Skip to main content
 "बाहुबली"

तसा मी सध्याच्या क्रिकेटचा चाहता नाही प्रत्येक मॅच बॉल टु बोल बघणारा अगदी इंडिया ची मैच असली तरी. सगळी रेकॉर्ड लक्षात ठेवणारा आणि चार मित्रमंडळी किंवा नातेवाईका समोर आपण जणू कसे हर्षा भोगले आहोत अशा अविर्भावात ती रेकॉर्ड फेकणारा.  सचिन-राहुल-सौरव नंतर हळूहळू क्रिकेट बघणे कमी झालंय किंवा इंटरेस्ट कमी झाला म्हणा. आयपीएल सारख्या तद्दन मनोरंजनमय क्रिकेटमुळे तर जणू संपलाच आहे. संध्याकाळी घरी आल्यावर "Snacks आणि Cold Drinks" किंवा चहा-कॉफीचे स्मॉल लार्ज पेग पीत वर्षाला शेकडा मैचेस बघायची अशी आवडच राहिलेली नाही.

तरीही सध्याच्या भारतीय क्रिकेट जगतात जी काही एका हाताच्याच बोटावर मोजावीत अशी नावं घ्यावी (किंवा नाव ठेवू नयेत) असे मला वाटणारे खेळाडू म्हणजे रोहित, बुमराह, राहणे, थोड्याफार प्रमाणात विराट आणि बाहुबली महेंद्रसिंग धोनी.

खरंच भारतीय क्रिकेटमधला तो बाहुबलीच आहे. बाहुबली सिनेमा तो महेंद्र (प्रभास) जसा एका हातात कित्येक किलो वजनाची शंकराची पिंड लीलया उचलतो, अगदी तो फोटो तो शॉट मॉर्फ  करूनच डोळ्यासमोर येतो तो...धोनीने भारतीय क्रिकेट संघाचा पिंड रुपी कैलास लीलया उचललाय.

भारतीय क्रिकेट विश्वात ज्या काही मुंबईएतर इतर क्रिकेटपटूंची तेही कर्णधार म्हणून नाव कोरली गेली,  त्यात MSD हे नाव कदाचित KD च्याही वर अर्थातच अव्वल नंबरवर असेल. त्याच्यावर आलेल्या आत्मचरित्रपर एम एस धोनी सिनेमामुळे सर्वांनाच त्याची History आणि Geography माहिती झालीय. असा ज्याचा इतिहास-भूगोल आहे त्याने क्रिकेटच्या अर्थशास्त्रात आणि संख्याशास्त्रात अव्वल नंबर मिळवणे हे खरंच कौतुकास्पद आहे.

असं म्हणतात Luck =Effort+Opportunity. आलेल्या संधीचा उपयोग करणे आणि ती संधी यशात रूपांतरित करणे हे वाटतं तेवढं सोपं नाही.  विकेटकीपर म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली आणि यशस्वी केली त्याला आज काही कुडमुडी समीक्षक तो बॅटिंग स्ट्राइक रेट कमी झाला म्हणून नावं ठेवतात याचंच आश्चर्य वाटतं.  आपल्याकडे काय आहे की एकदोन मॅच मध्ये जरा एखाद्या बैटस्मन कमी रन केले किंवा बॉलरनी विकेट नाही घेतल्या की लगेच "कारकीर्द संपली" "पहिले जैसा नही रहा""Retirement is now next step" अशी पालुपद चालू होतात. बरं ही बाष्कळ बडबड करतं कोण तर तर ज्यांनी रणजी किंवा आयपीएलच्या ग्राऊंड पलिकडचे जग पाहिलंच नाही असे खेळाडू किंवा, असे पत्रकार जे नेहमी राहूल-मोदी नितीश-ममता हयांना कव्हर करत असतात आणि तिकडे काय मालमसाला Gossip मिळाले नाही
की इकडे भरकटतात.

 जागतिक क्रिकेट विश्वात जी सात आश्चर्य असतील त्यात अगदी जर डॉन ब्रॅडमन हे पहिलं धरलं तर सातवे आश्चर्य म्हणजे MSD ची  विकेट किपिंग आहे.
कधी कधी तर वाटतं ग्राउंडवरचे अंपायर सुद्धा हळूच धोनीच्या नजरेचा किंवा बॉडी लांग्वेजचा अंदाज घेऊनच निर्णय देत असावेत. इतका त्याला स्टंपाच्या  मागून संपूर्ण परिस्थितीचा अंदाज आलेला असतो.
तो जणू त्या मधल्या स्टंपात जो छोटा कॅमेरा लावलेला असतो ना तसाच आहे. पुढे जाऊन त्या छोट्या कॅमेर्‍याला MSD CAMERA VIEW असं नाव प्रचलित होईल ह्यात कुणाचे दुमत नसावे.

 जेव्हा तो आला, तेव्हा मानेपर्यंत वाढलेले केस, रफटफ चेहरा आणि शरीर यष्टी घेऊन आला. पुढे जाऊन हा भारताला त्याच्या नेतृत्वाखाली तीन चार Series मधल्या विजयाची ट्रॉफी आणि महत्त्वाचे म्हणजे विश्‍वकरंडक मिळवून देईल असं त्या वेळच्या कॉमेंट्री बॉक्स मधल्या शास्त्री-गावस्कर-भोगले दत्तरुपी त्रिमूर्तींनी सुद्धा वाटलं नसेल.

धोनी यायचा मॅच सुरू असायची आणि धोनीचे 30 बोल 40 कधी व्हायचे कळायचंच नाही. आपण जरा असे इकडे तिकडे चहा प्यायला किचनमध्ये गेलेलो असायचो आणि या पठ्ठ्याचे चाळीस-पन्नास झालेले असायचे. इतका तो मिस्टर इंडिया चे घड्याळ घालून  खेळण्यासारखा चपळाईने खेळायचा अथवा खेळतो. मग त्याच्या नंतर त्याचे पन्नास-साठ आणि भारताची भक्कम धावसंख्या किंवा भारताचा विजय हा ठरलेलाच.

 हेलिकॉप्टर शॉटचं पेटंट घेऊन मैदानात उतरल्यावर पब्लिक तो शॉट कधी मारणार याची आतुरतेने वाट बघायचं आणि अजूनही बघतंच. अजून पर्यंत तरी तसा शॉट कोणी मारत नाही प्रयत्न बरेच जण करतात. धोनीनं सुद्धा तो कोणाला शिकवला नाही याबद्दल त्याचं "हार्दिक" अभिनंदन. नाहीतर प्रति सचिन होण्याच्या नादात जसे बरेच "वीर" गती झाले तसे प्रती महेंद्र नकोत.

 सध्याचा कॅप्टन विराट आहे परंतु,  घरातला कर्ता पुरुष अजूनही तो कोकणात जसं झोपळ्यावर बसून अडकित्यात सुपारी फोडत खर्ज्या आवाजात निर्णय घेणारा अण्णा किंवा तात्या असतो तसा तो तात्या धोनीच आहे.  नारळी-पोफळी ला पाणी कोणी सोडायचं आणि हापूसच्या आमराईला पाड  कोणी लावायचा, हा निर्णय (धोनी) तात्याच घेतात. असं जरी असले तरी मैदानात या गोष्टीचा विराटवर कधी दडपण आलेलं जाणवत नाही. बहुतेक धोनी तिथे सुद्धा जाणवू देत नाही. मिस्टर इंडिया चे घड्याळ घालून पटकन कोणाला तरी काहीतरी टिप्स देऊन जातो.

 मधल्या काही काळात किंवा अजूनही बरेच बॉयलर्समध्ये एक फैशन आहे.  मॅच मध्ये काहीतरी भरीव कामगिरी केली की उगाच (कदाचित खरं असेल तर मग सगळेच असे कसे असं वाटतं) "धोनी पाजी ने बॉल ऐसै वैसे डालने का advice दिया" अशा पद्धतीचं काहीतरी बोलायचं की मग दुसरे दिवशी वर्तमानपत्राच्या आणि सोशल मिडियाच्या टायटल्स मधे आपले पण नाव आपोआप झळकते. 

सदैव हसरा चेहरा, चेहऱ्यावर समुद्राच्या ओहटीला असते तशी नीरव शांततेचे भाव, अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत विजेचा वेगाची चपळाई , टीमवर्क प्रचंड विश्वास,  नव्या खेळाडूला आपल्या गावाचाच दादा असल्यासारखा आधार देणारा खांदा,  ग्लोव्हज घालूनच जन्माला आलेले हात आणि सतत जिंकण्याचा निर्धार घेऊनच मैदानावर उतरणारी बॉडी लांग्वेज.. असा हा महेंद्रसिंग बाहुबली धोनी.  कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर सुद्धा तितकाच कार्यक्षम आणि यशस्वी म्हणून वावरतोय.

 इतर कोणत्याही संघाला जर भारताला हरवायचं असेल तर त्यांना " इंद्र होऊन कपटानं धोनीरुपी कर्णाकडून त्याच्या  ग्लोव्हज आणि पैडची कवचकुंडलं  मिळवावी लागतील"  नाहीतर जोपर्यंत हा कर्ण संघात आहे तोपर्यंत भारतीय विजयाची पताका सदैव अटकेपारच होत राहील हे नक्की...
Thank you MSD...
© मिलिंद एकशुन्यशुन्यशुन्यबुध्दे
७/७/२०१९

ता.क. आमचे परम मित्र अभिजित पोळ ह्याच्या आग्रह खातर सदर लेख लिहून सफळ संपूर्ण आणि प्रकाशित. 

Comments

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी

*आपण सारे अर्जुन*

*आपण सारे अर्जुन* © मिलिंद सहस्रबुद्धे                   गुरुवारी रामनवमी झाली होती आणि शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बहुतांश घरात लगबग सुरू होती. नऊच्या रामायणाची नाही तर नऊ वाजता देशाचे पंतप्रधान काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत आणि देशाच्या जनतेशी व्हिडिओकॉल द्वारे संवाद साधणार आहेत त्याची. प्रत्येक जण वाट बघत होता नऊ वाजण्याची आणि एकदाचे नऊ वाजले.  प्रत्येक न्युज चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुरू झाला. नेहमीप्रमाणे मोदींनी त्यांच्या शैलीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर भाष्य तर केलेच. खरंतर ते  बोलत असताना प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता की मोदी घोषणा काय करणार. भारतातल्या सवासौ करोड जनतेला आता मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवरून बोलतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करणार असं नक्की माहिती असते. आमच्या ह्या भाऊ चा धक्का आज काय दे धक्का देणार ह्याकडे सगळ्यांचं जीव मुठीत घेऊन लक्ष होतं. तसं पाहायला गेलं तर आदल्या दिवशी जेव्हा मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितलं होतं की मी उद्या सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. तेव्हापासूनच तर्क-वितर्कांचे घोडे वि