉमेंट्री मधून ऐकायला शिकवले त्या मित्र अर्चिस पाटणकरला" समर्पित.

Comments

Popular posts from this blog

१९९२ चे अमिताभ बच्चन

 १९९२ चे अमिताभ बच्चन  पुण्यातील बाजीराव रोडवरील महत्त्वाची खूण म्हणजे आमची नूमवि मुलांची शाळा होय. रस्त्यावरील शाळेच्या कमानीतून आत गेल्यावर लागतं ते एक भलं मोठं इथून-तिथून पसरलेले आडवं प्रवेशद्वार. साधारण पाच-सहा फूट उंचीचं हे गेट कायम लक्षात राहिलं. मधल्या सुट्टीत शाळेतून पळून जाताना ह्याच्यावरुनच उडी मारावी लागायची. मोठ्या सुट्टीत मुख्य प्रवेशद्वार बंद असायचं आणि आम्ही उजव्या किंवा डाव्या बाजूने असलेल्या छोट्या दरवाजातून ये-जा करत असू. शाळेच्या बाहेर जाण्याची मुख्य आकर्षण म्हणजे चिंच आणि पेरूची गाडी, लाल पांढऱ्या गोळ्या विकणारा तो लेंगा-टोपीवाला म्हातार बाबा. ५० पैशात मिळणारी पावभाजी आणि २५ पैशात मिळणारी भेळ. आहाहा! त्या सगळ्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे.  प्रवेशद्वाराच्या मधोमध उभा राहिलं आणि समोर पाहिलं की शाळा म्हणजे अक्षरशः भव्य राजवाडा वाटतो. दोन्ही बाजूंनी काळ्या दगडात बांधलेली तीन मजली कौलारू भक्कम इमारत. ह्या सलग दोन्ही बाजूच्या इमारती जिथे एकत्र होतात ते मोठं प्रशस्त सभागृह. ह्याच सभागृहात दरवर्षी स्नेहसंमेलनातील गाजणारे कार्यक्रम म्हणजे, परचुरे सरां...

"साय"कल

  "साय"कल "तुम्ही कधी प्रेमात पडलात का?" "तुम्ही कधी सायकलवरुन पडलात का? ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं ठामपणे "हो" अशी देताना प्रत्येक जणांच्या डोळ्यात दिसणारी चमक एक सारखीच असते. सायकल वरून पडणे ही एक अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट असते. "सायकलवरून पडल्यावरच सायकल येते" हा सुविचार "शास्त्र असतं ते" सारखा आहे. सायकल शिकणे आणि शिकवणे ह्या दोन विरुद्ध टोकाच्या कला आहेत. जेव्हा आपण सायकल शिकत असतो, तेव्हा समोर आलेला प्रत्येक जण, प्रत्येक गोष्ट आपल्याला मोठ्या रा‌क्षसी संकटासारखी भासते. खरंतर पुढील आयुष्यात त्याहूनही अनेक समस्या, विघ्ने येतात. पण शिकतांना साधं छोटं कुत्रं असेल किंवा मोठी गाडी, समोर आल्यावर भासणारी ती भीती म्हणजे 'या सम हीच' अशी असते. मात्र हेच आपण सायकल शिकवत असतो तेव्हा "अरे किंवा अगं का थांबलीस, उगाच घाबरतेस, साधी स्कूटर तर होती!" अश्या समोरच्याला किरकोळीत काढणार्या वाक्यांची पेरणी चालू असते. आपण स्वतः शिकताना कधीच Hopping ने सुरुवात करत नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे पहिली सायकल सुरुवात ही बिन द...

दादा परत या..

  दादा परत या.. "मी कोणाच्या बापालाही घाबरत नाही" असं तुमच्या कडक आवाजात ऐकताना पुन्हा पुन्हा तुमची उणीव भासते. तुमच्याकडून चुकून बोली भाषेतील शब्दांची उठाठेव कधीतरी झालीही असेल. परंतु संस्कृतीच्या मर्यादा मग त्या राजकीय असतील अथवा सामाजिक तुम्ही कधीही ओलांडल्या नाहीत. कोणा एखाद्यावर उगाच खालच्या भाषेत टीकाटिप्पणी केली नाहीत. तर कधी सत्तेच्या गुर्मीत कोणाची निंदा नालस्ती केल्याचं आठवत नाही. तुमचा बाज आणि दरारा वेगळाच होता आणि आहे. प्रशासनावरची पकड म्हणजे जणू बापाने रस्ता ओलांडताना मुलाचा धरलेला घट्ट हात. धरलेल्या त्या हातात काळजी ही असतेच पण तेवढाच धाक असतो. तशी तुमची प्रशासनावरची पकड आहे. आमच्या पुण्याच्या पालकमंत्री पदी असताना तुमचा आठवड्याला किंवा महिनाभरातील एखादा दौरा ठरलेलाच. हा दौरा म्हणजे साध्या शिपायापासून ते मुख्य आयुक्त पर्यंत एक भीती असायची. महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यापासून ते अगदी रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलीसापर्यंत "दादा आज पुण्यात येणार" हे आधी दोन दिवसापासूनच चर्चेत असायचे. तुम्ही ज्या दिवशी येणार त्या दिवशी सकाळी सात ते रात्री दहापर...