Skip to main content

"सत्या"चा प्रयोग............३ जुलै१९९८, बरोबर वीसवर्षापूर्वी जुलै च्या भर पावसात सत्या प्रदर्शित झाला आणि मुंबई च्या त्या २६जुलै

३ जुलै१९९८, बरोबर वीसवर्षापूर्वी जुलै च्या भर पावसात सत्या प्रदर्शित झाला आणि मुंबई च्या त्या २६जुलै च्या पावसासारखा तुफान चालला.
सिनेमाच्या सुरवातीलाच पावसाचा शॉट..धोधो पावसात दोन भुरटे गुंड स्कुटर वरुन पळून जातायत आणि पोलीस मागे लागलेत. स्कुटर घसरते, दोघं जोरात आपटतात, एकजण कसाबसा त्या मुंबई च्या घाण वस्ती तून वाट काढत पळून जातो. दुसरा स्कुटरखाली पाय अडकल्याने सापडतो. नेक्स्ट शॉट थेट कोर्टात.. तो सापडलेला गुंड कठड्यात उभा " कुछ मालूम नही साब, हम तो फोन पे काम करता है।" कीधरसे आया था फोन ".दुबई से बाकी हम को कुछ नही मालूम साब"..कट..
तिथेच आपल्याला जाणीव होते की पुढील तीन तास आपण काय बघणार आहोत.
राम गोपाल वर्मा उर्फ रामु चा "सत्या". हिंदी चित्रपट स्रुष्टीला पडलेले अंडरवर्ल्ड चे सुखद स्वप्न. एक अफलातून, नावीन्यपूर्ण आणि वास्तवाच्या जवळ नाही तर वास्तव च दाखवणारा सिनेमा.
मजा बघा दिग्दर्शक "राम" सिनेमा चे नाव "सत्या"आणि कथा रावणाची. हा सिनेमा म्हणजे एखादा वास्तववादी सिनेमा कसा असावा ह्याची कार्यशाळा आहे. तुम्ही कितीही वेळा हा पाहीलात तरी तुम्हाला दरवेळेस काही तरी नवीनच सापडते.
सिनेमाचा हिरो सत्या ज्याच्या नावावर हा सिनेमा आहे , ज्याची हिरोइन उर्मिला मातोंडकर आहे, परंतु सिनेमा पाहून बाहेर पडल्यावर लक्षात राहतो तो फक्त "भिक्कू"..भिक्कू म्हात्रे..मनोज बाजपेयी.
हा तोच मनोज होता जो गोविंद निहलानी च्या द्रोहकाल सिनेमात एक बाजू चा साइड एक्टर नक्षलवादी होता. सत्याची हीच खासियत आहे, मुळ हिरो "चक्रवर्ती" सोडून ह्या सिनेमातील बाकी सर्व कलाकार रातोरात हिंदीत हिट झाले. त्यातल्या काहींना तर केवळ सत्यात होता हा ह्या एका सर्टिफिकेट वर पुढील काही वर्षे रोल मिळत गेले.
मनोज बाजपेयी, गोविंद नामदेव, सौरभ शुक्ल, राजेश जोशी, मकरंद देशपांडे, शेफाली छाया असे बरेच दादा कलाकार की जे समांतर सिनेमा करत, चाय कटींग पीत, मुंबई च्या नुक्कडवर सिगारेट चे झुरके मारत असायचे त्यांना रामुने एका रात्री त स्टार बनवले. हि खरी दिग्दर्शकाची ताकद आणि ती रामुत ठासून भरलेली.
सत्यातील कैमरा चा प्रत्येक एंगल हा नवीन होता जसा टेबलाखालून, खिडकीच्या गजांमधून नव्वद डिग्री वरून थेट खाली रस्त्यावर, थिएटरमध्ये जशाच्या तसा.
रामुची खासियत म्हणजे एखादा क्लायमॅक्स शॉट मधेच ब्लॅक आउट करून त्या नंतरची घटना दाखवायची. जसे बंदुकीतून समोरच्या ला गोळी मारली, आवाजपण येतो पण गोळी लागून पडलेली व्यक्ती न दाखवता थेट पुढचा शॉट. आपण समजून घ्यायचं काय ते. त्याचा सिनेमा हा जरा फिल्मी प्रेमी जाणकारांसाठीच असतो.
सत्या सिनेमातला प्रत्येक शॉट, background music, location वर इतकं बारकाईने काम की विचारायची सोय नाही. आपण जणू त्या द फेमस दगडी चाळीत आत शेवटच्या खोलीपर्यंत गेल्याची भावना, मजा, भीती रामु निर्माण करतो.
सेंट मारणारा वकील म्हणजे त्यांचे नावपण वकील "शब्बो कैसी लगी" जेव्हा म्हणतो तेव्हा झरकन मुंबई चा ग्रैटरोड डोळ्यासमोर येतो.
टकला अंकल जेव्हा त्या बिल्डर ला " हम लोग क्या अलिबाग से आये लगता क्या तेरे को?" म्हणतो तेव्हा त्या बिल्डर च्या चेहऱ्यावर चे भाव आणि मग त्याने वाढवलेली खोकी पाहून वास्तव काय असते ह्याची जाणीव होते.
टपोरी चंदर सत्या ला खोली दाखवतांना देवाचा फोटो दाखवून म्हणतो "मस्त मै रहने का। और देख भगवान भी है। मानता है क्या भगवान को?" सत्या काहीच बोलत नाही. कैमरा खिडकी तून पावसाची रीपरिप दाखवत आकाशात जातो. मागे एक गुढ background music. ही कोणत्याही डॉयलॉग शिवाय बरंच काही सांगून जाण्याची कला फक्त रामुकडेच आहे.
सत्या वकील ला म्हणतो " भाऊ को बोल आप आके मिलो भिक्कू नहीं आएगा" बाजूला भिक्कू, अंकल, चंदर बसलेले..वकील एकच कटाक्ष अंकल कडे टाकतो आणि ठिके म्हणून निघतो तेव्हा background ला जो तबला वाजतो तो आपल्याला पुढच्या घटनांची कल्पना देउन जातो.
आत्ता पर्यंत च्या सिनेमांतील सर्वात अनपेक्षित धक्का सत्या त दाखवला आहे. भाऊ ठाकूर स्वतः निवडणूक जिंकल्यावर आपला हार भिक्कू ला घालतो आणि हसत बोलत मागून गोळी मारतो. आख्खं थिएटर सुन्न होतं, अगदी खुर्च्या सुध्दा. तिथंच अंडरवर्ल्ड आणि राजकारण ह्याची नियत काय असते ते कळतं.
असे फ्रेम बाय फ्रेम खुप प्रसंग आहेत. वक्त सबका आता है। मौका सभी को मिलता है। सारखे खोल संवाद.
सर्वात कहर म्हणजे सिनेमात गाणी लिहिलीत द ग्रेट गुलजार ह्यांनी, संगीत विशाल भारद्वाज चे, गायक दस्तुरखुद्द सुरेश वाडकर. हि तीन नांव आणि अंडरवर्ल्ड चा मसालेदार सिनेमा कदाचित आधी सांगितले तर विश्वास बसणार नाही पण हाच "सत्या" आहे.
सत्याने हिंदी चित्रपट स्रुष्टीला एक नवी नजर दिली. सिनेमा बनविण्याचा वास्तवादी, समांतर पण व्यावसायिक मेन स्ट्रीम द्रुष्टीकोन दिला. त्या नंतर ह्या वीस वर्षांत अनेक सिनेमे आले गेले पण सत्या कायम मनात घर करून राहिला. आता तर समांतर सामाजिक वास्तवादी सिनेमा हाच मेन स्ट्रीम सिनेमा म्हणून गणला जातो.
सत्या नव्वदीच्या दशकातील त्या टिपिकल रोमँटिक स्वप्नातल्या सिनेमांना छेद देत जमिनीवर घट्ट रोवलेला मैलाचा दगड ठरला.
धन्यवाद RGV रामु तू आम्हाला तो आनंद दिलास.
--- मिलिंद सहस्त्रबुद्धे

Comments

Popular posts from this blog

१९९२ चे अमिताभ बच्चन

 १९९२ चे अमिताभ बच्चन  पुण्यातील बाजीराव रोडवरील महत्त्वाची खूण म्हणजे आमची नूमवि मुलांची शाळा होय. रस्त्यावरील शाळेच्या कमानीतून आत गेल्यावर लागतं ते एक भलं मोठं इथून-तिथून पसरलेले आडवं प्रवेशद्वार. साधारण पाच-सहा फूट उंचीचं हे गेट कायम लक्षात राहिलं. मधल्या सुट्टीत शाळेतून पळून जाताना ह्याच्यावरुनच उडी मारावी लागायची. मोठ्या सुट्टीत मुख्य प्रवेशद्वार बंद असायचं आणि आम्ही उजव्या किंवा डाव्या बाजूने असलेल्या छोट्या दरवाजातून ये-जा करत असू. शाळेच्या बाहेर जाण्याची मुख्य आकर्षण म्हणजे चिंच आणि पेरूची गाडी, लाल पांढऱ्या गोळ्या विकणारा तो लेंगा-टोपीवाला म्हातार बाबा. ५० पैशात मिळणारी पावभाजी आणि २५ पैशात मिळणारी भेळ. आहाहा! त्या सगळ्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे.  प्रवेशद्वाराच्या मधोमध उभा राहिलं आणि समोर पाहिलं की शाळा म्हणजे अक्षरशः भव्य राजवाडा वाटतो. दोन्ही बाजूंनी काळ्या दगडात बांधलेली तीन मजली कौलारू भक्कम इमारत. ह्या सलग दोन्ही बाजूच्या इमारती जिथे एकत्र होतात ते मोठं प्रशस्त सभागृह. ह्याच सभागृहात दरवर्षी स्नेहसंमेलनातील गाजणारे कार्यक्रम म्हणजे, परचुरे सरां...

"साय"कल

  "साय"कल "तुम्ही कधी प्रेमात पडलात का?" "तुम्ही कधी सायकलवरुन पडलात का? ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं ठामपणे "हो" अशी देताना प्रत्येक जणांच्या डोळ्यात दिसणारी चमक एक सारखीच असते. सायकल वरून पडणे ही एक अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट असते. "सायकलवरून पडल्यावरच सायकल येते" हा सुविचार "शास्त्र असतं ते" सारखा आहे. सायकल शिकणे आणि शिकवणे ह्या दोन विरुद्ध टोकाच्या कला आहेत. जेव्हा आपण सायकल शिकत असतो, तेव्हा समोर आलेला प्रत्येक जण, प्रत्येक गोष्ट आपल्याला मोठ्या रा‌क्षसी संकटासारखी भासते. खरंतर पुढील आयुष्यात त्याहूनही अनेक समस्या, विघ्ने येतात. पण शिकतांना साधं छोटं कुत्रं असेल किंवा मोठी गाडी, समोर आल्यावर भासणारी ती भीती म्हणजे 'या सम हीच' अशी असते. मात्र हेच आपण सायकल शिकवत असतो तेव्हा "अरे किंवा अगं का थांबलीस, उगाच घाबरतेस, साधी स्कूटर तर होती!" अश्या समोरच्याला किरकोळीत काढणार्या वाक्यांची पेरणी चालू असते. आपण स्वतः शिकताना कधीच Hopping ने सुरुवात करत नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे पहिली सायकल सुरुवात ही बिन द...

दादा परत या..

  दादा परत या.. "मी कोणाच्या बापालाही घाबरत नाही" असं तुमच्या कडक आवाजात ऐकताना पुन्हा पुन्हा तुमची उणीव भासते. तुमच्याकडून चुकून बोली भाषेतील शब्दांची उठाठेव कधीतरी झालीही असेल. परंतु संस्कृतीच्या मर्यादा मग त्या राजकीय असतील अथवा सामाजिक तुम्ही कधीही ओलांडल्या नाहीत. कोणा एखाद्यावर उगाच खालच्या भाषेत टीकाटिप्पणी केली नाहीत. तर कधी सत्तेच्या गुर्मीत कोणाची निंदा नालस्ती केल्याचं आठवत नाही. तुमचा बाज आणि दरारा वेगळाच होता आणि आहे. प्रशासनावरची पकड म्हणजे जणू बापाने रस्ता ओलांडताना मुलाचा धरलेला घट्ट हात. धरलेल्या त्या हातात काळजी ही असतेच पण तेवढाच धाक असतो. तशी तुमची प्रशासनावरची पकड आहे. आमच्या पुण्याच्या पालकमंत्री पदी असताना तुमचा आठवड्याला किंवा महिनाभरातील एखादा दौरा ठरलेलाच. हा दौरा म्हणजे साध्या शिपायापासून ते मुख्य आयुक्त पर्यंत एक भीती असायची. महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यापासून ते अगदी रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलीसापर्यंत "दादा आज पुण्यात येणार" हे आधी दोन दिवसापासूनच चर्चेत असायचे. तुम्ही ज्या दिवशी येणार त्या दिवशी सकाळी सात ते रात्री दहापर...