Skip to main content

२२ यार्डचा देव......सचिन रमेश तेंडुलकर हे अकरा अक्षरी (मराठीत) नाव जगभरातील क्रिकेट प्रेमींसाठी जपनामाचे जसे बारा अक्षरी मंत्र

सचिन रमेश तेंडुलकर हे अकरा अक्षरी (मराठीत) नाव जगभरातील क्रिकेट प्रेमींसाठी जपनामाचे जसे बारा अक्षरी मंत्र असतात तसे मंत्रोच्चार आहे. हातात जपमाळे ऐवजी बॉल आणि बैट घेऊन सर्व 'बालक-पालक' ह्या मंत्राचा जप करत असतात. ह्या नावाची आणि व्यक्ती ची मोहिनी ही भल्याभल्यांना पडली आणि तीच्या बैटच्या कर्तृत्वाची जादू बौलरसनी अनुभवली.
स्कल कैप घालून वेस्ट इंडिजच्या सहाफुटीवर उंचीच्या भेदक चेंडूंच्या मार्यासमोर ताठ कण्याने उभा राहणाऱ्या सुनील गावस्कर चा फोटो घरात लावून ज्या मुलांने प्रैक्टिस केली, तो नक्कीच अदभूत चमत्कार घडवणार हे श्री आचरेकर सरांसारख्या चाणाक्ष कोचला पक्के ठाउक असेल.
सचिन तेंडुलकर हे नावच असे आहे की,क्रिकेट मधले वरवरचे कळणार्या माझ्या सारखा पुणेरी माणूस त्याच्यावर लिहण्याचे धाडस करतोय. अर्थात पुलंच्याच भाषेत सांगायचं तर माहीत नसलेल्या विषयावर उसन्या आत्मविश्वासाने बोलायचं धाडस फक्त पुणेकर च करु शकतो म्हणा.
तीन दशके ज्यानी ह्या खेळावर, त्यातल्या खेळाडूंवर आणि (सावरकरांच्या स्वपनातल्या) अखंड भारताच्या मनावर राज्य केले तो हा आमचा सचिन.
मी कधीच कुणाला, अगदी पाच वर्षाच्या टिवरा पोराला सुद्धा 'ते सचिन" म्हणताना ऐकलं नाही. त्यादिवशी मी गंमतीने म्हटलं " ते सचिन तेंडुलकर छान खेळतात" तर माझी पहिलीतली मुलगी म्हणाली " ई ई बाबा ते सचिन काय, तो सचिन". खरंच तो सर्वांना इतका जवळचा वाटतो की जणू नाक्यावर चा मित्र, कुणाला वर्गातील शेजारी, कुणाला आदर्श मुलगा, कुणाला भाऊ वगैरे वगैरे... पण "तो"च सचिन.
पदार्पणापासून ते अगदी आता शेवटच्या IPL T20 पर्यंत तो जसा होता तसाच आहे. "नम्र" आणि "मितभाषी". मराठी च्या परीक्षेत जर समानार्थी शब्द लिहा असं आलं तर मुलं नम्र = सचिन लिहतील की काय इतकं.
टोम आल्टर नी घेतलेल्या त्या ब्लॅक अंड व्हाईट मुलाखतीतली ते चीकी हास्य आणि नम्र आवाज, अगदी काल परवा breakfast with champions च्या गौरव कपूर ला "ये शिवाजी पार्क का वडापाव नही हे, कीधर बांद्रा से लाए क्या' असं म्हणतांना सुध्दा तसाचं आहे.
अहो प्रत्येक मैच मध्ये शंभर पाहिजेतच अशी अपेक्षा जेव्हा मोदीजींचे लाडके "मेरे सवासौ करोड भारतीय" करतात तेव्हा ते प्रेशर काय असेल. जर एकदा दोनदा शंभर चुकले तर "च्यायला काय राव हा सच्यापण" सारखी उद्गार चिन्ह आहेतच.
सातत्याने परफॉर्मन्स द्यायचा, पण कधी दोन चार मैच जिंकून दिल्या नाहीत म्हणून पब्लिक च्या शीव्या आणि घरावर दगड. परंतु कधीही त्यांने स्वतःचा तोल जाऊ दिला नाही आणि संयम सोडला नाही. ना मैदानात ना मैदानाबाहेर. नक्कीच हा संस्कार त्या शिवाजी पार्क च्या मातीचा.
अनेक मैचेसमध्ये त्याला साध्या साध्या बौलरसनी आउट केले, पण पुढच्या मैचमधे जेव्हा तोच बौलर अतीआत्मविश्वासाने सचिन वर धावून गेलाय तेव्हा तो बौलर संघाच्या बाहेर कसा जाइल ह्याची खबरदारी सचिन ने घेतली.
जेव्हा त्या काळातला लेगस्पीनरचा बाप, ज्याच्या बोटांचा इन्शुरन्स होता तो शेन वॉर्न भर पत्रकार परिषदेत "तो माझ्या स्वप्नात येतो आणि त्यांची भीती वाटते" असं म्हणतो तेव्हा खरंच ह्या माणसाची मैदानावर काय दहशत असेल हया ची जाणीव होते. (टीप - त्या काळातला कारण आमच्या द्रुष्टीने इ. प्रसन्ना च कायमस्वरूपी स्पीनचा बाप होता, आहे आणि राहील)
कपिल देव पासून ते धोनीच्या नेतृत्वाखाली अनेक कैप्टन्स बरोबर खेळणारा एकमेव यशस्वी खेळाडू. फार कठीण आहे हे, इथं साधा एकदा बॉस बदलला तर आपण सारखी खरखर करतो. स्वतः एक असामान्य व्यक्तीमत्व असुन देखील, लहान थोरांच्या कैप्टन्सी खाली खेळायचं. एवढी साधी गोष्ट नाही. अहो गद्देपंचवीशीनंतर तर आपण साधं आईबापाचं पण ऐकत नाही. उगाच नाही वर्ल्डकप जिंकल्यावर त्याच्या पेक्षा आधिक आनंद धोनी ला झाला होता. का तर देवाला आम्ही प्रसाद ठेवू शकलो तो मुर्ती व्हायचा आधी. ही ती निर्मळ भावना.
ह्या विठोबा चे असंख्य भक्त टीव्ही वर नमस्कार करून भरून पावतात. जसे आमचे वारकरी कळसाला सुध्दा भक्ती भावाने नतमस्तक होतात
तो म्हणतो त्याप्रमाणे खरंच सचिन क्रिकेट जगलाय... इतकं की त्याच्या डिक्शनरी मधे जीवन हा शब्दच नसेल बहुधा. क्रिकेट ही त्यांच्या आई, बायको, बहीण, मुलगी ह्याच्या साठी सावत्र नाती असतील इतका तो क्रिकेटमय होता.
वर्ल्डकप मध्ये पाकिस्तान विरुद्ध रावळपींडी एक्स्प्रेस शोएब आग ओकत होता. बघ बघ बघितलं आणि सुरवातीच्या दोन तीन ओव्हर नंतर साहेबांनी(सचिन) नवीन शॉट ला जन्म दिला. वेगाने आखुड टप्प्यावरचा बाउन्स ऑफसाईडनी वर जातांना, आपल्या वर्गमित्राला हळूच (पण आतून जोरात) टपली मारावी तसा थर्डमैनला उंच कट मारला आणि सिक्स..आमच्या सारखे प्रेमी पागल, डोळ्यात पाणी. त्यानंतर मग त्याची सावली (सहवाग) ने पण copy paste केले. पण शेवटी बाळासाहेब ते बाळासाहेबच..राजसाहेब नंतर.
पाच सहा ओव्हर नंतर सेट झाल्यावर, आस्ट्रेलिया आणि पाकिस्तान चे बौलर हे तेजा, डागा, किंवा बिल्ला वाटायचे आणि सचिन म्हणजे "मै आज भी फेके हुए पैसे नही उठाता डावरसाब" वाला तो 'विजय अमिताभ बच्चन'. क्रिकेट च्या दुनियेत ला बौलरला धु धु धुणारा अंग्य ्री यंग मैन.
त्याच्या प्रत्येक मैचवर सध्याच्या स्टाईल मधे एक वेबसीरीज होईल इतकं लिहण्यासारखं आहे
वन डे मध्ये जेव्हा जयसुर्या आणि कालू पहिल्या पंधरा ओव्हर्स मधे १०० चे टारगेट मारू लागले तेव्हा श्रीलंकंन्सना उगाच जयसुर्यात सचिन दिसायला लागला. तिकडे वाघाबॉर्डर पलीकडे तर बालवाडीत ला शाहिद आणि वानप्रस्थाश्रमाला निघालेला इंझमाम पण सचिन वाटू लागले. मला सांगा सूर्य तळपत च असतो पण घरातील बल्ब "सूर्या" कंपनीचा लावला म्हणून तो सुर्य होत नाही.
सिध्दूपासून जडेजा (सर नाही अजय), मांजरेकर, गांगुली, सेहवाग अश्या विविध टेंप्रामेंटस् च्या सहकार्याबरोबर ओपनिंग ला यायचं आणि मोठी धावसंख्या उभी करायची. काही औरच कौशल्य होतं ह्या साडेपाच फुटी मुंबई च्या पाण्यात. आपण जश्या ATM मधून काढलेल्या पगाराच्या कोर्या नोटा डोळे भरून मोजतो तसा हा गडी धावा मोजायचा.
जो पर्यंत तो मैदानावर आहे तोपर्यंत रस्त्यावर शुकशुकाट, तो आउट झाला की सांस बहु सिरीयल चालू आणि ट्रैफिक जाम. वाहतूक पोलीस मनापासून त्याला दुवा देत असणार.
मध्यंतरीच्या काळात टेनिस एल्बोचे दुखणे, बैडपैच, वडिलांचे अचानक निधन अश्या घटनांमुळे थोड्याप्रमाणात त्याच्या चेहर्यावर नैराश्य उमटलेले दिसायचे. मग आमचे टिव्ही आणि वर्तमानपत्रातले "चैन से सोना है। तो जाग जाओ। "स्टाईल चे पत्रकार टीआरपी वाढवायचे. परंतु त्यांचा कधीही तोल गेला नाही ना बोलण्यात ना वागण्यात. कसा जाइल, कारण ज्याच्या नावावर शंभरी चे शंभर असा विक्रम आहे त्याच्या उठण्या बसण्यात सुध्दा अजून नम्रता शालीनता आहे.
मी कधीही त्याला शंभर दोनशे झाल्यावर हवेत उडी मारलेली किंवा त्वेषाने हातवारे कलेत, Yess ची ती टिपिकल मुठ आवळलीय, स्टैडमधे जर अंजली असेल तरी तीच्या कडे बघून पप्प्या हवेवर सोडल्यात असले प्रकार केलेले पाहीले नाही. एकच ठरलेली एक्शन बैटसकट दोन्ही हात वर करायचे, आकाशात बघायचं आधी देवाचे आणि मग पुढे वडिलांचे आभार मानायचे इतकच. खरंच त्याची ती भावना इतकी जेन्युइन होती की त्या छोट्याश्या एकवीस इंची टिव्ही च्या खोकड्यातून सुध्दा पोहचायची. आणि मग पुढच्या बॉलला टिपिकल मुंबई क्रिकेटर प्रमाणे प्लेड करून एक रन. उगाच शंभर झालेत म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून छकडी चौकार नाही.
सध्या सुध्दा रिटायर्ड झाल्यावर, उगाच कोणती मोठी कंपनी काढलीय, त्याची जोरदार पब्लिसिटी केलीय, एखादा बळंच पिक्चर केलाय, किंवा झेंडा हातात घेऊन पक्ष प्रवेश केलाय वगैरे काही नाही. कधीतरी Instagram किंवा Facebook वर अचानक हा गडी रात्री रस्त्यावर विकीटीकीं बरोबर क्रिकेट खेळताना दिसतो आणि "मग न्युज होते"
खरोखर हा देवच आहे, एवढा मोक्ष फक्त देवालाच प्राप्त झाला असेल.
We love you Sachin, thanks for giving us Cricket lessons and Life lessons too.
- मिलिंद स$बुध्दे.

Comments

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी

*आपण सारे अर्जुन*

*आपण सारे अर्जुन* © मिलिंद सहस्रबुद्धे                   गुरुवारी रामनवमी झाली होती आणि शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बहुतांश घरात लगबग सुरू होती. नऊच्या रामायणाची नाही तर नऊ वाजता देशाचे पंतप्रधान काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत आणि देशाच्या जनतेशी व्हिडिओकॉल द्वारे संवाद साधणार आहेत त्याची. प्रत्येक जण वाट बघत होता नऊ वाजण्याची आणि एकदाचे नऊ वाजले.  प्रत्येक न्युज चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुरू झाला. नेहमीप्रमाणे मोदींनी त्यांच्या शैलीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर भाष्य तर केलेच. खरंतर ते  बोलत असताना प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता की मोदी घोषणा काय करणार. भारतातल्या सवासौ करोड जनतेला आता मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवरून बोलतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करणार असं नक्की माहिती असते. आमच्या ह्या भाऊ चा धक्का आज काय दे धक्का देणार ह्याकडे सगळ्यांचं जीव मुठीत घेऊन लक्ष होतं. तसं पाहायला गेलं तर आदल्या दिवशी जेव्हा मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितलं होतं की मी उद्या सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. तेव्हापासूनच तर्क-वितर्कांचे घोडे वि