Skip to main content

आणि सुबोध भावे......"पारू ग पारू वेसावची पारू" गाण्यावर आमच्या सातवीच्या गॅदरिंग मध्ये डान्स चालू

"पारू ग पारू वेसावची पारू" गाण्यावर आमच्या सातवीच्या गॅदरिंग मध्ये डान्स चालू होता. मी जोरात ओरडलो 'जोश्या ही पारू कोण आहे रे स्टेजवर? च्यायला काय दिसतेय यार! शेजारच्या मुलींच्या हुजूरपागा शाळेतून कोणाला बोलावलयं का खास या डान्स साठी.?"
"अरे बुध्द् या नाही रे...तो आपल्या वरच्या वर्गातला भावे आहे."
सुबोधचा कदाचित रंगमंचावरचा हा तो पहिलाच परफॉर्मन्स असेल. तो त्या पारूच्या वेशात इतका सुंदर दिसत होता की आता खात्री पटते की बालगंधर्व त्याच्याशिवाय दुसरं कोणीच करू शकलं नसतं. अगदी आपले बनवाबनवी वाले महागुरु सुद्धा नाही.
पुण्याच्या पेठी वातावरणात आणि एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला आमचा नूमविय सुबोध, आज मराठी रंग-चित्रसृष्टी वर एक हाती राज्य करतोय. आमचा हा आनंद फक्त अस्सल
पुणेरी नुमवियंनाच कळू शकतो.
तेव्हा नाही पण आता सुबोधला जवळून ओळखणारे पुण्यात अचानकच "खूप" झालेत. एक काळ असा होता की तो भरतच्या बाहेर (भरत नाट्यगृह, पुण्यातील लोकांना भरत म्हंटलं की रामायण नाही आणि मस्तानी म्हंटलं तर बाजीराव नाही...तर सदाशिव पेठ हे कळते. ) टपरीवर त्याचं ते टिपिकल जीन्स जॅकेट घातलेला, पायात कोल्हापुरी चपला आणि टाईमपास करत उभा असायचा;पुरुषोत्तम, फिरोदिया आणि इतर एकांकिका स्पर्धांसाठी.
तो सुबोध आठवला की वाटतं जिद्द, परिश्रम आणि खंडोबा वरची अढळ श्रद्धा त्याला कुठच्या कुठे घेऊन गेली. घरच्या खंडोबाच्या नवरात्रात अजूनही हा दरवर्षी सहा दिवस पूर्णवेळ एखादा सामान्य भक्ता प्रमाणे कार्यरत असतो. अगदी सामानाची पोती उचलण्यापासून ते आलेल्या भक्तांना स्वतः जातीने पंगत वाढण्यापर्यंत. कोणतेही स्टारडम आणि हाय सोसायटीचे हिल्स बूट न घालता हा जमिनीवर पाऊल ठेवून चालण्याचा भावेरुपी संस्कार त्यांनी अजून जपला आहे. सुबोध अजूनही गणपती मध्ये बायको मुलांबरोबर रुमाल बांधून साधेपणाने स्कूटरवर गणपती बघायला जातो आणि इन्स्टॉवर त्याचा फोटो अपलोड करतो हे पाहून मला नेहमी आश्चर्य वाटतं.
आपल्याकडे स्ट्रगल या शब्दाला गरिबीतून वर आलेला, चाळीत राहायलाय, दुकानात काम करत होता, एनएसडीमध्ये खूप वर्षे काम करून वर आलाय, कोणाचातरी असिस्टंट होता वगैरे सारखी बिरुदावली लावली की फार मोठे काहीतरी आहे असं निर्माण होतं किंवा कधी कधी केलं जातं. परंतु पुण्यातून मुंबईत येणे आणि मराठी रंगभूमी अथवा चित्रपटसृष्टीत नाव निर्माण करणे याच्यासारखा स्ट्रगल हा एखादा सुबोध सारखा पक्का पुणेकर अभिनेताच जाणू शकतो.
स्वतःच्या या खडतर स्ट्रगलला किंवा विविध चांगल्या वाईट अनुभवांना उगाच परिस्थितीची दुःखाची किनार न देता जेव्हा तो घेई छंद सारखे एक पुस्तक लिहितो तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटते. या पुस्तकात त्यांनी त्याला आलेले विविध अनुभव, त्यानी घेतलेले परिश्रम आणि लोकमान्य टिळक, बालगंधर्व, कट्यार काळजात यासारख्या चित्रपटांची निर्मिती करताना त्यांनी मनात ठेवलेला अखंड आत्मविश्वास हा त्याच्या कसा कामी आला आणि तो त्यात यशस्वी कसा होत गेला याचं शब्द चित्रण उत्तम केले आहे.
कुठल्याही प्रथितयश निर्माता-दिग्दर्शकाच्या घरचा "पाणक्या" होऊन त्याच्याच प्रत्येक चित्रपटात भूमिका मिळवायची, पार्ट१,२ काढायचे आणि स्वतःची हवा निर्माण करायची. असली तद्दन प्रसिद्धी न मिळवता,
स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या कर्तुत्वावर आणि वैविध्यपूर्ण अभिनय करण्याच्या ताकदीवर सुबोध विविध चित्रपट करतोय. हे चित्रपट तिकीट बारीवर यशस्वी तर होतातच आहेत पण प्रेक्षकांच्या मनात सुद्धा कायमस्वरूपी घर करून राहतात.
तसं पाहिलं गेलं तर मराठी चित्रपट आणि रंगभूमी सृष्टीत औरंगाबाद ग्रुप, सोलापुर ग्रुप, नाशिक ग्रुप, ठाणे ग्रुप असे विविध ग्रुप आहेत आणि त्या ग्रुपमध्ये त्या त्या ठरावीक कलाकार त्या त्या ग्रुपच्या पिक्चर मध्ये काम करत असतात. पण इथं पुणे ग्रुप तुम्हाला शोधूनही सापडणार नाही कारण पुणेकर ग्रुप मध्ये सुद्धा स्वतःचाच एकट्याचा त्याचा एक ग्रुप करून असतो.
सुबोध पक्का पुणेकर असल्यामुळे जन्मताच स्वावलंबीपणा नसात भरलेला त्यामुळे स्वतःच्या कष्टावर आणि आत्मविश्वासावर हा मराठी चित्रपट सृष्टीत खंबीरपणे उभा आहे.
हिंदीत जसा अक्षय कुमार सेल्फ मेडमॅन म्हणून ओळखला जातो, तसा सुबोध हा मराठीतला सध्याचा सेल्फ मेडमॅनच (अक्टर)आहे.
जुन्या नाटकांचे सुद्धा उत्तम कलाकृती असलेले आणि तिकीटबारी वर प्रचंड यश मिळवून देणारे कटार काळजात आणि सविता दामोदर परांजपे सारखे चित्रपट सुबोधनी एक हाती यशस्वी करून दाखवले.
त्याच्या नवीन डॉक्टर काशिनाथ घाणेकर मधल्या डायलॉग प्रमाणे म्हणायचं झालं तर ... "मराठी प्रेक्षकांना पुन्हा एकदा संगीत नाटकाच्या तिकीट बारीवर खेचून आणलं या नव्या सदाशिवनी"
लोकमान्य टिळक, बालगंधर्व, कट्यार काळजात घुसली आणि डॉक्टर काशिनाथ सारखे चित्रपट आणि त्यातली भूमिका सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत लीलया वठवणे म्हणजे शिवधनुष्य उचलण्याचा प्रकार आहे.
सतत नवीन करण्याचा ध्यास आणि पक्का नुमविय असल्यामुळे "हाती घ्याल ते तडीस नेण्याचे" बाळकडू शाळेत मिळालेले त्यामुळे प्रत्येक भूमिका अव्वलच ठरेल याची त्याला आणि इतरांना खात्री असतेच.
आता सध्याचेच उदाहरण घ्या ना "विक्रांत सरंजामे". तुला पाहते रे ही मालिका अल्पवधीत हायेस्ट टीआरपी मिळवणारी पहिली मराठी मालिका ठरली आहे. यात सुबोधने जी मनातील चलबिचल चेहऱ्यावर तंतोतंत उतरवली आहे त्याला खरंच तोड नाही. अहो पांढऱ्या केसांचा आणि चाळीशीतला हिरो सुद्धा सिरीयल मधून एवढा हिट होऊ शकतो, दिल की धडकन होउ शकतो.. हे फक्त सुबोधच करू जाणे.
सध्या पंचविशीतल्या मुलींपासून ते पन्नाशीतल्या बायकांपर्यंत सर्वत्र सबकुछ सुबोध अशी परिस्थितीच निर्माण झाली. त्यांच्यासाठी सध्या एकच वाक्य आहे ते म्हणजे "मनोभावे...सुबोध भावे."
आणि हो हल्ली आमच्यासारख्या चाळीशी नंतर च्या पुरुषांना सुद्धा एक नवीन पालवी फुटली आहे बरं त्याच्या या भूमिकेमुळे. धन्यवाद सुबोध.
लिहिण्यासारखे बरेच आहे शब्द, अक्षर, कागद कमी पडतील. त्याच्या वादळवाट मधल्या आवडत्या जयसिंगच्या भूमिकेपासून, हापूस मधला टिपिकल कोकणातला अजित, सनई चौघडे मधला प्रोफेशनल बोरगावकर, तुला कळणार नाहीतला सध्याच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारा राहुल, हृदयांतर मधला गंभीर शेखर जोशी ते आता परवापर्यंतचा सविता दामोदर मधला शरद अभ्यंकर आणि पुष्पक मधला मुंबईचा मिशीवाला नातु विलास.
टिपिकल पाट्या टाकत त्याच त्याच हा हु कॉमेडी किंवा माकड चाळे करत हिरो स्टाइलच्या भूमिका न करता, प्रत्येक भूमिका वेगळी, विषय वेगळा आणि बाज ही वेगळाच.. हीच सुबोध ची खासियत आहे.
म्हणून आता शेवटी एवढेच म्हणतो "आपलं हे नाणं एकदम खणखणीत वाजतंयsss... पिक्चर एकदssम टॉप एकदम कडSSSक..."
----मिलिंद सहस्रबुद्धे ©
ता.क.
यापुढे कदाचित मराठी चित्रपटांच्या टायटल्स मध्ये एक नवीन प्रथा सुरू होईल हिरोच नाव .."आणि" सुबोध भावे लावण्याची.

Comments

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी

*आपण सारे अर्जुन*

*आपण सारे अर्जुन* © मिलिंद सहस्रबुद्धे                   गुरुवारी रामनवमी झाली होती आणि शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बहुतांश घरात लगबग सुरू होती. नऊच्या रामायणाची नाही तर नऊ वाजता देशाचे पंतप्रधान काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत आणि देशाच्या जनतेशी व्हिडिओकॉल द्वारे संवाद साधणार आहेत त्याची. प्रत्येक जण वाट बघत होता नऊ वाजण्याची आणि एकदाचे नऊ वाजले.  प्रत्येक न्युज चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुरू झाला. नेहमीप्रमाणे मोदींनी त्यांच्या शैलीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर भाष्य तर केलेच. खरंतर ते  बोलत असताना प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता की मोदी घोषणा काय करणार. भारतातल्या सवासौ करोड जनतेला आता मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवरून बोलतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करणार असं नक्की माहिती असते. आमच्या ह्या भाऊ चा धक्का आज काय दे धक्का देणार ह्याकडे सगळ्यांचं जीव मुठीत घेऊन लक्ष होतं. तसं पाहायला गेलं तर आदल्या दिवशी जेव्हा मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितलं होतं की मी उद्या सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. तेव्हापासूनच तर्क-वितर्कांचे घोडे वि