Skip to main content

"चिमटा" (काल्पनिक विडंबन)....काल रात्री पाटबंधारे खात्याची फाइल वाचता वाचता कधी झोप लागली

काल रात्री पाटबंधारे खात्याची फाइल वाचता वाचता कधी झोप लागली कळालेच नाही. पुढच्या आठवड्यात अधिवेशनात सभागृहात त्या विषयावर चर्चा आहे. त्यामुळे गेला आठवडा पासून त्या ५००-६०० फाइलींचा स्टडी करतोय.
अचानक जाग आली तेव्हा चांगलं उजाडलं होतं, फ्रेश होउन बाहेर आलो, बघतो तर सौ. गाण्याच्या रेकॉर्डिंग ला आणि मुलगी शाळेला गेलेली. म्हणजे नक्कीच खूप उशीर झालेला उठायला. नेहमीप्रमाणे आंघोळ पुजा आटपली आणि ब्रेकफास्ट टेबलावर बसलो. आज आवडीचे "तर्री पोहा" होते नाष्ट्याला. खात असतानाच प्रवीण (आमचा पी ए) आला, दिवसभराचे शेड्युल अपडेट करायला.
"साहेब, आज ह्या दोन महामंडळाचे कार्यक्रम आहेत, मग ही तीन ठिकाणी उद्घाटने, पक्ष कार्यकर्ते बरोबर बैठक आणि संध्याकाळी पाटील साहेबांकडे पुजेच्या तीर्थ प्रसादाला जायचे आहे."
आम्ही अक्षरशः आ वासून बघतच राहिलो त्याच्याकडे, तोंडात पोह्यांचा घास तसाच. प्रवीण घाबरून म्हणाला"साहेब, काय झालं, काही होतयं का?"
"अरे, काय झालं, काहीच झालं नाही का? आज एवढेच बाकी काही नाही? कोणता मोर्चा नाही? आंदोलकांबरोबर चर्चा नाही; दूध भाजीपाला वगैरे रस्त्यावर ओतले नाही: रास्ता रोको नाही; कुठल्या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप नाही? काहीच नाही?" " बघ जरा नीट एखादी दुर्घटना तरी असेल, आम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल" त्याला पण थोडे हसू आलं, "खरंच काही च नाही साहेब"... मात्र मले काइ चैन पडेना.
मग काय कधी नव्हे ते आमच्या डाएटिशिन मैडमचे नियम धाब्यावर बसवून आम्ही चांगले दोन प्लेट "तर्री पोहा" खाल्ले. वर परत "आलू बोंडा" बनवायला सांगून ते खाल्ले. काय जीवात जीव आलाय म्हणून सांगू. अहो मनसोक्त खाण्याची मजा काही औरच असते ना.
असो, चैनल सर्फिंग केले, "उघडा डोळे नीट बघून" हेडलाइन पाहिल्या, म्हटले कुणाले चुटकीसरशी मुख्यमंत्री होउन पटापट सह्या करायचे आहेत का बघावं पण काहीच नाही आणि हो कैलेंडर पाहिले तर एक एप्रिल पण नव्हता.
एवढ्यात आमचे लाडके "नाथ" संप्रदायाचे भक्त खानदेशी 'गिरीश"भाऊ आले. " साहेब, चला ताडोबा ला जाउ. वाटेत संत्राबर्फी खाऊ. सकाळी चार्टर्ड नी जाऊ, दुपारची जंगल सफारी करू आणि रात्री परत. नवीन बछडे झालेत वाघीणीला फोटोग्राफीला मजा येईल". गिरीश ला एक वाईल्ड लाइफ, शिकार असली खुप आवड. आमच्याच वयाचा आहे पण फीट आणि फाइन, हेवा वाटतो. डैशिंग आहे गडी. कधी कधी वाटतं त्यालाच देउन टाकावं ग्रुहखातं, पण मग विचार येतो, नको हा कधी कोणाची अचानक शिकार करेल सांगता येत नाही.
त्याले म्हटलं " अरे बाबा नको, ताडोबा, व्याघ्र दर्शन आणि फोटो हि "भवना" वरच्या "युवराजांची" मक्तेदारी. परत आम्ही तिथेही अव्वल ठरलो तर खरे खुरे नाही पण "कागदी वाघ" आमाले खाउन टाकतील."
श्या काहीच न्युज नाही. त्याला म्हटलं लाव रे जरा शिवाजी पार्कच्या "क्रुष्णाला" फोन, म्हणाव वाजव तुझं नेहमीच सुमधुर मराठी गाणं बासरी वर, तेवढाच जरा पुढील दोन दिवस मिडिया वर टाइमपास. (ओह..सॉरी बासरी म्हटलं का मी, मले पिपाणी म्हणायचे होतं)
वर्तमानपत्रात पण काही नाही ना. मात्र योग, योगा आणि योगी झळकत होते मथळ्याखाली. मनात खट्टू झालं "मोटा भाईंना" कर्तृत्व दाखवायला आज काहीच नाही. आम्हा १५-१६ राज्यांच्या नेतृत्व करणार्यामधे कायम स्पर्धा चालू असते कोण कीती जास्त संघर्ष करतोय, टीकतोय आणि वर येतोय. कॉर्पोरेट कल्चर यु नो.
आमच्याकडे आता "संघर्षातून" वर येणार्याला फार महत्त्व प्राप्त झालंय, पुर्वी सारखं "संघटनेतून" वर येणार्याला नव्हे. जेवढे रोज जास्त संघर्ष तेवढे वरच्या दरबारी वजन वाढते.
आज "सामना"वीरांनी सुध्दा आमच्या स्टैंडकडे चौकार षटकार न मारता, डायरेक्ट "बारा" नंबरच्या स्टैंड वर फटकेबाजी करत शतक ठोकलेले वाचून उर भरून आला. वाटलं चेंबर मधे जाऊन जादू कि "झप्पी" द्यावी. सध्या झप्पी ची फैशन आहे म्हणे.
मग कधी नव्हे ते"कुबेर"धन वाचले, हुशार आहे माणूस.
विचार आला जाणत्या राजांनी आमच्या वर काही स्तुतीसुमनं उधळली असतील पण कसले काय काही नाही. त्यांचं एक बरंय, ते सतत टोपीची आदलाबदली करत वातावरण तापवत असतात. पण आम्ही बी "विदर्भाचे" आहो ना उच्च तापमानात काम करण्याची सवय आहे आमाले.
आम्ही मात्र एकच टोपी घालतो आणि ती सुध्दा फक्त विजयादशमीलाच बरे.
खरं सांगू तुमाले , आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाची ५६ इंची छातीची चर्चा... इथं विविध लोकांना आश्वासनं देउन, ती सगळी पोटात ठेवून, आमच्या पोटाचा घेर ५६ इंच व्हायची वेळ आलीय.
अचानक संध्याकाळ झाली, कशी? काय माहीत!... पाटील साहेबांकडे तीर्थ प्रसादाला जायचे आठवले. आमचे परम मित्र "साईभक्त पाटील" साहेब, सध्या विरोधात बसायला लागल्यापासून त्यांची कवी प्रतिभा दिवसागणिक फुलत चालली आहे. आम्ही पण मग कधीतरी र ला र आणि ट ला ट जुळवून ठोकून देतो एखादी कविता. तसे "रामदसां"चे मनाचे श्लोक ऐकतो ना सभाग्रुहात.
बरं तिकडे पुजेला जायला तयार झालो इतक्यात सौ आणि मुलगी घरी आल्या. लगेचच मुलीने हट्टच धरला, "बाबा , राणीच्या बागेत पेंग्विन बघायला जाउ ना" ऐकायला च तयार नाही. विचार केला तीचा बालहट्ट पुरवावाच. पेंग्विन आणण्याचा जर ते पुरवत असतील तर आम्ही बघायचा का नाही पुरवायचा!
मग विथ फैमिली राणीच्या बागेत गेलो, आणि विविध प्राणी पक्षी बघून, मले मनात मजेशीर कंपेरीझन चालू झाली...... तेवढ्यात पायाले काहीतरी चावले आणि आम्ही जोरात "नमो नमो शहाय..!" ओरडतच जागे झालो.
सकाळी सकाळी आमच्या सौ. नी पायाले जोरात "चिमटा" काढला होता, तेव्हा कुठे खरी जाग आली. सौ म्हणल्या " हुं उठा लवकर, उशीर झालाय, खाली दादा आणि गिरीश भाऊ वाट पाहतायत कधीची. आज तुमची विविध समन्वयकां बरोबर मिटींग आहे ना !..."
हुश्श, म्हणजे ते आधीचे सगळे स्वप्न होते तर...मले वाटले "एक उनाड दिवस" आपले नशिबी आला की काय ?...
----मिलिंद सहस्रबुद्धे

Comments

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी

*आपण सारे अर्जुन*

*आपण सारे अर्जुन* © मिलिंद सहस्रबुद्धे                   गुरुवारी रामनवमी झाली होती आणि शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बहुतांश घरात लगबग सुरू होती. नऊच्या रामायणाची नाही तर नऊ वाजता देशाचे पंतप्रधान काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत आणि देशाच्या जनतेशी व्हिडिओकॉल द्वारे संवाद साधणार आहेत त्याची. प्रत्येक जण वाट बघत होता नऊ वाजण्याची आणि एकदाचे नऊ वाजले.  प्रत्येक न्युज चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुरू झाला. नेहमीप्रमाणे मोदींनी त्यांच्या शैलीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर भाष्य तर केलेच. खरंतर ते  बोलत असताना प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता की मोदी घोषणा काय करणार. भारतातल्या सवासौ करोड जनतेला आता मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवरून बोलतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करणार असं नक्की माहिती असते. आमच्या ह्या भाऊ चा धक्का आज काय दे धक्का देणार ह्याकडे सगळ्यांचं जीव मुठीत घेऊन लक्ष होतं. तसं पाहायला गेलं तर आदल्या दिवशी जेव्हा मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितलं होतं की मी उद्या सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. तेव्हापासूनच तर्क-वितर्कांचे घोडे वि